Home नागपूर बार्टीमुळे गवसला विकासाचा मार्ग- महासंचालक धम्मज्योती गजभिये

बार्टीमुळे गवसला विकासाचा मार्ग- महासंचालक धम्मज्योती गजभिये

113

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.24डिसेंबर):- डॉ. बाबासाहेबांचे विचार घेऊन बार्टी काम करीत आहे. गेल्या अनेक वर्षांत अनुसूचित जातीमधील वेगवेगळ्यांचा विकास करण्याचे धोरण राबविले. त्याचे परिणाम दिसू लागले असून हा समाज हा मुख्य प्रवाहात आला आहे. २२ डिसेंबर १९७८ हा बार्टीचा स्थापना दिवस आहे. आज, त्याचा वर्धापन दिवस असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार घराघरांपर्यंच पोहोचविण्यासाठी सरकार बार्टीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली. बार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी जनेतला शुभेच्छा दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि यासंबंधी अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना २२ डिसेंबर१९७८ रोजी समता विचारपीठ नावाने झाली आज२२ डिसेंबर २०२२ रोजी त्या घटनेला ४४ वर्षे पूर्ण होत आहे. या आतापर्यंतच्या प्रवासात बार्टीचे आजचे रूप बघता एका लहान रोपट्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं पाहायला मिळतं. संस्था आता अनेक अर्थानं प्रगल्भ झाली आहे. ज्या विचाराने या संस्थेची स्थापना झाली तो सामाजिक समतेचा विचार घेऊन बार्टी गावपाड्यापर्यंत पोहोचली आहे.

गेल्या दोन वर्षात माननीय महासंचालक यांच्या कल्पकतेतून ठाम निर्धारातून आणि दिलेल्या त्रिसूत्रीतून (सद्भावना, सहकार्य, समर्पण) बार्टीने अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी भरीव कार्य केले आहे. विविध उपक्रम राज्यभर राबविले, अनेक चांगल्या योजना बार्टीच्या माध्यमातून राबविल्या. बार्टीच्या माध्यमातून विविध योजनांची, विविध कौशल्यांची,विविध प्रशिक्षणाची,प्रचार प्रसाराची, संशोधनाची अनेक कार्य अनुसूचित जातीच्या कल्याणाकरिता राबविण्यात येते. बार्टीमार्फत सुरू करण्यात आलेले अनेक प्रकल्प यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींच्या सर्व शासकीय योजनांचे बेंच मार्क सर्वेक्षण, 50000 स्वयंसहाय्यता युवा गट, येरवडा येथे यूपीएससी साठी निवासी प्रशिक्षण केंद्र, प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन येथे बार्टी प्रशिक्षण केंद्र इत्यादी महत्त्वपूर्ण योजना अधिक गतिमान करण्यासाठी महासंचालकांचे विशेष प्रयत्न आहे.

2008 ला स्वायत्तता मिळाल्यापासून संस्थेने अत्यंत भरीव कार्य केले आहे. अनुसूचित जातीला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला हात घालण्याची क्षमता या संस्थेत निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील विषमतावादी समाज रचना नाकारून भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशात नवी समतावादी समाजरचना निर्माण केली.त्यांचे हे कार्य एका जातीपुरते मर्यादित नसून सर्वांच्या कल्याणासाठी होते . दबलेल्या, पिचलेल्या, अन्यायग्रस्त समाजाला आत्मभान देऊन त्यांच्या स्वाभिमानाची ज्योत पेटवण्यासाठी त्यांनी विविध उपेक्षित जातींच्या परिषदा आयोजित केल्या. या परिषदा म्हणजे तत्कालीन अस्पृश्य समाजातील विविध जातीत जिव्हाळा ,बंधुभाव आणि एकोपा निर्माण करण्याचा एक प्रयत्न होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या १३ मातंग परिषदा शोधून काढणे त्यांचे संशोधन संकलन करून ग्रंथरूपाने प्रकाशित व्हावे यासाठी बार्टीचे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील तज्ञ अभ्यासकांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि 13 मातंग परिषदा अभ्यास समिती गठित करण्यात आली. तसेच वंचित मातंग समाजाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या.

त्या अनुषंगाने अण्णाभाऊ साठे पुरोगामी विचार मंचाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबंर सेवा पंधरवडा मध्ये ९०हजार ४९७ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. मंडणगड पॅटर्न विशेष मोहिमेनुसार ११७६१ जात वैधता प्रमाणपत्र समता पर्वात देण्यात आले आणि ही मोहीम यशस्वीरित्या सुरू आहे.या आणि अशा अनेक योजना बार्टी च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येत आहे. अनुसूचित जातीच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टी कटिबद्ध आहे, अशा अनेक योजना बार्टीमार्फत राबवून विकास करण्यात येणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचाल धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here