Home महाराष्ट्र सत्यशोधक विचारांची तडपती तलवार प्रबोधनकार ठाकरे

सत्यशोधक विचारांची तडपती तलवार प्रबोधनकार ठाकरे

458

महाराष्ट्राचे विशेष मुंबई ठाण्याचे मराठी माणसांचे ह्र्दय सम्राट बाळ ठाकरे. ६ डिसेंबर १९९२ ला कारसेवकांनी बाबरी मशीद पाडल्या नंतर सर्व रात्रदिवस जनांदोलन करणाऱ्या नेत्यांनी हात वर केले होते.तेव्हा बांद्रा येथील कलानगरच्या मातोश्री वरून याच सम्राटांनी बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पडली त्याचा मला गर्व आहे.मी त्याची जबाबदारी घेतो.हे जाहीरपणे सर्व वृत्तवाहिन्यांना सांगितले होते.तेव्हा पासून बाळ ठाकरेचे हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे झाले होते.देश विदेशातील पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी येत होते.देशातील हिंदू संघटनाचे साधू संत,महंत महाराज बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मुंबई येत होते.आर एस एस प्रणित संस्था संघटना आणि भाजपच्या सर्वोचपदी असलेल्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन घेऊन राम मंदिर बनविण्यासाठी आशीर्वाद मांगत होते.त्यामुळेच देशातील कट्टरपंथीय हिंदू संघटना व पक्ष म्हणून शिवसेनेचे नांव देशभर झाले होते.ते मनुवादी आर एस एस प्रणित भाजपला खूप डोईजड झाले होते.हे आता लपून राहिले नाही.

त्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नांव व पक्ष कायदेशीररीत्या संपविण्याचे काम पेशवाईचे वारसदार यांनी करून दाखविले.आज परिस्थिती वेगळी आहे.बाळ ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांची चिरंजीव आहेत.पण विचारांचे वारसदार होऊ शकले नाही.ते काम उद्धवजी बाळासाहेब ठाकरे करीत आहेत.बाळ ठाकरे यांनी शिवसैनिकांना प्रबोधनकार ठाकरे त्यांनी स्वीकारलेला राजर्षी शाहूमहाराज,महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर कधीच सांगितला नाही.त्यांचे पुस्तके कधीच शिवसैनिकांना वाचायला दिले नाही.हे ऐतिहासिक कार्य माननीय उद्धवजी ठाकरे प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या 49 व्या स्मृतीदिना निमित्याने प्रबोधनकार डॉट कॉम या नव्या स्वरूपातील संकेतस्थळाचे लोकार्पण रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता शिवाजी मंदिर दादर येथे उद्धवजी ठाकरे व एड प्रकाश यशवंत आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.आणि या प्रबोधनकार डॉट कॉम चे संपादक हे सचिन परब आहेत.इतिहास वाचणाऱ्यांना सचिन परब काय आहेत हे सांगण्याची गरज नाही.

म्हणूनच प्रबोधाकार ठाकरे यांचे नातु आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु या निमित्याने एका क्रांतिकारी विचारधारेने जवळ येत आहेत.तो आदर्श शिवसैनिकांनी भिमसैनिकानी घेतला तर देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, विशिष्ट समाजाची रोजगार हमी नष्ट झाल्या शिवाय राहणार नाहीत.

आजच्या शिवसैनिकांना प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील उद्धवजी ठाकरे व राज ठाकरे यांचे आजोबा हेच माहिती आहेत. पण सत्यशोधक विचारांची तडपती तलवार प्रबोधनकार ठाकरे होते हे माहिती नाही.प्रबोधनकार केशव ठाकरे लिखित देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे आजच्या काळात एक विद्रोही लिखाण आहे.तेव्हा ते प्रबोधन म्हणूनच मानल्या जात होते. देवळे,धर्म,आणि त्यांच्या मागील तथ्य,तर्क आणि वितर्क यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण यात आपणास वाचायला मिळते. देव हि कल्पना आहे कि सत्य याचा विज्ञान युगात पुनर्विचार करण्यास भाग पडणारे असे पुस्तक होते.आणि आहे.

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (जन्म : १७ सप्टेंबर १८८५, आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३) हे मराठी भाषेचे पत्रकार, क्रांतिकारी विचारांचे समाजसुधारक,वक्ते, संयुक्त महारष्ट्र राज्य चळवळीचे पुढारी होते. केशव सीताराम ठाकरे यांचे महात्मा ज्योतिबा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाज सुधारणां बाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले होते. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली होती. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राम्हण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्न असो, ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले होते. त्यांच्या लढ्यापासून,तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता. अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व,लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी तिव्र संघर्ष करून लढा दिला होता.हा इतिहास सांगितला जात नाही.

समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे ठाम मत होते. धार्मिक पूजेचे विधी,उपासतापास,व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला होता. पुरोगामी,उदारमतवादी,सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली.त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहूमहाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.

मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जात होता. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाज सुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते.आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत,पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते.

प्रबोधनकार हे लेखक,पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी,लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार,भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे,ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप,वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास,संत गाडगे महाराज,रंगो बापूजी,पंडिता रमाबाई,माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाज सुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटक,वक्ते आणि नेतृत्व करणारे सत्यशोधक विचारांची तडपती तलवार प्रबोधनकार ठाकरे होते.हा सर्व क्रांतिकारी इतिहास आपणास २० नोव्हेंबर २०२२ नंतर प्रबोधनकार डॉट कॉम वर वाचायला मिळणार आहे. त्यांच्या ४९ स्मृती दिना निमित्याने त्यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रतिमेला त्रिवार अभिवादन.

✒️सागर रामभाऊ तायडे(भाडूप,मुंबई अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना.संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here