Home लेख रविवारची सुट्टी: कामगारांच्या हक्काची सुट्टी ...

रविवारची सुट्टी: कामगारांच्या हक्काची सुट्टी (9 जून: आठवडी सार्वजनिक रविवार सुट्टी मंजूर दिन.)

94

 

 

_नारायण मेघाजी लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुटीसाठी लढा दिला, मागणी रेटून धरली, दि.९ जून १८९० रोजी ती मंजूर करून घेतली आणि दि.१० जून १८९० पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली. जी आजपर्यंत चालू आहे. गिरणी कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी. दुपारी, कामगारांना अर्धा तास सुट्टी मिळावी. या मागण्या मान्य करून घेतल्या. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा हा संकलित महत्त्वपूर्ण लेख कष्टकरी वर्गाला सविनय समर्पित… संपादक._

रविवार हा आठवड्यातील एक वार आहे. सोमवारपासून मोजला तर हा आठवड्यातील शेवटचा, म्हणजे सातवा दिवस येतो. भारतात हा वार रवीचा म्हणजेच सूर्याचा दिवस समजला जातो. त्यामुळे याला आदित्यवार (आदित्य=सूर्य) किंवा बोली भाषेत आइतवार म्हंटले जाते आणि इंग्रजीत संडे. ज्या ज्या देशावर कधी काळी ब्रिटिश सत्ता होती, त्या त्या देशात रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. शिक्षणसंस्था, कार्यालये आणि बँका या दिवशी बंद असतात.
एके काळी भारतात कामगारांना रविवारची सुट्टी नसे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत इ.स.१८८४मध्ये बॉंबे मिल हॅंड्स ही भारतातली पहिली कामगार संघटना स्थापन केली. त्यांनी त्या काळच्या फॅक्टरी कमिशनकडे अनेक मागण्या केल्या. त्यातली रोजच्या कामातली अर्ध्या तासाची जेवणाची सुटी आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी या दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या. त्यासाठी दि.२४ एप्रिल १८९० रोजी हजारो कामगारांचा मोर्चा निघाला होता. अखेर दि.९ जून १८९० रोजी प्रस्तावाला मंजूरी देवून दि.१० जून १८९० पासून दर रविवारची सुट्टी देण्याचे गिरणी मालकांनी सुरू केले. सन २०१५ साली १० जूनला या रविवारच्या सुट्टीचा १२५वा वर्धापन दिन साजरा झाला. पुण्यात रविवार हा मिसळवार म्हणून ओळखला जातो. पाश्चात्त्य कल्पनेप्रमाणे आठवड्याचा पहिला वार परंतु व्यावहारिकदृष्ट्या शेवटचा वार. या वाराचे नाव बहुतेक सर्व देशांत सूर्यवाचकच आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रीय कल्पनेनुसार या दिवशीच्या सूर्योदयापासून पहिल्या होऱ्याचा अधिपती सूर्य असतो. जगात सर्व ठिकाणी सूर्याला देवताच मानतात. जैन धर्मात नऊ वर्षे केले जाणारे एक व्रत आषाढमासाच्या शेवटच्या रविवारपासून पुढे ९ रविवार चालते. मुसलमान बांधव दर चांद्रमासातील पहिल्या रविवारी मंत्र-तंत्र करतात. काही ख्रिस्ती पंथ रविवार हा प्रभूच्या प्रार्थनेचा व विश्रांतीचा दिवस म्हणून पाळतात. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा साप्ताहिक स्मृतिदिन म्हणून सर्वच ख्रिस्ती लोक रविवार हा प्रार्थनेचा दिवस पाळतात. कॉन्स्टंटाइन या सम्राटांनी आज्ञापत्र काढून रविवार हा सुटीचा दिवस ठरविला. ईस्टरच्या अलीकडचा रविवार पामसंडे म्हणून प्रसिद्ध आहे. ख्रिस्तांचा जेरूसलेममध्ये विजयी प्रवेश झाला, तेव्हा त्यांच्या मार्गावर पामवृक्षाच्या फांद्या पसरल्या होत्या. म्हणून याला पामसंडे म्हणतात. रविवार विशेष शुभ मानला जात नसल्याने कोणताही उपक्रम या दिवशी सुरू करीत नाहीत. मात्र या दिवशी दृष्टिदोष दूर करणारी यंत्रे वापरून उपचार करण्यास हरकत नसते, असे मानतात.
रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे (१८४८-१८९७) हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते. १९व्या शतकात कापड गिरणीच्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर जातीय आणि सांप्रदायिक मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या धाडसी पुढाकारासाठीही त्यांची आठवण ठेवली जाते. याशिवाय सन १८९५मध्ये हिंदू-मुस्लिमांदरम्यान झालेल्या दंगलीत केलेल्या कामाबद्दल त्यांना रावबहादूर ही पदवीही देण्यात आली होती. तत्कालीन ब्रिटिश भारत सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान देऊन सन्मानित केले होते. भारत सरकारने सन २००५मध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट जारी केले.
नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा जोतिराव फुले यांचे प्रमुख सहकारी होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कण्हेरसर येथील माळी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण हायस्कूलपर्यंत झाले होते. त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई होते. गोपीनाथ नावाचा त्यांना एक मुलगा होता. सन १८७४मध्ये माहिती मिळाल्यानंतर ते सत्यशोधक चळवळीचे सदस्य झाले. सन १८८०पासून त्यांनी मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दीनबंधूचे व्यवस्थापन हाती घेतले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर त्यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवड्याची सुट्टीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन दि.२३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली आणि समाजसेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्यासह महात्मा फुले यांनी मुंबईतील कापड कामगारांच्या सभांनाही संबोधित केले. त्यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुटीसाठी लढा दिला आणि दि.९ व १० जून १८९०पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली जी आजपर्यंत चालू आहे. एन.एम.लोखंडे यांच्यामुळे गिरणी कामगारांना मिळालेले काही हक्क हे होते- ● गिरणी कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी.
दुपारी, कामगारांना अर्धा तास सुट्टी मिळावी. ● मिलच्या कामाला सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरुवात करावी आणि सूर्यास्तानंतर बंद करावी. ● कामगारांचे पगार दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत करावेत.
ब्रिटिश राजवटीने त्यांना रावबहादूर ही पदवी बहाल केली होती. त्यांनी मुंबई कामगार संघ स्थापन केला. कष्टकरी वर्गाने एकजुटीने अन्यायाचा कडाडून प्रतिकार केला पाहिजे, अशी सशक्त प्रेरणाच ते आज ठरले आहेत. फुले व त्यांचे सहकारी कृष्णराव भालेकर आणि लोखंडे यांनी शेतकरी आणि कामगारांना संघटित करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न कोणत्याही संघटनेने केला नाही, हे विशेष!
!! रविवार साप्ताहिक सुट्टी मंजूर दिनाच्या सर्व कामगार बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
पोटेगावरोड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here