( मोर्शी तालुका प्रतिनिधी ) :
अवकाळी पाऊस, गारपीटमुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व जाचक अटी, निकष बाजूला ठेऊन मदत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
मोर्शी तालुक्यातील घोडदेव, डोंगर यावली, सालबर्डी, पाळा, दापोरी, हीवरखेड, उमरखेड, बेलोना, मायवाडी, भाईपुर, भिवकुंडी, यासह तालुक्यातील विविध गावामध्ये ९ एप्रिल ते ११ एप्रिल पर्यंत ४ वेळा गारपीट व वादळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत बळिराजाचे सांत्वन करत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
मोर्शी तालुक्यात संत्रा, मोसंबी, गहू, कांदा, टोमॅटो, मका, आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने नुकसान झाले असून शेतकरी संपूर्ण उद्धवस्त झाला आहे. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाने सर्व निकष, जाचक अटी बाजूला सारून पंचनाम्याची वाट न बघता मदत करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री, सचिव यांना पत्र पाठऊन मागणी केली असून मोर्शी तालुक्यात वादळी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, ग्राम पंचायत सदस्य सचिनभाऊ उमाळे, अतुल काकडे, मंगेश होले, मनीष गुडधे, विजयराव विघे, दिनेशभाऊ घोरमाडे, दुर्गेश केचे, उमेशभाऊ शहाणे, शुभम भोकरे, रुपेश अंधारे, यांच्यासह महसूल विभाग, कृषी विभागाचे अधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्शी तालुक्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे संपूर्ण संत्रा शेतीचे नुकसान झाले आहे. शेतात हातातोडांशी असलेली पिके भुईसपाट झाली आहेत. संत्रा पिकांचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. गहू, भाजीपाला आणि संत्रा मोसंबी फळबागानांही मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांपुढे कसे जगावे हा प्रश्न आहे.
शासकीय यंत्रणेने तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी तत्पर असायला हवे. अनेक ठिकाणी या बाबतीत दिरंगाई केली जाते. दुसरीकडे, शासनाकडे मदतीचे प्रस्ताव पाठवूनही त्यावर तत्काळ निर्णय घेतला जात नाही. शेती संकटात असल्याचे वारंवार बोलले जाते, पण शेतीच्या अर्थकारणाला बळकटी आणण्यासाठी पावले उचलली जात नाहीत, ही शोकांतिका आहे — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका .