आ.डॉ.गुट्टे समर्थकांचा पलटवार : पुन्हा पत्रकार परिषद घेण्याचे आवाहन
अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.20जुलै):-कर्तव्यदक्ष आणि कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या नवनिर्वाचित अध्यक्षांना विचारलं होतं का? तुम्ही जी गरळ ओकताय त्याच्याशी तुमचे नवे अध्यक्ष सहमत आहेत का? तुम्हाला वस्तुस्थिती माहित आहे का? तुम्ही बोलण्यापूर्वी नव्या अध्यक्षांना विचारलं होतं का? मुळात म्हणजे तुम्ही ‘ती’ पत्रकार परिषद नवनिर्वाचित अध्यक्षांना विचारून घेतली आहे का? असे रोखठोक प्रश्न आ.डॉ.रत्नाकर गुट्टे समर्थकांनी आरोपकर्त्या भाजप पदधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवून विचारले आहेत. तसेच तुमच्या मताशी नवे अध्यक्ष सहमत असतील तर त्यांच्या उपस्थित पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन बोला, असे आवाहन सुध्दा केले आहे.
भारतीय जनता पक्षाने परभणी जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून संतोष मुरकुटे यांची निवड केली आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंढे यांच्या कार्यालयात मुरकुटे समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन आ.डॉ.गुट्टे यांचा संतोष मुरकुटे यांच्या निवडीला विरोध होता. असा आरोप करून रासपचा विषय संपला. आगामी विधानसभा उमेदवार संतोष मुरकुटे असतील, असे काही दावे केले होते. त्यामुळे आ.डॉ.रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वरिष्ठ पदधिकाऱ्यांनी शहरातील राम-सीता सदन येथे पत्रकार परिषद घेऊन आरोपकर्त्या मुरकटे समर्थकांना प्रतिउत्तर दिले आहे.
आरोपांवर बोलताना रासपचे प्रदेश उपाध्यक्ष जेष्ठ नेते गणेश दादा रोकडे म्हणाले की, आ.डॉ.गुट्टे यांच्यावर आरोप करणे हा निव्वळ खोडसाळपणा आहे. मी त्या मंडळींना १९९२ पासून ओळखतो. गेल्या ४० वर्षात ती मंडळी ज्यांच्या सोबत असते. त्यांना कधीच गुलाल लागलेला नाही. त्यामुळे त्यांनी आपली क्षमता ओळखून बोलायलं हवं. आपण काय बोलतोय? कोणावर बोलतोय? याचे भान ठेवायला हवे. तसेच उमेदवारी कोणाला द्यावी? कोणाला नाही? याचा अधिकार भाजप श्रेष्ठींनी या मंडळींना दिला आहे का? माझी अशी माहिती आहे की, रासपला आणि आ.डॉ.गुट्टेंना सोबत घेऊन काम करा, अशी सूचनाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या अध्यक्षांना दिली आहे.
झालेली ती पत्रकार परिषद नव्या अध्यक्षांच्या स्वागताची होती की आ.डॉ.गुट्टे यांच्यावर आरोप करण्यासाठी होती? रासप हा भाजपचा सहयोगी पक्ष आहे. भाजपला पडत्या काळात आ.डॉ.गुट्टे यांनी भक्कम साथ दिली आहे. भाजप सोबत जवळपास तीन वर्ष विरोधी पक्षात काढली आहेत. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांची उंची, धोरण, करिष्मा, क्षमता, वलय, जनसंपर्क आणि किमया भाजप श्रेष्ठींना माहिती आहेत. त्यामुळे स्थानिकांनी मर्यादेत राहून बोलायला हवे. साहेबांनी सांगितले आहे, म्हणून आम्ही गप्प आहोत. नाही तर आम्हालाही बोलता येतं, असा शाब्दिक हल्ला मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे यांनी केला.
गंगाखेड विधानसभा हा आ.डॉ.गुट्टे यांचा परिवार आहे. त्यामुळे गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागून महत्त्वकांक्षी व लोकोपयोगी मागण्या पूर्ण होत आहेत. त्यांनी केलेली कामे जनतेला माहित आहेत. जनता त्यांच्या सोबत आणि ते जनतेसोबत आहेत. त्यामुळे आम्हाला निवडणुकीची चिंता नाही. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, त्यांना ती लढवू द्या. तुम्ही ज्यांची उमेदवारी घोषित करीत आहेत, ते २०१९ ते आ.डॉ.गुट्टे यांच्या विरूध्द निवडणूक उभे नव्हते का? असाही टोला रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे यांनी लगावला.
नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत कोणाची किती ‘पत’ आहे. हे जनतेला समजलं आहे. भाजपचे धोरण कुठे ठरते? हे आरोपकर्त्यांनी समजून घ्यायला हवं. आगामी निवडणुकीत त्यांना सहयोगी पक्षाचे समर्थन नको आहे का? यावर नव्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करायला हवी, अशी अपेक्षा पालम प्रभारी माधवराव गायकवाड यांनी व्यक्त केली.
आ.डॉ.गुट्टे यांना कोणताही राजकीय वारसा नाही. त्यांच्या पाच पिढ्यात कुणी साधं ग्रामपंचायत सदस्य नव्हतं. तरीही लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचं नेतृत्व लोकांनी स्विकारलं आणि मातब्बर नेत्यांसमोर विजयी केलं. त्यांनी कुठून निवडणूक लढवली? कसे निवडून आले? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही त्यांची चिंता करू नका. तुम्ही तुमचं बघा. रासपचा विषय संपला की नाही? ते येणारा काळच ठरवेल. परंतु, संयम बाळगा. लोकांची कामे करा. जनतेशी संवाद साधा. जनसंपर्क वाढवा, असाही उपरोधिक सल्ला गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे यांनी आरोपकर्त्या मंडळींना दिला आहे.
दरम्यान, मुरकुटे यांच्या निवडीनंतर आ.डॉ.गुट्टे आणि मुरकुटे समर्थक यांच्यात रंगलेला राजकीय कलगीतुरा कुठपर्यंत जाईल, हे आगामी काळात दिसेल. मात्र, आ.डॉ.गुट्टे समर्थकांच्या आवाहनास प्रतिसाद देवून नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यासह आरोपकर्ते पत्रकार परिषद घेतात का? ते आरोप नव्या अध्यक्षांना मान्य आहेत का? तसेच त्यानंतर आ.डॉ.गुट्टे व समर्थक कोणती भूमिका घेतील? याची उत्सुकता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळास लागली आहे.
यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश दादा रोकडे, जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, उध्दव शिंदे, ॲड.मिलिंद क्षिरसागर, प्रताप मुंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव पोले, स्वीय सहाय्यक बाळासाहेब पवार, एकनाथ गेजगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट क्र.१*
शाब्दिक हल्ल्यात प्रश्नोत्तरांनी रंगत आणली…
‘ती’ मंडळी कोण? असे पत्रकारांनी विचारल्यास, ‘तर तुम्ही अनुभवी पत्रकार आहात. त्यामुळे ‘ती’ मंडळी तुम्हाला माहिती आहेत. असे बेरकी उत्तर गणेश दादा रोकडे यांनी दिले. तर आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना, आम्हाला २०२४ ची नव्हे तर २०२९ ची चिंता आहे, असा उपरोधिक टोला मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे यांनी हाणला. तसेच आ.डॉ.गुट्टे भाजपत जाणार का? यावर साहेब ठरवतील. ते सांगितल ते तोरण आणि ठरवतील ते धोरण, असेही ते म्हणाले. आ.डॉ.गुट्टे यांनी केलेली विकासकामे सांगताना प्रभारी हनुमंत मुंढे यांनी आकडेवारी मांडली. शेवटी, एनडीएच्या बैठकीला रासपला निमंत्रण का नव्हते? यावर बोलताना रासप जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे म्हणाले की, आम्ही फक्त विधानसभेचा विचार करतोय. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडीवर बोलायला आम्ही काय भाजपचे ते पदधिकारी नाहीत. त्यामुळे याबाबत आमचे नेते महादेव जानकर आणि आ.डॉ.गुट्टे हेच सविस्तर उत्तर देतील. परिणामी, शाब्दिक हल्ल्यात प्रश्नोत्तरांनी रंगत आणली.




