Home नागपूर भारतीय संविधान : भारतीयांचा खरा श्वास

भारतीय संविधान : भारतीयांचा खरा श्वास

175

भारतीय संविधानाच्या निर्मितीतून नव्या भारताचा उदय झाला. राजेशाही व्यवस्थेचा नायनाट होऊन भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनले .

भारतीय लोकांनी स्वतःच्या मनाप्रमाणे आपले संविधान साकार केले. संविधानाचा खरा प्राण हा भारतीय माणूस आहे .कुणी श्रेष्ठ व कुणी कनिष्ठ नाही. देशाचा कोणताच असा अधिकृत धर्म नाही. भारतीय संविधान हाच देशाचा खरा माणूस निर्माणारा राष्ट्रग्रंथ आहे.

कधी कधी काही अविचारी लोक आपल्या संविधानाला राष्ट्रग्रंथ मानण्यास तयार नाहीत. आमचा धर्मग्रंथ हाच राष्ट्रग्रंथ आहे अशा वल्गना करतात. काही नेते देशाला एका धर्माच्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करतात. रंग हा कोणताही भेदभाव ठेवत नाही . आमच्या धर्माचे राष्ट्र व्हावे अशी ज्यांची इच्छा आहे. त्यांचे मनसुबे भारतीय नागरिक कदापि पूर्ण होऊ देणार नाही.

या देशात दोन विचारधारेत सातत्याने संघर्ष चालत आलेला आहे. एक संघर्ष मानवतेच्या उन्नतीसाठी तर दुसरा संघर्ष स्वः उन्नतीसाठी आहे. मानवतेच्या विचारधारेचा पाया हा तथागत गौतम बुद्ध, चार्वाक,गुरूनानक, संत कबीर, संत तुकाराम , छ.शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजश्री शाहू महाराज ,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामास्वामी नायकर,नारायण गुरू ,संत गाडगेबाबा यांच्या वैचारिक विचारावर आधारित आहे .तर दुसरा स्वः उन्नतीचा पाया हा परंपरा ,एकतंत्र धर्म प्राबल्य, भेदाभेद, जातीयता यावर आधारित आहे. त्याचा पाया हा मनस्मृतीच्या आधारित चातुर्यवरण्याची तरफदारी करणार आहे.

भारतीय संविधानाने भारतीय समाज व्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची ,धर्म व्यवस्थेची, शिक्षण व्यवस्थेची, आर्थिक व्यवस्थेची संपूर्ण रचनाच बदलून टाकली .ज्या व्यवस्थेने इथल्या मूलनिवासींना बंदिस्त केले होते ते बंदिस्त धोरण उध्वस्त केले.” माणूस हा समान आहे व त्यांचे अधिकारी समान आहेत” हा आपल्या संविधानाचा गाभा आहे. पहिली विचारधारा वरील वाक्य सत्य मानते. पण दुसरी विचारधारा” माणूस समान मानतो पण त्यांचे अधिकार समान मानत नाही”. अहंकारी, निरंकुश, दंडेलवृत्ती, हुकूमशाही तंत्र, जोर जबरदस्ती, जाळपोळ, दंगल ,धार्मिक वादंग, जातीयता अशा विकृत कामाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात तो यशस्वी झालेला आहे. कारण पूर्वीची ही राजसत्ता ही भ्रष्टाचारी व घराणेशाही यांच्या अहंकाराने पछाडलेली होती. भारतीय लोकांनी तिला धडा शिकवला.हा भारतीय नागरिकांमधील अत्यंत महत्त्वाचा बदल होता .पण वर्तमान सरकारचे राज्यकर्ते “हम करे सो कायदा ..” या वृत्तीने देशाच्या लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहेत. सांगाडा ठेवून आपल्या विचारधारेचे काम करत आहेत. तसेच ते संविधानद्रौही काम करतात पण “राजा बोले दळ हाले “असे म्हण आहे त्या वृत्ती प्रमाणे प्रधानसेवक बोलतो व सारे मंत्रिमंडळ माना डोलावतात.
काय आम्ही नवा आविष्कार केला आहे. त्याच्या गाजावाजा करतात.

देशातील अनेक समस्या असताना विकासाचे खोटे ढोल पिटत असतात. अनेक पक्षाचे नेते चेले होऊन फिरत असतात. कधी ईडी, कधी सीबीआय तर कधी संविधानिक व्यवस्थेलाच उध्वस्त करण्याचे काम वरील सरकार व नेते करत असतात. यातून देशाचे मोठे नुकसान व्हावे अशी व्यवस्था निर्माण करतात.

आज मणिपूर सतत जळत आहे. बेरोजगाराची गर्दी वाढलेली आहे. सरकारी भरती निकाल लागत नाही. आरक्षण धोरण कुचकामी केल्या जात आहे .वर्तमान सरकारने इथल्या संविधानिक पाया उध्वस्त करण्याचे काम केले आहे. लहान मुलांवर धर्माचा प्रभाव पाडल्या जात आहे. विविधी शाळेमधून वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांचा मेंदू बधीर केला जात आहे. शिक्षकांना नवीन समस्येत गुंतवून ठेवले जात आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे .आम्ही म्हणून ते शिक्षण असे हुकमी व्यवस्था निर्माण होत आहेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थी येणाऱ्या काळात सरकारधार्जीन कसा होईल हीच भूमिका घेतली जात आहे.

कौशल्याच्या नावावर चातुर्य वर्णव्यवस्थेचा उदो उदो केला जात आहे . परंपरा या शब्दामुळे आम्ही श्रेष्ठ आहोत अशी कुचकामी विचार प्रस्तुत केले जात आहेत. मुलांच्या क्षमता विकसित करण्यासाठी कमी अधिक वेळ लागू शकतो पण आमच्या शिक्षण प्रक्रियेतील लोकांना मानसशास्त्राचे ज्ञान कमी असल्याने मुलांच्या डोक्यावर उपक्रमाचा मारा केला जातो आहे. एक ना धड भराभर चिंध्या अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. सरकारी शाळेत ज्या विचारांची गरज होती ते विचार आज नष्ट होताना दिसत आहेत. पारंपरिक व प्राचीन सभ्यतेच्या नावावर देव आणि दैवत यांचा फार मोठा प्रभाव वाढत आहे. विज्ञानाला सोडून आम्हीच खरे विज्ञानवादी अशी अडेलतट्टू भूमिका फोफावल्या जात आहे.

देशाला मोठ्या काळोखात ढकलले जात आहे .भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारावर गदा आणली जात आहे. राजकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जनतेला वेटीस पकडले आहे .भ्रष्टाचाराची नदी वाहत आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे सामान्य माणूस हैरान आहे. पण कोणी बोलायला तयार नाहीत .ऑनलाईन प्रोसेसमुळे कंपण्या मालामाल झालेल्या आहेत .सरकार त्यांच्या पैशावर स्वतःचा विकास करत आहे. जनतेला धोका देत आहे. नव्या कायद्याने कामगाराचे, सरकारी कर्मचारी यांचे शोषण केले जात आहे. भांडवलदारी व्यवस्थेच्या प्रगतीसाठी साऱ्या देशाला अंधकारमय पोकळीत जाणून-बुजून ढकलल्या जात आहे .भारतीय माणूस हे का शहन करतो हे समजत नाही . तो पेटून उठत का नाही ..? क्रांतीची नवी इबादत का रचत नाही.. हे न समजणारं कोड आहे .

ज्या संविधानाने आपल्याला लढण्याचे शस्त्र दिलं त्या शस्त्राचा वापर आपण न करता मुजोर व्यवस्थेचे गुलाम झालो का..? हा प्रश्न मला पडलेला आहे .आजची व्यवस्था आहे ती पुढेही येईल पण तिला आपण पराभूत करू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे .पराभूत करण्यासाठी आपल्याजवळ एकमेव साधन आहे. ते म्हणजे जनआंदोलन होय. हाच उपाय व्यवस्था परिवर्तनाचा मोठा आधार आहे. कोणतीही आक्रमकता न दाखवता जन आंदोलनातून आपण आपल्या देशाला वाचू शकतो.. देशातील हुकुमशाही सरकार आहे त्यांचे मनसुबे उध्वस्त करू शकतो. हे काम भारतीय जनता नक्कीच करेल हा आशावाद मला आहे. आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी कोणत्याही विचारधाराचे विरोध आपला आवाज बुलंद करावा लागेल. कारण प्रधानमंत्रीचे आर्थिक सल्लागार विवेक देबराॅय यांनी २०४७ देशाला नवीन संविधानाची गरज आहे अशी वल्गना केलेली आहे. अत्यंत विकृत मानसिकतेने पछाडलेल्या आर्थिक सल्लागाराला देशाच्या संविधानावर बोलण्याची गरज आजच का आली हे न समजणारे आम्ही मुर्ख नाही.हे वाक्य नेत्याने केले असते तर ठीक आहे. परंतु संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने या स्वरूपात भूमिका मांडणे म्हणजेच सरकारचा गुप्त अजेंडा आहे काय अशी शंका भारतीयांना येत आहे.

भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाचा बदलता येणार नाही ही तत्व प्रणालीच भारतीय संविधानाची पाठराख आहे. तरी २०२४ च्या निवडणुकीनंतर देश कोणत्या रंगात रंगणार हे सांगता येत नाही .देशाला जर वाचवायचा असेल तर अशा विकृत आर्थिक सल्लागाराचा आपण पुरजोरपणे विरोध केला पाहिजे. त्यांच्या डोक्यातील विकृत घाण किती विषमतेने बरबटलेली आहे याची प्रचिती येते.

महाराष्ट्रातही अनेक किडे सातत्याने वळवळत आहेत. त्याला वाटते की मी म्हणजे भारत. त्यासाठी ते तिरंगा सोडून भगवा ध्वज फडकवतात. शक्तिप्रदर्शन करतात. व आमचे वर्तमान सरकार मिंधे होऊन त्यांना पाठिंबा देतात.

ज्या स्वातंत्र्याने इतल्या लोकांना एक लढण्याची जिद्द दिली. तिला नष्ट करू पाहणाऱ्या त्या किड्यांचा बंदोबस्त महाराष्ट्र जनता नक्कीच करेल अशी आशा आहे .याच किड्यांनी महात्मा जोतीराव फुले व इतर समाजसुधारक यांच्यावर आक्षेपार्हत विधान केले होते. त्यांच्या लेखाजोखा आपण मांडल्याशिवाय राहता कामा नये.

आज जनादेशाचा गैरवापर करून भारतीय संविधानाला खुंटीवर बांधून ठेवल्या जात आहे .ज्या संविधानाची शपथ घेऊन नेते पदावर येतात तेच संविधानाची पायमल्ली करतात. त्यांना २०४७ ला नवीन संविधान लागू करण्याची घाई झाली आहे .पण ते हयात पर्यंत असे व त्यांच्या पुढील दोनशे पिढ्या तरी भारतीय संविधान बदलता येणार नाही. तुम्ही नाव बदलू शकता पण संविधानातील माणूस बदलू शकत नाही. स्वातंत्र, समता, बंधुभाव व न्याय हे तत्व तुम्ही नाकारू शकत नाही .ज्या दिवशी हे तत्व तुम्ही नाकारल तेव्हा भारताचे ५० देशात रूपांतर होईल. पुन्हा पारतंत्र्य, पुन्हा गुलामगिरी ,पुन्हा स्वैराचार ,पुन्हा धर्मावाद, पुन्हा जातीवाद, पुरा स्त्री शिक्षणावर बंदी, पुन्हा शुद्राचे शोषण, पुन्हा अंधःकार … फक्त एक श्रेष्ठ बाकी सगळे कनिष्ठ अशा अधिकारावर हा भारत तुटल्या जाईल. आर्थिक सल्ला देणाऱ्या आर्थिक सल्लागाराचे या ठिकाणी पुतळे उभारले जातील. असे होऊ नये म्हणून अशा आर्थिक सल्लागाराच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली पाहिजे. कारण आपणच देशाचे खरे तारणहार आहोत. भारतीय संविधानच भारताला नवी वाट दाखवते म्हणून भारतीय संविधान भारतीयांचा खरा श्वास आहे. नव्या युगाचा क्रांतीसूर्य आहे…

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here