कोल्हापूर (प्रतिनिधी) ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे हे कष्टकरी चळवळीशी नातं सांगणारे, त्यांना साहित्याचा विषय बनवणारे, त्यांच्यामध्ये मानवतेचं बीज पेरत समतेचा मळा फुलवणारे साहित्यिक होते आशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या. विद्रोही साहित्यविश्व, चित्रपटसृष्टी, नाटक या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. युगप्रवर्तक बसवण्णा यांच्या जीवन-तत्वज्ञानावर त्यांनी दीर्घ लेखनही केले. न पेटलेले दिवे, ग्रामीण महाराष्ट्र, भारताची शोधयात्रा, तिच्या नवऱ्याचं वैकुंठगमन, सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम आदी महत्वाचे ग्रंथ त्यांच्या नावे आहेत.
आपल्यातील एक संवेदनशील माणूस, साहित्यिक, मार्गदर्शक हरपल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही भारतीय महिला मंच, निर्मिती प्रकाशन, सम्यक प्रतिष्ठान, संवाद प्रकाशन आणि समविचारी पक्ष, संघटना, व्यक्ती व संस्था यांच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. किसनराव कुराडे, डॉ. गिरीश मोरे, भरत लाटकर, डॉ. स्मिता गिरी, अनिल म्हमाने, डॉ. दादासाहेब मोरे, ॲड. करुणा विमल, रूपाताई वायदंडे, डॉ. निकिता चांदक, एम. डी. देसाई, अनिता गायकवाड, डॉ. अनिल कवठेकर, नामदेव मोरे, वृषाली कवठेकर, उत्तम पोखर्णीकर, निती उराडे यांनी आदरांजली सभेमध्ये आपल्या भावना व्यक्त केला.
तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. ज. रा. दाभोळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यामुळे आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या कन्या कॉ. स्मिता पानसरे व जावई बन्सी सातपुते यांचे चिरंजीव अमित सातपुते यांचे अपघाती निधन झाल्यामुळे या दोघांनाही यावेळी आदरांजली वाहण्यात आली.
सदर सभेस पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील लोक मोठया संख्येने उपस्थित होते.
संपर्क
9822472109 (अनिल म्हमाने)