✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.2डिसेंबर):– तालुक्यातील चिंचपुरा – मुसळी येथे बस थांबा असून सुध्दा बस थांबत नाहीत. बस वेळेवर न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अपडाऊन करणाऱ्या व्यक्तींना देखील याचा त्रास नेहमीच सतावत असतो. अधिक माहिती घेतली असता असे लक्षात आले की, धुळे आगार वरून सुटणाऱ्या अनेक गाड्यांना चिंचपुरा – मुसळी येथे थांबाच नाहीये.
तिकिट काढणाऱ्या मशीनमध्ये पिंप्री नंतर डायरेक्ट पाळधी चा पर्याय उपलब्ध असतो यामुळे कुठेतरी शासनाच्या ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ या वाक्याची पायमल्ली होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या दोन्ही गावांना बस थांबली पाहिजे, धुळे आगार वरून सुटणाऱ्या गाड्यांच्या वाहकाजवळ मशीनमध्ये या गावांचा देखील पर्याय उपलब्ध करून द्यावा, प्रत्येक थांबा लक्षात घेऊन बस थांबवावी.
यासंदर्भात धरणगाव बस स्थानक चे वाहतूक नियंत्रक प्रल्हाद चौधरी यांच्याकडे डिगंबर जयराम पाटील यांनी लेखी निवेदन सादर केले. याप्रसंगी संभाजी शंकरराव सोनवणे, दिलीप जगन्नाथ पाटील, सुनिल अर्जुन माळी, विवेक प्रकाशराव पाटील, दिपक प्रकाश मराठे, सुरज किसन वाघरे, लक्ष्मण प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.