अहमदनगर (प्रतिनिधी) सातत्याने बरीच वर्षे एखादी साहित्य चळवळ चालवणे आणि ती टिकवून ठेवणे ही खूप अवघड गोष्ट आहे. अशा परिस्थितीत गेली वीस वर्षे शब्दगंध साहित्यिक चळवळ अखंडपणे सुरू आहे.ही अभिमानाची गोष्ट आहे. असे प्रतिपादन मराठीचे अभ्यासक, साहित्यिक प्रा.डॉ. मिलिंद कसबे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ७ व ८ ऑक्टोबर रोजी स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी वॉरियर्स एज्युकेशन सेंटर मध्ये आयोजित सूत्रसंचालकांच्या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सप्तरंग चे अध्यक्ष डॉ.श्याम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस संस्थापक सुनील गोसावी,खजिनदार भगवान राऊत,प्रा.पॉल भिंगारदिवे,प्रा.डॉ. दिलीप गायकवाड, राजेंद्र पवार, कवी मारूती सावंत इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ.कसबे म्हणाले की, नगर जिल्हाला अनेक संवेदनशील लेखक कवी साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि कलावंतांची मोठी परंपरा आहे. या सर्वांना सोबत घेऊन शब्दगंध ची वाटचाल सुरू आहे, लेखक, कवी, साहित्यिक आपल्या लेखनाच्या दृष्टीने अधिक प्रगल्भ व व्यापक होण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले पाहिजे. सध्याच्या काळात आपली वैचारिक उंची वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लेखक विचारवंत, कलावंत आणि कार्यकर्ते हे आता लोकशाहीचे चार महत्वाचे खांब आहेत.हे खांब अधिक मजबूत करुन लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी शब्दगंध ने पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.
भगवान राऊत यांनी पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालना विषयी मार्गदर्शन केले. सुनील गोसावी यांनी संमेलना मागची भूमिका विशद केली. शब्दगंध च्या वतीने प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांचा शाल, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.बबनराव गिरी यांनी सूत्रसंचालन केले.सरोज आल्हाट यांनी आभार मानले.
या कार्यशाळेस सुरेखा घोलप, वर्षा भोईटे, शर्मिला रणधीर, संगीता गिरी, विश्वास गायकवाड, दशरथ शिंदे, हर्षली गिरी, प्रा.डॉ. संजय दवंगे यांच्यासह शब्दगंध चे कार्यकर्ते उपस्थित होते.




