धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील
धरणगाव — येथील शहीद भगतसिंग मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत अडलेल्या व्यक्तींच्या हातून गणरायाची आरती तसेच त्यांच्यासाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करून माणुसकीचा नवा आदर्श प्रस्थापित केला.
मागील अनेक वर्षांपासून शहीद भगतसिंग मित्र मंडळाने आपली वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे. गावात अनेक मंडळ आपापल्या परीने गणेशोत्सव साजरा करत असतात परंतु या मंडळाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नेहमीच नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. आजच्या दिवशी देखील असाच एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणारे तसेच गावातील निराधार लोक, मुक बधीर विद्यालयातील तसेच माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी यांच्या हस्ते मंडळाच्या गणपतीची आरती करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. तद्नंतर या सर्व मंडळींना मंडळाच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जगद्गुरू तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे, ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा।।’ या नुसार आजचा हा समाजाभिमुख कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर निमंत्रित सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. त्यांच्याकडून आयोजकांचे कौतुक करण्यात आले व त्यांना भरभरून आशीर्वाद देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन भागवत यांच्यासह मयूर बागुल, तेजेंद्र चौधरी, खुशाल मांडगे, किरण सोनवनी, प्रशांत जगताप, जितेंद्र जगताप, महेंद्र मांडगे, सागर मांडगे, अक्षय बारड, राज जगताप, यज्ञेश मांडगे, विकास मोरावकर, विशाल चव्हाण, अमोल सोनार, भूषण भागवत, राहुल जगताप, संदीप जगताप, आनंद मानकर, राकेश मांडगे, निलेश बिचवे, गणेश मांडगे, गणेश मराठे, अतिष भागवत, सचिन चव्हाण, किशोर महाजन, गोपाल भागवत, मिलन शाह, सुशांत सनानसे, रोहीत देवरे, मोहन मांडगे, विलास मांडगे, निर्मल नेरपगार, सागर जगताप, सुमित सोनवनी, सचिन भागवत, आनंद भागवत, लक्ष्मण पाटील आदींनी परिश्रम घेतले.