Home Education ॲसिड रेन: मानवी जीवनाला अतिघातक!

ॲसिड रेन: मानवी जीवनाला अतिघातक!

161

(ॲसिड रेन- आम्ल वर्षा विशेष)

पाऊस हा नेहमीच किंचितसा अम्लीय असतो जो हवेतील नैसर्गिक ऑक्साईड्समुळेच. त्वचेला स्पर्श करताच त्वचा जळेल, इतकी आम्लता धातू देखील नष्ट करू शकतात आणि आम्ल पाऊसाची कमकुवतता ह्यापेक्षा खूपच कमी असते. त्वचा जळू शकेल इतका आम्ल कधीच पावसाच्या स्वरूपात पडलेला नाही. खाणीमधील तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इत्यादींच्या ज्वलनातून तसेच अशुद्ध सल्फाईड धातूच्या दगडाचे शुद्धीकरण सुरू असते. अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ऑक्‍साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. हे वायू जेव्हा वातावरणातील आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेतून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होते. यानंतर ही आम्ले पावसाच्या रूपाने म्हणजे पाणी, बर्फ किंवा धुक्‍याच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. असा पाऊस म्हणजेच आम्ल वर्षा किंवा ॲसिड रेन होय. अशी महत्वपूर्ण माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींच्या या लेखात जरुर वाचा…

आम्ल वर्षा ज्याला इंग्रजीमध्ये ॲसिड रेन म्हणतात. असा पाऊस आपण कदाचित अनुभवला नसेल, तरी पण या पावसाबद्दल नक्कीच ऐकले असेल. हा ॲसिड रेन काय आहे? पावसाच्या पाण्याला आपण शुद्ध पाणी म्हणतो. या पावसाच्या पाण्यामध्ये काही प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्‍साईड (सीओ-२) अमोनिया- एनएच-३ आणि एनएच-४ असतो. तसेच अल्प प्रमाणात धनभारीत आयर्न (सीए++, एमजी++, के+, एनए+) आणि ऋणभारीत आयर्न (सीएल-२, एसओ-१) असतात. शुद्ध पाण्याचा सामू ७.० असतो. पडणाऱ्या पावसाचे पाणी ज्याला आपण शुद्ध पाणी म्हणतो; त्याचा सामू ५.६ इतकाच असतो. याचाच अर्थ पावसाचे पाणी हे आम्लधर्मी आहे. जेव्हा या पावसाच्या पाण्याचा सामू ५.६ पेक्षा कमी होतो. अशा पावसाला आपण आम्ल वर्षा किंवा ॲसिड रेन असे म्हणतो.

प्रदूषणाचा परिणाम: आम्ल वर्षा होण्यामागे प्रदूषण हा महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक कारखाने आणि वाहने यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होतो. खाणीमधील तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इत्यादींच्या ज्वलनातून तसेच अशुद्ध सल्फाईड धातूचे शुद्धीकरण सुरू असते. अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ऑक्‍साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. हे वायू जेव्हा वातावरणातील पाण्याच्या किंवा आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेतून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल ही दोन जहाल आम्ले तयार होतात. यानंतर ही आम्ले पावसाच्या रूपाने म्हणजे पाणी, बर्फ किंवा धुक्‍याच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. हीच आम्ल वर्षा किंवा ॲसिड रेन होय. जगात जो पाऊस पडतो त्यातील मोठ्या भागात या पाण्याचा सामू ४.० ते ४.५ इतका आढळतो. हा सामू पाहिला तर तो शुद्ध पाऊस पडणाऱ्या क्षेत्रामधील सामूच्या कितीतरी पटीने अधिक आम्लयुक्त आहे. आतापर्यंत आम्ल वर्षा झालेल्यांपैकी सर्वांत जास्त आम्लयुक्त पावसाचा सामू स्क्वाटलंड सामू-२.४, पश्‍चिम व्हर्जिनिया सामू-१.५, लॉस एंजलिस सामू-१.७ हा व्हिनेगार सामू-३.० आणि लिंबाचा रस सामू २.२ पेक्षा कमी आढळला आहे. म्हणजेच तो जास्त आम्लधर्मी आहे असे म्हणू शकतो.

वनस्पतींवर होणारा परिणाम: आतापर्यंतच्या काही संशोधनातील निष्कर्षामध्ये आढळून आले आहे की, जेव्हा कधी एखाद्या भागामध्ये आम्लाचा पाऊस पडतो, त्यातील ७० टक्के भाग सल्फ्युरिक ॲसिडचा तर ३० टक्के भाग हा नायट्रिक ॲसिडचा असतो. या प्रयोगामध्ये इतरही काही निरीक्षणे महत्त्वाची आहेत. आम्ल वर्षा ज्या भागात होते, तेथील सूक्ष्मजीव, प्राणी, वनस्पती आणि नदी-नाल्यांमधील मासे यांच्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. एखाद्या पिकांवर किंवा वनस्पतीवर जेव्हा आम्ल वर्षा होते, अशावेळी विशेषतः झाडाच्या पानांवर लक्षणे दिसतात. यामध्ये पानांवर डाग पडतात, पानांना छिद्रे पडतात, पाने करपून जातात, पाने वेडीवाकडी होतात. काही वेळा पाना-फळांचे वजनही कमी होते, अशा प्रकारची काही लक्षणे दिसून आली आहेत. काही प्रयोगाअंती असे निदर्शनास आले आहे की, आम्ल वर्षा पडलेल्या ठिकाणी काही वनस्पतीच्या बियांची उगवण अतिशय चांगल्या संख्येने झाली तर उलटपक्षी इतर वनस्पतीच्या बियांची उगवण अतिशय कमी झाली.

वनस्पतींवरील रोग आणि सूत्रकृमी यामध्येही पावसाच्या आम्लतेच्या तीव्रतेनुसार विविधता आढळून आली आहे. उदा.ओक वृक्षावरील तांबेरा रोगाचे प्रमाण हे साध्या पावसात पडणाऱ्या रोगांपेक्षा १४ टक्‍क्‍यांनी कमी झाले. वाल पिकाच्या मुळावरील सूत्रकृमींचे निरीक्षण केले असता आढळून आले की, साधारण पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत ज्या ठिकाणी ३.२ सामूची आम्ल वर्षा झाली अशा भागामधील वालाच्या मुळावरील सूत्रकृमीची अंडी सुमारे ३४ टक्‍क्‍यांनी जास्त आढळली. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रयोगांच्या निरीक्षणावरून आपण म्हणू शकतो की, आम्ल वर्षा वनस्पती किंवा पिकांच्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असते. या विषयामध्ये नवीन संशोधन होणे खूप गरजेचे आहे. कारण सध्या हवामान बदलाचे परिणाम सर्वच थरावर जाणवायला लागले आहेत. या आम्ल वर्षाचा वेगवेगळ्या पिकांवर कशा प्रकारे आणि किती परिणाम होतो? तसेच उत्पन्नामध्ये कशी घट येते? त्यावर काही उपाय करता येतील का? अशा बऱ्याच प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

आम्ल पाऊस का होतो? तर नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप, ज्वालामुखी, नैसर्गिक आग, वीज, सूक्ष्मजीव प्रक्रिया यांमुळे वातावरणात सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड सोडले जातात. मानवी कृत कारणांमध्ये उद्योग, वाहनांमुळे, वीज निर्मितीमध्ये सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन होते. उत्सर्जीत झालेले वायू वातावरणाच्या संपर्कात येतात, परिणामी सल्फ्यूरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड तयार होते. हे ॲसिड ढगांमधील पाण्याच्या थेंबांमध्ये विरघळतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर ॲसिड पावसाच्या रूपात पडतात, जे बर्फ किंवा धुक्याच्या रूपात देखील येऊ शकतात.

आम्ल पाऊसाचे परिणाम- आम्ल पाऊस पडलेल्या भागांमधील झाडांमध्ये तो पानांमधून झिरपतो आणि जमिनीखाली जातो. माती मध्ये राहिल्यास मातीस आम्ल तटस्थ (निश्चित गुणधर्मे नसलेली) करण्यास मदत करू शकते.मातीतील पोषक आणि खनिजे विरघळवून जाऊ शकतात, जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. आम्लता काही प्रवाहांमध्ये नदी, तलाव आणि झऱ्यांमार्फत मानवी संपर्कात येऊ शकतो. सरोवर, नदी, तलावांच्या आम्लतेचे जसजसे प्रमाण वाढते तसतसे त्यामधील जीवांना त्याचा त्रास होऊ लागतो. मासे व इतर पाणथळ जीवांची संख्या कमी होते. गोड्या पाण्यातील कोळंबी, गोगलगाय, शिंपले हे आम्लीकरणामुळे सर्वात लवकर प्रभावित होतात आणि त्यानंतर मिनो, सॅल्मन आणि रोच यासारख्या माशांवर परिणाम होतो. एखादी प्रजाती नाहीशी होऊ शकते, तर इतरांच्या प्रजननावर अडथळा निर्माण होऊ शकतो. प्राणी आणि मानवांमध्ये श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आम्ल पाऊसामुळे पाण्याच्या पाईप्सला गंज लागून त्यातील लोह, शिसे आणि तांबे यासारखे जड धातू पिण्याच्या पाण्यात येऊ शकतात. दगड आणि धातूंनी बनलेल्या इमारती आणि स्मारकांचे नुकसान होऊ शकते. आम्ल पावसाचा सर्वाधिक फटका बसतो तो शेतकरी बांधवास. त्यामुळे त्याच्या पिकांचे अतोनात आणि अकल्पित नुकसान होते. शेतकरी जगला तर संपूर्ण जीवसृष्टी जगेल; म्हणून अखिल मानव जातीने आम्ल वर्षा टाळण्यास पाऊले उचलेलीच हितकर ठरतील. हाच यातून अंतिम निष्कर्ष निघतो.

आम्ल पाऊस टाळण्याचे उपाय- कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणांवर आळा घालून कमी उत्सर्जन करण्यावर लक्ष देणे. कारखाने आणि कंपन्यांत ऊर्जेचा वापर कमी करणे. अक्षय ऊर्जा विकसित करण्याच्या उद्देशाने नावीन्यपूर्ण आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार करणे. प्रदूषित हवेच्या नियंत्रणासाठी झाडे लावणे. कारखान्यांनी वापरलेले पाणी नद्यांना परत करण्यापूर्वी ते फिल्टर आणि डिटॉक्स करणे. कारमध्ये आता उत्प्रेरक कन्व्हर्टर बसवणे जे एक्झॉस्ट गॅसेसमधून धोकादायक रसायने काढून टाकतात. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे. पर्यावरणाविषयी जन-जागृती करणे, अगत्याचे आणि अत्यावश्यक झाले आहे, हे येथे उल्लेखनीयच!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.मु. एकता चौक, रामनगर, वॉर्ड नं. २०, गडचिरोली.फक्त व्हॉट्स ॲप- ९४२३७१४८८३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here