*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड /सातारा : महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनेची माहिती देण्यासाठी व शेतकरी वर्गात जागृती होण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात गावोगावी माहिती रथ फिरवण्यात येत असून म्हसवड मध्ये या रथाचे स्वागत अहिंसा पतसंस्था कार्यालयाजवळ प्रथम करण्यात आले.
यावेळी अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाची योजना गावागावात शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी तसेच मागणी अर्ज निर्माण करणेसाठी महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना (BJS) यांच्यात जो करार झाला आहे त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेस गती प्राप्त झाली आहे.
त्यानंतर म्हसवड नगरपरिषद कार्यालपाशी या माहिती रथाचे स्वागत म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिन माने यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांच्या हातात या योजनेची माहिती पत्रक देऊन स्वागत करण्यात आले.
नगरपरिषद प्रशासक श्री माने यांच्या दालनात म्हसवड मधील मान्यवर, शेतकरी व BJS कार्यकर्ते अशी चर्चा झाली. या चर्चेमध्ये म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी, माजी नगराध्यक्ष विजय धट, माजी नगराध्यक्ष वसंत मासाळ, लाडकी बहीण योजनेचे आप्पासाहेब पुकळे, BJS चे शहराध्यक्ष डॉ. राजेंद्र मोडासे, माजी नगरसेवक आप्पासाहेब विरकर, निवृत्त अभियंता सुनिल पोरे, दत्ता डावकरे, डॉ. सनतकुमार व्होरा, व असंख्य शेतकरी उपस्थित होते.
म्हसवड नगरपालिकेचे कार्यक्षेत्र असल्याने सदरची योजना राबवता येत नसल्याचे बीजेएस समन्वयक श्री अक्षय कांबळे यांनी सांगितले तथापि ‘नाम ‘ फाउंडेशन व टाटा मोटर्स यांचे माध्यमातून येथे सदर ची योजना राबवता येईल. हि योजना राबविण्यासाठी नितिन दोशी, विजय धट, वसंत मासाळ, सुनिल पोरे, यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच यावेळी मुख्याधिकारी यांनी यासाठी ठराव देण्याचे मान्य केले.
यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे भाऊ यांचे माध्यमातून म्हसवड नगरपालिका क्षेत्रात कशा पद्धतीने योजना युद्धपातळीवर राबवता येईल यासाठी शिष्टमंडळ भेटण्याचे ठरविण्यात आले.




