मोर्शी तालुका प्रतिनिधी /
अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरूड चांदुर बाजार, अचलपूर, तिवसा यासह विविध तालुक्यामध्ये हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार संत्रा फळांची लागवड हजारो हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात केली जाते. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. त्यामुळेच पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करीता जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १३३३ रुपये भरून २०२२ – २३ मध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार अंतर्गत गारपिट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी वीमा काढलेला होता. हवामान धोक्यामुळे गारपीटीमुळे घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नसल्यामुळे फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेमध्ये मोठ्या अपेक्षेने विमा काढून सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदत वेळेवर दिल्या जात नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाला व विमा कंपनीला निवेदन देऊन गारपिट फळ पीक विमा मदत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.
पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२- २३ गारपिट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्स्याची रक्कम १२ कोटी ४ लक्ष ९७ हजार ८७८ रुपये इतका निधी वीमा कंपनीस वितरित करण्याबाबत दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय काढलेला असून सुद्धा गारपीटग्रस्त फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांना गारपिट वीमा मदत वितरित करण्यात आली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला असून ८ दिवसामध्ये गारपीटग्रस्त वीमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यात गारपिट वीमा मदत जमा न केल्यास रिलायन्स जनरल इन्शुरनस कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृषी आयुक्त प्रविण गेडाम यांना पात्र पाठऊन देण्यात आला.
संत्रा उत्पादक शेतकरी वीमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा फोन करून माहिती विचारण्याचा प्रयत्न करीत असताना वीमा कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वीमा कंपनी विरोधात रोष निर्माण होतांना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीला शासन व विमा कंपनीचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासन व विमा कंपनीला धारेवर धरण्यासाठी, रिलायन्स इन्शुरन्स विमा कंपनी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा शासन व रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला देण्यात आला आहे.
हवामानावर आधारित फळ पीक विमा, गारपिट वीमा काढून देखील फळ पिकांचे नुकसान झाल्यावर विमा कंपन्यांकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेवर दिली जात नाही दरम्यान याबाबत आता सरकारने गंभीर दखल न घेतल्यास गारपीटग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ८ दिवसांत जमा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात यावे. आठ दिवसांत ही गारपिट वीमा मदत न दिल्यास रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या
आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. —– रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.