Home Education महापरीनिर्वाण दिनानिमित्य जत्रा नको, खरी आदरांजली हवी!

महापरीनिर्वाण दिनानिमित्य जत्रा नको, खरी आदरांजली हवी!

304

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनीची जत्रा नको,खरी आदरांजली हवी!. ६ डिसेंबर २०२२ ला 66 वर्ष पूर्ण होत असताना.जिवंत पाणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती, त्याही पेक्षा जास्त आज भीती त्यांच्या विचारांच्या लोकांकडून मनुवाद्याना वाटत आहे. तरी हा मागासवर्गीय समाज पूर्ण पणे आंबेडकरी विचार स्विकारत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या क्रांतिकारी घोषणा,प्रतिज्ञा म्हणजेच त्यांनी दिलेला कोणता ही मंत्र आज समाजात पूर्णपणे रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत असतांना ही भिती कायम आहे.त्यामुळे आम्ही बाबासाहेबांना मानणारे लोक खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही. आणि खूप मागे ही राहलो असे म्हणता येत नाही. म्हणूनच ६६ वर्षा नंतर ही खरी श्रद्धांजली आदरांजली अर्पण करणारा भिमसैनिक, भिम अनुयायी शिष्य दिसत नाही. तर जत्रेतील हवसे, गवसे, नवसे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यांचे आत्मचिंतन परीक्षण निपक्षपाती करणारे असे विचारवंत, साहित्यिक सत्य शोधन करणारे लेखक निर्भीडपणे आणि निडरपणे लिहणारे पुढे येत नाही. मी दरवर्षी त्या प्रमाणे लिहण्याचा प्रयत्न करत असतो.

डॉ. बाबासाहेबाचा पुतळा, चबुतरा असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारा समोर गणपती, नवरात्र उत्सव आता उघडपणे मोठ्या उत्सवात साजरा होते. मातृसंस्थाचे प्रशिक्षक उपासक उपाशिका हताश पणे त्याकडे पाहतात. स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्म समभावच्या राजकीय मंत्राचा मना पासून आदर करण्याचा आव आणतात. त्यामुळे आम्ही “बुद्ध आणि त्याचा धम्म” हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण समाज व चळवळ दिशा हीन झाली आहे. कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही.त्यामुळेच महापरीनिर्वाण दिनीची जत्रा नको,खरी आदरांजली हवी!.असे मी जाहीर आवाहन करणारे लिहतो.

डॉ.बाबासाहेबांनी जीवन भर जो संघर्ष केला. आणि त्यांनी आपल्याला जो जो महत्वाचा संदेश दिला त्यातून आपण काय घेतले हे कोणीच सांगत नाही. बाबासाहेबांनी कोणते असे क्षेत्र सोडले नाही,ज्यात त्यांनी आपला ठसा कायमस्वरूपी कोरून ठेवला आहे. त्यांना मानणारे अनुयायी आपसात शत्रू बनून गटबाजी करून भांडत राहतात. त्यामुळेच कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होतांना दिसत नाही. एका बाजूला आम्ही मनुवाद्यांना शत्रू म्हणून लांब ठेवणार कि मित्र म्हणून जवळ करणार? त्यांच्या आर्थिक मदतीवर किंवा सामाजिक सलोख्यावर आम्ही राजकीय लढाई कशी लढणार? मोठे नेते, कार्यकर्ते, पत्रकार, विचारवंत, साहित्यिक योग्य मदत सहकार्य घेऊन सुरक्षित नोकरी करून, प्लॉट,टॉवर, बांगला असा सुरक्षित ठिकाणी राहतील,पण खेडया पडयातील व शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या समाजाचे काय?. यांनी बाबासाहेबांचे प्रामाणिक शिष्य किंवा भक्त म्हणून शासन कर्ती जमात बन्या करीता मतदार म्हणून कोणाला मतदान करावे?. हा प्रश्न कायम निकालात निघाला.

आपल्या समाजातील शत्रू पक्षात असलेल्या मित्राला कि मित्र पक्षातील शत्रूला?. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरी निर्वाण दिना निमित्याने लाखोच्या संख्येने जत्रेत येणार कि त्यांच्या क्रांतिकारी विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार ? एक ना धड भारा भर चिंद्या करणाऱ्या गट बाजांना कधी यांचे मुख्य उद्दिष्ट कोणते? यांचे राजकीय उद्धिष्ट कोणते? हे जाहीरपणे विचारणार आहोत कि नाही? यांचा विचार कोण आणि कधी करणार?.शत्रू सहा सात वर्षात राज्यातील केंद्रातील राजकीय सत्ता हातात घेऊन संविधानाने दिलेले सर्व मूलभूत अधिकार नष्ट करीत असतांना आम्ही फक्त एक दिवसाचे शक्ती प्रदर्शन करून पुन्हा पुन्हा गटबाजीत गुंग राहणार आहोत काय ?आजच्या परिस्थितीत आंबेडकरी विचारांच्या पक्षाला सुवर्ण संधी देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात असलेल्या सर्व मागासवर्गीय समाजाला विश्वास देऊन राजकिय सत्ता परिवर्तनास सज्ज झाले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरानीं असंघटीत अशिक्षित शोषित अस्पुष्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वता भोगल्या. आपण उच्च विद्याविभूषित झाल्या नंतर ही चातुर्वण्य मानणाऱ्या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही. तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित शोषित समाजाची काय अवस्था असेल?.या चिंतेने ते सतत तळमळत होते. यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल पेटविण्या साठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला. इंग्लंड, कोलंबिया सारख्या साता समुद्राच्या पलीकडे परदेशात उच्च विद्याविभूषित होऊन कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय, हक्क व प्रतिष्ठे साठी रस्तावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला. आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता. त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद, संघटना व राजकीय दबाव याचा समाजा करिता एक हत्यार म्हणून वापर केला.पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधी अंगीकार केला नाही.

कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले. आजचे नेते एका आमदार, खासदारकी साठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करतात. तीच परिस्थिती धम्मभूमी दीक्षाभूमी चैत्यभूमी च्या वापराची झाल्यामुळेच भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकारांचे संविधान आमच्या समाजाच्या संस्था,संघटनांना का लागू होत नाही. एक घटना, एक नियम, एक नेता, एक झेंडा का लागू होत नाही.ज्यांचे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून येण्याची औकात नाही तो संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिरवतो त्यांना प्रथम धडा शिकविला पाहिजे. समाजात ते होत नसल्यामुळेच चमचे, दलाल,अडते कंत्राटी नेते निर्माण होत आहेत.

त्याकाळी हिंदू धर्माच्या चातुर्वण्य व्यवस्थेमुळे मागासवर्गीय शोषित समाज मानसिक दृष्ट्या पंगु बनला होता.उच्चवर्णीयनी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखंडत त्याला भोला भक्त (अंधश्रद्धा) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दिन अस गुलामीच जीवन जगणे भाग पडल्या जात होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापार प्रयत्न केला.पण बदल होत हे लक्षात आल्यामुळे त्यांनी मनुस्मृती जाळली, महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष म्हणजे पाण्याला आग लावली, नाशिक काळाराम मंदिर प्रवेश महणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान केले होते. चातुर्वण्य समाज व्यवसस्थेवर घणाघाती घाव घातले होते,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्ष्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी १९३५ ला येवले येथे धर्मातराची घोषण आणि प्रतिज्ञा केली.पिढीत शोषित समाजाला स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविला. आणि आज खरेच मागासवर्गीय शोषित समाजात जास्तीचाच बद्दल झाला. त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभाव चा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती. आज सर्व आंबेडकरी समाज वस्त्यातील बाल्लेकील्यात शेणखत काढून पोट भरणारयाची पोर खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाली. विविध पक्षाच्या सेल आणि होलसेलचे कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जातात. त्याचे ऐतिहासिक काम हेच कि बाबासाहेबाच्या सर्व संस्था, संघटना,पक्षात फुट पडून वाटोळे करणे.

माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे. माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते. यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती .ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती. त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मनलावून अभ्यास केला.नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही “बुद्ध आणि त्याचा धम्म” वाचतो.) त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे हिंदुच्या विजया दशमीला धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक धार्मिक क्रांती केली. आणि १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली. धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुर्वण्य समाज व्यवस्था मानणाऱ्या ढोगी लोकांना दाखवून दिला.धर्म म्हणजे निव्वळ वर्तुनुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे. धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नव्हे.ईश्वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोई पासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळुन आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये. तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रध्दा भिन्नभिन असल्या तरी प्रत्येकांने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे.

या साठी धर्माने आपल्या भक्तांना अनुयायांना उतेजन दिले पाहिजे जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं ?.या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धर्म (धम्म) आहे. याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला,आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता “सर्वधर्मसमभाव “ची फोडणी देण्याचा केविलवाना प्रत्यन करीत आहेत.

बुद्धाचा धम्म मानवतावादी, विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे. मैत्री, करुणा व शांततेवर जोर देतो. जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो. शिल,सदाचाराची शिकवण देतो. या धर्मात धम्मात ईश्वराला, काल्पनिकतेला,कर्मकांड,व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाज यात कमी दिसते सर्वच राजकीयदृष्ट्या सर्वधर्मसमभाव चा मागे जाताना दिसतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि समाजातील बंधुभाव संपला आहे हे सिद्ध होतांना दिसत आहे. याचा गांभीर्याने ६६ व्या महापरीनिर्वाणदिनी विचार झाला पाहिजे. म्हणूनच महापरीनिर्वाण दिनीची जत्रा नको,खरी आदरांजली हवी!. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम.

✒️आयु.सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here