Home Education जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीनं मृदेचं महत्व!

जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीनं मृदेचं महत्व!

127

(जागतिक मृदा दिन सप्ताह विशेष)

माती परीक्षणानुसार खताचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे व पिकांचे उत्पादन वाढणे व खर्चाची बचत होणे यांस मदत होणार आहे. सर्व जिल्ह्यात मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविणे आवश्यक असून यामध्ये बागायत क्षेत्रातून २.५ हेक्टरला १ प्रातिनिधीक मृद नमुना व जिरायत क्षेत्रातून दहा हेक्टरला एक प्रातिनिधीक नमुना घेतला जावा व त्या परीघ क्षेत्रामध्ये सामाविष्ट सर्व शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्यात याव्यात. या मागणीसह माहितीपूर्ण असा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींचा हा सुंदर लेख शेतकरी बांधांच्या सेवेशी समर्पित… संपादक.

रासायनिक खते आणि किटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जगभरातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे माती- मृदेच्या जैविक गुणांचा ऱ्हास होत आहे, मातीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम जगातील अनेक देशांच्या अन्नसुरक्षेवर झाल्याचं दिसून आलंय. भारतातही मृदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. मृदेच्या संवर्धनासाठी भारत सरकारतर्फे सन २०१५ साली सॉइल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मृदेचे स्वास्थ्य टिकवणे, शेतीच्या शाश्वत विकास करणे आणि त्याद्वारे अन्नसुरक्षा करणे हा उद्देश आहे. आपल्यासाठी का महत्वाचा आहे जागतिक मृदा दिवस? मृदेचे स्वास्थ्य टिकवणे आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनेच्या प्रक्रियेसाठी जागरुकता निर्माण करणे हा उद्देश जागतिक मृदा दिवस साजरा करण्यामागे आहे. माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे.

या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणे यांसाठी हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा मातीद्वारेपूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही. माती कारखान्यांत तयार होत नाही.

माती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पाऊस व पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर झाला. खडकांची झीज होऊन माती तयार झाली. लाखो वर्षे ही प्रक्रिया सुरू होती. साधारण १ सेंमी मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष प्राण्यांची विष्टा, कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात. सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते. अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते. जमिनीतील दहा ते पंधरा सेंमी मातीचा थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग असतो.

दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. अलिकडच्या काळात शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरण आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी आठशे ते हजार वर्षांचा कालावधी लागतो. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने सन २०१३ साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन- एफएओ अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केलं जातं.

शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणसांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याचा उद्देश त्यामागं आहे. दरवर्षी मृदा दिवस साजरा करताना एक वेगळी थीम तयार केली जाते आणि वर्षभर त्या आधारे मृदा संवर्धनासाठी जागरुकता केली जाते. जसे- “कीप सॉइल अलाइव्ह, प्रोटेक्ट सॉइल बायोडायव्हर्सीटी!” म्हणजे मृदेला जिवंत ठेवा, मृदेच्या जैवविविधतेचे संरक्षण करा. त्या अशाप्रकारच्या थीम्स असतात.
भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, धरण, रस्ते, आदी विविध कारणांमुळे सुपीक जमीन जात असल्याने लागवडीलायक क्षेत्रात घट होत आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस आदी कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. जमिनीची धुप झाल्यामुळे सुपीक माती वाहून जाते.

सुपीक जमिनीबरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाळू, खडकांचे बारीक तुकडे वाहत येतात व सुपीक भागात पसरतात. यामुळे सुपीक जमीन नापिक होण्याची शक्यता असते. मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती साधली, तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करू शकत नाही हे वास्तव आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. भविष्यात जमीन आरोग्याचे निदान करण्यासाठी माती परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्यच होणार असून या पुढील काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे गंभीर परीणाम फक्त शेतीवरच न दिसता मानवी शरीर आणि प्राणी इत्यादींना सुद्धा जाणवणार आहेत. ते लक्षात घेऊनच केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राज्यात मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रम सन २०१५-१६पासून राबविण्यांत येत आहे. या कार्यक्रमात टप्प्याटप्प्याने आगामी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व गावांची निवड करुन सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. मृद आरोग्य पत्रिकेमध्ये जमिनीतील उपलब्ध अन्न द्रव्यांचे प्रमाण समजणार आहे. या बाबतच्या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना विविध पिकाना योग्य प्रमाणात संतुलीत खते देण्याकरीता होणार आहे. माती परीक्षणानुसार खताचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे व पिकांचे उत्पादन वाढणे व खर्चाची बचत होणे यांस मदत होणार आहे.

सर्व जिल्ह्यात मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविणे आवश्यक असून यामध्ये बागायत क्षेत्रातून २.५ हेक्टरला १ प्रातिनिधीक मृद नमुना व जिरायत क्षेत्रातून दहा हेक्टरला एक प्रातिनिधीक नमुना घेतला जावा व त्या परीघ क्षेत्रामध्ये सामाविष्ट सर्व शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्यात याव्यात.

मृदेचं महत्व- मृदेचं संरक्षण म्हणजे संपूर्ण सजीवांचं संरक्षण असाच अर्थ होतोय. जगातील ९५ टक्के अन्नधान्य मृदेच्या माध्यमातून येतं. तसेच मृदेत पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी २५ टक्के सजीव आसरा घेतात. फळे, भाज्या आणि अन्नधान्याची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवरुन ठरते. सद्या या मृदेच्या संवर्धनासमोर वातावरण बदलाचं मोठं आव्हान उभं आहे. मृदा प्रदूषण टाळायचं असेल तर काय करावं? अलिकडे मोठ्या प्रमाणावर मृदेचं प्रदूषण होताना दिसतंय. ते टाळायचं असेल तर काही पाऊलं उचलली पाहिजेत. प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे. त्या ठिकाणी पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करायला हवा. आपल्या वाया जाणाऱ्या खाद्य पदार्थांचं रुपांतर कंपोस्ट खतात करायला हवं. शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन आणि जमिनीची सुपिकता यांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सेंद्रीय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलित खत पुरवठा, पीक फेरपालटीचा अभाव इत्यादीमुळे जमिनींचे गुणधर्म बदलत असून मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. जमिनीची सुपीकता खालावत चाललेली असून तिचे आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे.

सेंद्रीय कर्बाचे जमिनीतील प्रमाण गांभीर्याने घटत चाललेले आहे. हवामान बदलाचा परिणाम म्हणून काही विपरीत बदल देखील जमिनीच्या गुणधर्मात होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी वापरण्यांत येणाऱ्या किंमती निविष्ठांचा प्रभावी वापर होत नसून फक्त खर्चात वाढ होऊन शेतीचा किफायतशीरपणा कमी होत आहे. वर्षानुवर्ष शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पुर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणांत उपलब्ध होते व ते जमिनीत टाकण्याचे प्रमाणसुद्धा जास्त होते. त्यामुळे जमिनीत पोत टिकण्यांस आपोआपच मदत होत असे. देशाची लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याची गरज वाढू लागली त्या प्रमाणात शेतामधून अधिक उत्पादन वाढविण्याकडे कल वाढत गेला. हरित क्रांतीनंतर अधिक उत्पादन देणाऱ्या तसेच संकरीत वाणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत गेला. अधिक उत्पादन देण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. सिंचनाच्या विविध सोयी उपलब्ध झाल्यामुळे बागायत क्षेत्रात सर्व हंगामात पिके घेण्यात येऊ लागली. पर्यायाने पीक घनता वाढून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. तसेच रासायनिक खतांच्या किंमती वाढल्यामुळे शेतकरी कमी किंमतीच्या खतांचा वापर करू लागला. रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे काही मुलद्रव्यांची जमिनीत कमतरता जाणवु लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करुनही उत्पादकता वाढीस मर्यादा आलेल्या आहेत.

जमीन हा मर्यादीत स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करुन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरज आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवणे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. सर्व शेतकरी बंधुना विनंती आहे की, आपण आपल्या शेत जमिनीचे नियमीत माती परिक्षण करून आपल्या जमिनीची सुपिकता जाणून घ्यावी व त्यानुसारच पिकांना खताची मात्रा द्यावी. जेणे करुन जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवून आपणास आधिक उत्पादन घेता येईल व जमीनीच्या आरोग्याबरोबरच मानवी आरोग्याचेही जतन होईल. चला तर मग, आपण सारे मिळून शासनाच्या मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रमात सहभागी होवून साजरा करुया मृदा दिवस!

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय मृदा दिवसाच्या आठवडाभर सर्वांना सजगतेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️शेतकरीपुत्र:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी-अलककार.गडचिरोली, मधुभाष- ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here