🔸विभागीय चौकशीसाठी सरकारच अनुत्साही- वरिष्ठांचे भ्रष्टाचाऱ्यांना पाठबळ
✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नागपूर(दि.19मार्च):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर अनेक प्रकरण उजेडात येत आहेत. येथील निबंधक इंदिरा अस्वार यांनी माहिती अधिकाराच्या पत्रात केलेल्या घोळ प्रकरणात महासंचालकांना कारवाईचे अधिकार असल्याचे पत्र माहिती आयोगाने पाठविल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारच अनुत्सुक दिसत आहे, असा आरोप शेतकरी व कामगार संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजानंद कावळे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून मागासवर्गीयांच्या विकासासाठी पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. या संस्थेतून विविध योजना राबविण्यात येतात. संस्थेच्या लोकपयोगी योजनांमुळे गेल्या दोन वर्षांत राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचली. शहर असे खेडेगाव त्यांना बार्टीच्या योजनांची माहिती आहे. मात्र, येथील काही अधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने माखले आहेत. येथील गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी निबंधक इंदिरा अस्वार यांना माहिती अधिकार प्रकरणात खोडतोड करणे, न्यायालयीनप्रकरणात दिशाभूल करणे, तसेच बार्टीला बदनाम करणे, अशा विविध कारणांनी ठपका ठेऊन त्यांना पदमुक्त केले होते. तसेच त्याची विभागीय चौकशी करण्याचे पत्र २३ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सचिवांना पाठविले होते. या पदमुक्ती प्रकरणी इंदिरा अस्वार यांनी मॅटमध्ये जाऊन त्यावर स्थगिती आणली होती. मात्र, त्यांच्या विभागीय चौकशीचे प्रकरण तेव्हापासून थंडबस्त्यात आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारीच सुद्धा चौकशी करण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून येते, असा आरोपही राजानंद कावळे यांनी केला आहे.
महासंचालकांना कारवाईचा अधिकार माहिती अधिकारातील प्रकरणात चुकीचे माहिती देणे या प्रकरणात कारवाई करण्यासंदर्भात तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी माहिती आयोगाला पत्र पाठवून अभिप्राय मागितला होता. त्यावर राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाने महासंचालकांना कारवाईचे अधिकार असल्याचे पत्र २७ फेब्रुवारी 2023 ला पाठविले आहे. ते पत्र १ मार्च २०२३ रोजी महासंचालकांना प्राप्त झाले. मात्र, तेव्हा श्री. गजभिये हे संत रविदास चर्मकार आर्थिक विकास महामंडळात व्यवस्थापकीय संचालक रूजू झाले. त्यामुळे नवीन महासंचालक सुनील वारे यांच्यावर आता निबंधक इंदिरा अस्वार यांच्यावर कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. मात्र, ते कारवाई करतात की त्यांचा बचाव करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महासंचालकांनी कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी व कामगार संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजानंद कावळे यांनी दिला आहे.