Home महाराष्ट्र पात्र लाभार्थ्यांची अडवणूक कराल, तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे!

पात्र लाभार्थ्यांची अडवणूक कराल, तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे!

242

 

गंगाखेड (अनिल साळवे)
राज्यातील विविध घटकांच्या सक्षमीकरणासाठी शासन वेगवेगळ्या योजना आणि निर्णय घेत असते. त्यामुळे त्या सर्व योजना आणि निर्णयांची तालुका व गाव पातळीवर योग्य अंमलबजावणी करणे, ही तालुका प्रशासनाची सर्वस्वी जबाबदारी आहे. याचे भान ठेवून आपण काम केले पाहिजे. मात्र, आपल्या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे अनेक महिने प्र​लंबित राहात असतील तर मग, तहसीलदारांसह संबंधित कर्मचाऱ्यांची काय गरज आहे? शासन तुम्हाला काम करण्यासाठी पगार देते की लोकांची अडवणूक करण्यासाठी? चिरीमिरीच्या अपेक्षेने सर्वसामान्य लोकांना लाभांपासून वंचित ठेवताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? तुम्ही तुमचा कारभार सुधारणार आहात की नाही? आकडेवारी वेगळी सांगताय आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी वेगळी कशी? रीतसर व नियमात बसणारे प्रस्ताव रद्द कसे होतात? अशा प्रश्नांची सरबत्ती करत स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी तहसीलदार श्रीमती.उषाकिरण श्रृंगारे यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच इथून पुढे असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही. आता दरमहा मिटींग घेणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची अडवणूक कराल, तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा सुध्दा आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिला.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी उपस्थित लाभार्थी नागरिकांच्या समस्या, अडचणी व म्हणणे सविस्तरपणे जाणून घेतले. शिवाय, त्यांच्या समस्या आणि अडचणींचे त्वरीत समाधान केले. सोबतच सर्व शासकीय योजना आणि शिधाधारकांना अन्नधान्य पुरवठा संदर्भात विस्तृत माहिती घेतली. याप्रसंगी शासकीय योजनांची आकडेवारी आणि प्रत्यक्षात दिसत असलेली तफावत यामुळे तहसीलदारांसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना अशा विविध योजनांची तालुक्यातील सद्यस्थिती आणि अंमलबजावणी याविषयी अत्यंत कडक सूचना दिल्या.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, विविध योजनांमागे शासनाचा असलेला हेतू आणि उद्देश यशस्वी करण्यासाठी आपली नेमणूक केली आहे. त्यामुळे योजना समिती आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वयक राखून आपण सर्वसामान्यांसाठी चांगले काम करणे अपेक्षित आहे. मात्र, आपण याकडे दुर्लक्ष करताय, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. रीतसर असलेले प्रस्ताव सुध्दा का अडवून ठेवले जातात? एखादी त्रुटी दूर करण्यासाठी तब्बल सात महिने कसे लागतात? आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत की त्यांना त्रास देण्यासाठी? लोकांना त्रास देण्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला आनंद मिळतो का? काही तरी भेटल्याशिवाय तुम्ही कामे करणार नाहीत का? प्रशासनावर तहसीलदार म्हणून तुमचा वचक राहिला नाही का? मिटींग आहे म्हणून, चुकीची आकडेवारी मांडताय, मग हे सर्व लोक खोटं बोलत आहेत का? तुम्ही नीट कामे करणार आहात की नाही? या मिटींगला खूप शांततेने घेतोय. पण, लक्षात ठेवा, लोकांची केलेली अडवणूक ​अजिबात खपवून घेतली जाणार नाही. कारण, हा माझा केवळ मतदारसंघ नाही, तर माझा परिवार आहे. तुम्ही चुकीचे वागता. लोकांना अडवता आणि उत्तरे आम्हाला द्यावी लागतात.
बैठकीचे औचित्य साधून तालुक्यातील गरजू व होतकरू लोकांना दिल्या जाणाऱ्या शिधावाटप अन्नधान्याची सविस्तर माहिती घेतली. त्यावर तालुक्यात १६३ दुकाने आहेत. मात्र, शासनाच्या गुगल मॅप नियमामुळे त्यात इतर तालुक्यातील ६७ दुकानांची भर पडली आहे. त्यामुळे स्थानिक तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करताना अडचणी येतात. आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या उपलब्ध नाही, असे तहसीलदार श्रीमती.उषाकिरण श्रृंगारे यांनी सांगितले. त्यामुळे बैठकीतूनच तातडीने जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला. तसेच त्यांच्या कानावर संबंधितांच्या अडचणी घातल्या. शिवाय, तालुक्यातील पुरवठा सुरळीत व वेळेवर करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध करून द्या, असा सूचना दिल्या.
यावेळी तहसीलदार उषाकिरण शृंगारे, गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, मित्रमंडळाचे विधानसभा अध्यक्ष किशनराव भोसले, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप अळणुरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार पटेल, गंगाखेड तालुका प्रभारी बालाजी लटपटे, उपसभापती संभाजीराव पोले, माजी पंचायती समिती सदस्य लक्ष्मण मुंडे, राजेभाऊ बापू सातपुते, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, माजी नगरसेवक कलीम शेख, उद्धवराव चोरघडे, रमेश पेकम, पिराजी कांबळे, बालासाहेब शिंदे आप्पासाहेब कदम, वैजनाथ टोले, संजय पारवे, शेषराव सलगर, संदीप राठोड, बालासाहेब भोसले यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष व मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच व तालुका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तुम्ही सरळ राहू नका. ही सगळी लोकं वाकडी आहेत.
शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी आणि संपूर्ण तालुक्याचा पारदर्शक कारभार, ही तहसीलदार म्हणून तुमची नैतिक जबाबदारी आहे. इथे जर काही चुकीचे घडत असेल, तर त्यालाही तुम्ही स्वत: जबाबदार आहात. इथून पुढे आम्ही तुम्हालाच जाब विचारणार. कारण, खालच्या कर्मचाऱ्यांशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. या सर्व कर्मचाऱ्यांवर तुमचा वचक नाही का? ते तुमचा आदेश ऐकत नाहीत का? एखादा कर्मचारी तुमच्यापेक्षा वरचढ कसा होतो? सर्वसामान्य लोकांच्या एवढ्या तक्रारी कशा येत आहेत? या सगळ्या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करा आणि सर्वांना सुतासारखे सरळ करा. कारण, तुम्ही फार शांत आणि संयमी आहात. परंतु, तुम्ही सरळ राहू नका. ही सगळी लोकं वाकडी आहेत, असा प्रशासकीय सल्ला आ.डॉ.गुट्टे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना उद्देशून तहसीलदार श्रीमती.उषाकिरण श्रृंगारे यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here