🔸”उरलो जरासा मी ” या कविता संग्रहाचे प्रकाशन
✒️बल्लारपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
बल्लारपूर(दि.17ऑगस्ट):-व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव, मिळालेली माहिती, ज्ञान यांसारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्यांचा उपयोग व्हावा म्हणून त्या जाणिवा शब्दबद्ध करून त्या स्मृती तेवत ठेवणारा हा कवितासंग्रह त्यांच्या स्मृतींचे निरांजन आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. धनराज खानोरकर ज्येष्ठ साहित्यिक ब्रह्मपुरी प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून बोलताना व्यक्त केले.
दिवंगत कवी सुनील कोवे यांच्या “उरलो जरासा मी ” या कवितासंग्रह प्रकाशन बुधवार १६ ऑगस्टला कला वाणिज्य महिला महाविद्यालय सभागृह बल्लारपूर येथे झाडीबोली साहित्य मंडळांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक वैशालीताई बुद्दलवार माजी जिल्हा परिषद सदस्य , भाष्यकार कवी सुनील पोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, एड.हरीश गेडाम माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. श्रावण बाणासुरे संत साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, शालिनी सुनील कोवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी दिवंगत सुनील कोवे यांच्या साहित्य लेखनाच्या कार्याचा आढावा घेतला. ते कवी म्हणून कसे पुढे आले? झाडीबोली साहित्य मंडळाशी त्यांचा सहवास कसा होता? याविषयी सविस्तर माहिती आपल्या प्रस्ताविकेमधून दिली. दिवंगत सुनील कोवे यांच्या अर्धांगिनी शालिनी सुनील कोवे यांनी आपल्या भावपूर्ण मनोगतातून त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात झाडीबोली साहित्य मंडळातील कवी , लेखक. दिवंगत सुनील कोवे यांचा मित्रपरिवार, आप्तेष्ट यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामकृष्ण चनकापुरे यांनी केले तर आभार मंडळाचे तालुकाध्यक्ष कवी प्रशांत भंडारे यांनी सर्व उपस्थित त्यांचे आभार मानले.