गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील साई सभागृहात आज सोमवार, दिनांक ०२ जून २०२५ रोजी एक आगळावेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. कोमलवार – ईप्पावार परिवारातील गणेश आणि निशा या नवदाम्पत्याचा विवाह सोहळा मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. विवाह समारंभात पारंपरिक विधींसह सामाजिक जागृतीचा एक सुंदर संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर संविधान’ या उपक्रमाअंतर्गत नवविवाहित दाम्पत्यास भारतीय संविधान ग्रंथ भेट देण्यात आला. समाजामध्ये संविधानाचे महत्व, मूल्य आणि त्यातील अधिकारांची जाणीव प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो.
समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या या उपक्रमाचे अनेक ठिकाणी स्वागत होत असून, विवाहासारख्या खासगी समारंभांतूनही सामाजिक प्रबोधनाचे कार्य घडवून आणले जात आहे. भारतीय संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून, सामाजिक समतेचा आधार आहे, हे नवदाम्पत्याच्या आयुष्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही समाज बांधवांनी सांगितले की, “आज समाजामध्ये संविधानाचे महत्त्व कमी होत चालले आहे. अशा वेळी या प्रकारचे उपक्रम ही काळाची गरज आहे. संविधानाची प्रत देणे म्हणजे केवळ एक पुस्तक नाही तर मूल्यांचा प्रसाद देणे आहे.”
अशी उपस्थितांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आले,
गणेश आणि निशा यांच्या विवाहाच्या निमित्ताने दिला गेलेला हा संदेश त्यांच्या नव्या जीवनात समतेचे, बंधुतेचे आणि न्यायाचे मूल्य जपत त्यांचे पाऊल समाज कल्याणाच्या दिशेने पडेल, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमास वधूचे वडील मुक्तेश्वर कोमलवार व वराचे वडील धर्माजी ईप्पावार, यांच्यासह सामजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहुर्ले, दिगंबर लाटेलवार, संघटनेचे पदाधिकारी राजेश कलगट्टीवार, मयाताई मोहुर्ले, वर्षा लाटेलवार, विनोद लाटेलवार, संदीप येनगंटीवार, उषा येनगंटीवार आणि अनेक समाज बांधव, नातेवाईक व ईष्टमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.




