कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड (दि.२९डिसेंबर):- “विद्यार्थी जीवनामध्ये ध्येय गाठणे हे महत्त्वाचे आहे. ते साध्य करण्यासाठी खडतर परिश्रम घ्यावे लागतात. प्रत्येक कामाला प्रतिष्ठा असते. कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सगळीच कामे करता आली पाहिजेत. पास्ता आमचा नाश्ता झाला आहे. वडापाव आमचा लाडका आहे. पण घामाची भाजी- भाकरी हे रुचकर आणि चविष्टच असते. एकमेकांच्या कामातून, वागण्यातून, बोलण्यातून आपण अनेक गोष्टींचा स्वीकार करत असतो कारण विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. स्वहितकारक व समाजहित जोपासणाऱ्या गोष्टींचे अनुकरण सर्वानाच फलदायी ठरते.”असे मत मा. श्री सुनील परीट यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या कनिष्ठ विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मांडले. तासवडे गावचे उपसरपंच मा. श्री सुभाष मारुती जाधव यांनी अध्यक्षपद भूषवले.
मा श्री परीट पुढे म्हणाले की , “प्रत्येक क्षणांमध्ये शास्त्रीय कारण आहे. देवधर्म अर्थव्य कले करून पैसा मिळत नाही. प्रामाणिक कष्ट केले तर फळ हे हमखास मिळतेच. विद्यार्थ्यानी मानसिक आरोग्य जोपासावे आणि आपले ध्येय गाठण्यासाठी सद्मार्गाचा अवलंब करावा. आजच्या वर्तमानात विद्यार्थ्यांनी समाधान प्राप्त करून लोकजीवन, लोकपरंपरा, लोकसंस्कृती जोपासणे अत्यंत गरजेचे आहे.”
या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. महाले, प्रा. यु. एस. मस्कर, प्रा. एस. बी. राठोड, प्रा. पी. एस. सादिगले, प्रा. आर. एस. पाटील, श्री रमेश जाधव, श्री पांडुरंग शिंदे, ग्रामस्थ व स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
शिबिरार्थी स्वयंसेवक साहिल पाटील याने प्रास्ताविक केले. तर शिबिरार्थी स्वयंसेविका कु. समृद्धी पाडळे हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. समर्थ सपकाळ याने आभार मानले. प्रज्ञा हेगडे हिने सूत्रसंचालन केले.




