गंगाखेड :-तालुक्यातील मरगळवाडी शिवारात जुना पांदन रस्ता अस्तित्वात असतानाही तहसील कार्यालयाने नवा रस्ता जबरदस्तीने काढल्याचा आरोप महिला शेतकरी सुनंदाबाई सुधाकरराव केरकर यांनी केला आहे. याबाबत (दिनांक २२ मे गुरुवार रोजी) जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात केरकर यांनी म्हटले आहे की, शासनाच्या वतीने पांदन रस्त्यांसाठी शिव पांदन रस्ता योजना राबवण्यात येत असताना, मौजे मरगळवाडी येथील सर्वे नंबर २५९/२, २५९/३, २६८/४ व २६९ या मार्गानेच रस्ता देण्याचे आदेश दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी पारित झाले होते. मात्र, तरीही तहसील कार्यालयाच्या वतीने जाणीवपूर्वक केरकर यांच्या वैयक्तिक मालकीच्या सर्वे नंबर २६० मधून नवा रस्ता देण्याचा घाट तहसील कार्यालयाने केला आहे. विशेष म्हणजे केरकर यांना यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित करण्यात आले आणि नंतर २५ एप्रिल २०२५ रोजी सूचना देण्यात आली.
श्रीमती केरकर यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, गेल्या ४० वर्षांपेक्षा आधीपासून बैलगाड्या व अन्य वाहने वापरून शेतकरी जुना पांदन रस्ता वापरत आहेत. त्यामुळे नवीन रस्त्याची गरजच नव्हती. तरीही केरकर यांच्या शेतातून रस्ता देण्याचा प्रयत्न होत असून, ही प्रक्रिया अन्यायकारक व बेकायदेशीर आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा आणि केरकर यांच्या शेतातून रस्ता देण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर श्रीमती केरकर यांची स्वाक्षरी असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




