Home लेख लोकसभा निवडणूक आणि १३३ वी भिम जयंती

लोकसभा निवडणूक आणि १३३ वी भिम जयंती

30

 

लोकसभा निवडणूक दर पाच वर्षाने येत असते. आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भिमजयंती मात्र दरवर्षी येत असते. निवडणुकीत एकच दिवस मतदान प्रक्रिया सकाळी ७ ते ५ वाजे पर्यंत असते. त्याचं दिवशी तुम्ही राजे असता. दुसऱ्या दिवशी तुमची किंमत शुन्य होऊन जाते. पण त्या एका दिवसाचे परिणाम पांच वर्षचं नव्हे तर कायम स्वरुपी इतिहास घडवून जातात. काही घटना निकाल प्रेरणादायी लक्षवेधी असतात. तर काही कायमची जखम देऊन जातात. मग दर पांच वर्षाने आपली आपल्यालाच जाणीव करून देते.मग आजची तरुण पिढी विचारते बाबा आज आपण १३३ वी जयंती करतो. त्याच बरोबर १८ व्या लोकसभेची निवडणुकीला सामोरे जातो. 543 सदस्य निवडण्यासाठी भारतात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुका सात टप्प्यांत होतील आणि 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर केले जातील.त्यात आपण आपला पक्ष कुठे असेल?
बाराही महीने ३६५ दिवस आपण “बाबा के सन्मान मे हम मैदान मे.” म्हणत असतो. दररोज कुठे ना कुठे अन्याय अत्याचार,हत्याकांड होत असतात. त्या विरोधात आपण निष्टने जन आंदोलने करीत असतो. त्यात खरी निष्टा किती असते हा संशोधनाचा प्रश्न आहे.सामाजिक आंदोलनासाठी निष्ठेची खूप गरज असते. निष्ठेशिवाय कोणतेही आंदोलन चालविणे किंवा ते यशस्वी करणे शक्य नसते. जर तुम्ही आंदोलन उभे करायचे ठरविले असेल तर निष्ठेची खूप गरजची असते.निष्ठेचा काय अर्थ आहे जे स्वप्न घेऊन तुम्ही पुढे चालत आहात त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जे काम तुम्ही सुरु करता त्या कामाला आचार विचार करून स्वीकार केले पाहिजे.आणि जर विचार करून स्वीकार केले असेल तर जीवनभर ते पूर्ण करण्यासाठी ते निभवाल तर तुम्हाला निष्ठावान आहेत आणि आणि या कामाला पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवनभर कष्ट केले असे म्हणता येते.
राज्यात देशात हजारो जन आंदोलन चालवली जातात. पण त्यात निष्टा असते काय की राजकारणासाठी ते आवश्यकता असते. पण कधी ही आंदोलन फक्त निष्ठेच्या विश्वासावर चालत नाही. त्यासाठी बुद्धीची पण गरज असते.असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला निष्ठावान लोक पाहिजेत,बुद्धीची भरपाई मी करेन. बुद्धीला बाबासाहेबांनी दुसऱ्या स्थानावर ठेवले. निष्ठा नाही आणि केवळ बुद्धी आहे तर खूप भयावह आहे.कारण जे बुद्धिवान आहेत त्यांच्याजवळ निष्ठा नाही,असे लोक समाजाला विकण्याचे काम करतील.भारतात शोषितांच्या वंचितांच्या मानसन्मानसाठी न्याय हक्क व प्रतिष्ठे साठी झटणारा आणि संघर्ष करणारा एकच नेता होऊन गेला त्यांचे नांव डॉ.बाबासाहेब आंबेडकर.त्यांच्या जीवनात त्यांनी जेवढा अन्याय अत्याचार आणि अपमान सहन केला,तेवढा आज कोणीच सहन करू शकत नाही.तरी त्यांनी कधीच हार मानली नाही किंवा संघर्ष टाळला नाही. उपाशी अर्धपोटी राहून त्यांनी अभ्यास केला शिक्षण पूर्ण केले.पण नोकरी शोधली नाही. समाजासाठी संस्था, संघटना आणि पक्ष स्थापन केला. परंतु आज त्यांच्या सर्व संस्था, संघटना आणि पक्ष क्रांतिकारी विचारधारे पासुन कोसो दूर गेल्या आहेत. आणि श्रेष्ठ कोण “व्यक्ती की संघटना” यात अडकल्या आहेत. त्यांची १३३ वी जयंती आपण साजरी करीत आहोत.आज कितीही गंभीर समस्या आल्या तरी आपल्यातील अहंकार काही कमी होताना दिसत नाही. मात्र भिम जयंती साजरी करण्यासाठी सर्वच तन, मन, धनाने एकत्र येऊन उत्स्पुर्तपणे जोश मध्ये जयंती साजरी करतो.ती लक्षवेधी असते. भव्य मिरवणुकीचे विसर्जन झाल्यावर आणि आंबेडकरी जयंती संपल्यावर आंबेडकरी विचारधारा आणि भिम जयंतीचे नातं काही केल्या जुळत नाही.
नेत्याला आपल्या कर्तृत्वावर आत्मविश्वास असावा लागतो.त्यासाठी गांव पातळीवर संघटना बांधणी असावी लागते. पण गांव तालुका, जिल्हा पातळीवर संघटना बांधणी नसताना आपल्याच कर्तुत्ववावर आपला आत्मविश्वास ठेऊन ते नेते आणि कार्यकर्ते आयुष्यात चळवळीला दिशा देऊ शकत नाही. सर्व समाजाला एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न चांगला असला.तरी स्वतःच्या समाजातील गटबाजी कायमस्वरूपी ठेऊन इतर समाजा कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वातावरण प्रचंड असंतोषाचे विशेष मागासवर्गीय समाजाबाबत असतांना आपण एकजूट झालो नाही तर २०२४ ला कसे सामोरे जाणार?. याचा गांभियाने विचार आजच केला पाहिजे.नंतर वेळ निघून जाईल.भिम जयंती साजरी करण्यासाठी सर्वच तन, मन, धनाने एकत्र येऊन उत्स्पुर्तपणे जोश मध्ये जयंती साजरी करतो.ती लक्षवेधी असते.पुढे काय?.
ग्रामीण भागातील समस्या गावात राहून सोडायच्या असतात. रोजीरोटी, उद्योग धंदे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाठबळ लागत असते.तिथे कामगार कर्मचारी अधिकारी सरकारी निमसरकारी संघटितपणे संघटने सोबत काम करीत असतात. त्यांचे उत्तम उदाहरण खैरलांजी हत्याकांड नंतरचे प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी आणि अधिकारी मागासवर्गीय असूनही राजकीय दबावाखाली त्यांनी योग्य काम केले. त्या हत्यांकडातील राजकिय आशीर्वाद देणारे नेते तेव्हा पासुन विजय होत आहेत. त्यांनी पक्ष बदला तरी काही फरक पडत नाही.ते एकमेकांचे मावस भाऊ,आत्या भाऊ, सगे सोयरे आहेत.त्यामुळे त्यांचे संघटन गांव पातळीवर आहे.हे आपण विसरतो. मागासवर्गीय समाजाच्या लोकसंख्येवर मतदानावर सर्व नेते हक्क सांगतात. पण त्यासाठी गांव पातळीवर कोणते काम करतात हे सांगत नाही.
संत तुकडोजी महाराज यांनी ग्राम गिता या ग्रंथात दोन ओळीत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे.ते म्हणतात,”हत्तीस आवरी गवती दोर ! मुंग्याही सर्पास करती जर्जर !! रानकुत्रे संघटोनी हुशार ! व्याघ्रसिंहासी फाडती !!. हे मी कुठे वाचले नाही. लाखनी,अडयाल पवनी येथे 78 वर्षाच्या जेष्ठ पत्रकार,अभ्यासक,यांच्या घरी व भंडारा येथे महसूल विभाग कॅन्टीनमध्ये चार जेष्टनेत्याच्या तोंडून ऐकले आहे. ज्यांनी बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली 1978 ला जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती पद भोगून वीस वर्षाचा मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या निधीचा वापर कसा झाला. मागासवर्गीय समाजाच्या सरकारी नोकरीतील जागा ग्रामसेवक, शिक्षक, कोतवाल तहशिलदार ते जिल्हाधिकारी कसा भरल्या यांची तपशीलवार माहिती गोळा केली. त्यासाठी संघटना लागते. प्रत्येक क्षेत्रातील कामगार कर्मचारी अधिकारी आणि ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर हा त्या त्या पातळीवर संघटित असतो.यावरुन मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे. हे आपण समजू शकतो. त्यासाठी आंबेडकरी विचारधारेची संस्था, संघटना आणि ट्रेंड युनियनची बांधणी आवश्यक आहे.त्यासाठी आपण एकत्र येत नाही. जय प्रमाणे भिम जयंती साजरी करण्यासाठी सर्वच तन, मन, धनाने एकत्र येऊन उत्स्पुर्तपणे जोश मध्ये जयंती साजरी करतो.ती लक्षवेधी असते.बाकी च्या समस्या बाबत काय?
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे म्हणतात.समाजात राहूनच मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो. त्याच्या व्यक्तीमत्वाला विविध कंगोरे फुटून त्याचे व्यक्तिमत्त्व बहरत असते. जो माणूस समाजशील नसतो तो कितीही बुद्धिवान,पैसेवान असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे समाजाला त्याचा उपयोग होत नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.जी जी व्यक्ती कोणत्या तरी संघटने सोबत जुळलेली असते. त्या त्या व्यक्तींना लोक ओळखत असतात. इतरांपेक्षा त्यांना जास्त मानसन्मान मिळत असतो. काही व्यक्ती संघटनेत खूप किर्याशील असतात. त्यांना जास्त प्रसिध्दी मिळते. संघटना जर काळानुरुप मोठी होत गेली, नावलौकीकास आली तर आपोआपच कार्यकर्त्यांचेही नाव व्हायला लागते. त्यांना प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पद, पत, मिळायला लागते. काही कार्यकर्ताच्या डोक्यात मग या प्रसिद्धी व पैश्याची हवा चढायला लागते.ते स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजायला लागतात. त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो. माझ्या मुळेच ही संघटना आहे असे त्याला वाटू लागते. मीच या संघटनेला मोठे केले असा अहंगंड त्याच्यात निर्माण होतो. मग त्या व्यक्तीचे वागणे, बोलणे,चालणे पूर्णपणे बदलून जाते. ज्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आणि श्रमावर तो “मोठा” झालेला असतो त्यांनाच तो तुच्छ समजायला लागतो. त्यांच्यासोबत बोलायला त्याला आता वेळ नसतो. त्यांचे फोन उचलण्यात त्याला कमीपणा वाटतो. आता त्याचे वागणूक “attitude” पूर्णतः बदललेले असतात.आणि इथूनच मग त्याच्या -हासाला सुरुवात होते. म्हणूनच आंबेडकरी विचारधारा आणि १३३ वी भिम जयंती यांचे नातं जुळतांना दिसत नाही.ते दिसायला हवे आहे.
जगातील कोणत्याही संघटनेच्या व कार्यकर्त्या बाबतीत हे असेच घडत असते. संघटनेत काही वक्ते, लेखक, प्रचारक असतात. त्यांच्या माध्यमातून संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवायची असतात.वक्ते,लेखक हे संघटनेचे वैभव असतात. परंतु सभासद संघटनेचा प्राण असतो,आत्मा असतो. त्यामुळे “या” मंडळीं पेक्षा कार्यकर्ता अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून एखादा वक्ता किंवा लेखक याला विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त महत्व देवू नये. सर्वांना महत्व दिल्या गेले पाहिजे. नाहीतर “ही” मंडळी डोक्यावर चढतात आणि स्वतःला संघटनेपेक्षा मोठी समजायला लागतात.त्याला जाहीर सभेच्या स्टेजवर सिंहासनच लागते. मग आता त्या व्यक्तीची महत्वाकांक्षा प्रचंड वाढायला लागते. तो आता मर्यादेच्या पलिकडेचे स्वप्न पाहतो आणि आता आपण या संघटनेतून बाहेर पडलो तर ही संघटनाच संपून जाईल असा त्याचा भ्रम होतो. मग तो संघटनेच्या विरुध्द कारवाया करायला लागतो. बोलायला लागतो.कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करतो. आणि संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. परंतु सदस्य,सभासद हुशार आणि निष्ठावंत असल्यामुळे त्याच्या कारस्थानाला बळी पडत नाही. उलट कार्यकर्ते त्यालाच जाब विचारतात. संघटनेने मोठे केले नसते, तर तुला गावाच्या बाहेर कोणीही ओळखले नसते. असे त्याला अधिकारवाणीने सांगतात.आतापर्यंत सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात त्याच्याबद्दल असलेली इज्जत झिरो होऊन जाते.मागे वळून पाहिल्यावर त्याच्यामागे कोणीच दिसत नाही. मग त्याचे डोळे उघडतात,पश्चात्ताप होतो, संघटनेचे महत्व समजते. आपल्यामुळे संघटना नाही तर संघटनेमुळे आपण होतो याची त्याला जाणीव होते. पण आता वेळ निघून गेलेली असते. काही क्षणासाठी मोठे लोक सोबत असतात, पण आपले संरक्षण करणारा, आपल्यासाठी जीव देणारा कोणीच जीवाभावाचा सामान्य कार्यकर्ता मात्र आपल्यासोबत नाही याची त्याला जाणीव झाल्यावर त्याची रात्रीची झोप हराम होवून जाते. तो एकाकी पडतो. पैसे कितीही मिळाले तरी कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आपुलकी मात्र त्याला कधीच मिळू शकत नाही. पण जो कार्यकर्ता संघटनेसोबत प्रामाणिक असतो त्याला त्याचे फळ एक दिवस निश्चितच मिळते. “फितुर” म्हणून त्याला कोणीही हिणवत नाही. प्रामाणिक म्हणूनच सर्वजण त्याच्याकडे पाहतात. म्हणून कोणत्याही संघटनेत काम करणा-या कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेसोबत एकनिष्ठ राहावे. संघटनेत रुसवे, फुगवे, नाराजी, वादविवाद चालतच असतात. पण ज्या संघटनेमुळे आपल्याला “सर्वकाही” मिळाले त्याच्यासोबत मात्र कधीच धोकेबाजी करु नये.नाहीतर इतिहासात त्यांची गद्दार म्हणून नोंद होते. आंबेडकरी विचारधारा आणि १३३ वी भिम जयंती चे एडीट करतांना मला हे जाणवते म्हणूनच हे लिहतो.लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणाला मतदान केले होते. यांची नोंद झाल्या शिवाय राहणार नाही. त्याचा विचार आजच करा.
आंबेडकरी क्रांतिकारी विचारधारा असणाऱ्या सर्व संस्था,संघटना आणि पक्ष आज कोणत्या मार्गाने जात आहेत. या कोणत्या प्रश्नावर एकत्र येऊ शकतात?. या सर्वांना एकाच ठिकाणी आणण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची कामगार चळवळ स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु ) ही राष्ट्रीय ट्रेंड युनियन आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या कुशल,त्यागी निस्वार्थी नेतृत्वाखाली करू शकते. जगातील कामगारांनो एक व्हा सांगणारे जाती धर्माच्या शोषणाच्या विरोधात बोलत नव्हते म्हणून मनुवादी, हिंदुत्ववादी संघटना पक्ष आज डोके वर काढत आहेत त्यांना मोठ्या संख्येने आर्थिक पाठबळ आणि मतदान याचं कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाने केले. त्यांच्या मुळेच सर्व सरकारी उद्योग धंद्याचे खाजगीकारण कंत्राटीकारण होत आहे त्याला बारा राष्ट्रीय ट्रेंड युनियनने व त्यांच्या राजकीय पक्षांनी ठोस भूमिका घेऊन जबाबदारी पार पाडली नाही. त्यांचा सर्वात मोठा बळी मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी अधिकारी आणि विद्यार्थी ठरत आहे. म्हणूनच आंबेडकरी विचारधारेच्या संस्था, संघटना युनियन, राजकीय पक्ष यांची बांधणी होणे आवश्यक आहे. सामाजिक संघटना, धार्मिक संस्था संघटना, राजकीय पक्ष खूप आहेत.पण त्य कोणत्याही समस्यावर एकत्र येऊ शकत नाहीत. पण एक कामगार,मजूर शेतमजूर,कर्मचारी अधिकारी म्हणूनच एका बाबासाहेबांनी दिलेल्या नावावर स्वतंत्र मजूर पक्षा नंतर स्वतंत्र मजदूर युनियन च्या नावाखाली संघटीत होऊन जागतिक पातळीवर अनेक समस्या सोडू शकते. हेच डॉ. बाबासाहेबांनी लिहून ठेवले आहे. तरच संविधानाच्या चौकटीत देशात बहुजन हिताय बहुजन सुखाय होऊ शकते. करिता आंबेडकरी विचारधारा आणि १३३ वी भिम जयंती साजरी करतांना त्यांचे परीक्षण झाले पाहिजे. अभ्यास करून मुले दरवर्षी नापास का होतात. त्यांना शिकवणारे एकूण घटक शिक्षक, संस्था कर्मचारी, सरकारी शिक्षण अधिकारी सर्वच व्यवस्था जबाबदर असायला पाहिजे. म्हणूनच आंबेडकरी विचारधारा आणि १३३ वी भिम जयंती याची सकारत्मक विचार करून समीक्षा झाली पाहिजे.प्रत्येकांनी ती व्यक्तिगत पातळीवर करून घेऊन नगरात एकत्र आले पाहिजे. नंतर वार्ड, विभाग तरच पुढे काय यांचे उत्तर शोधता येईल. भिम जयंती साजरी करण्यासाठी सर्वच तन,मन,धनाने एकत्र येऊन उत्स्पुर्तपणे जोश मध्ये जयंती साजरी करतो. ती लक्षवेधी असते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार वंदन आणि तमाम भारतीयांना १३३ व्या भिम जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे,
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here