बदलत्या हवामानाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसत आहे. त्यातही कृषी क्षेत्रावर त्याचा जास्तच परिणाम होताना दिसत आहे. सध्या एप्रिल महिना चालू आहे. सर्वत्र कडाक्याचे ऊन जाणवत आहे. सर्वच शहरांचे तापमान ४० अंशाच्या घरात आहे. विदर्भातील काही भागात तर तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. तापमान वाढल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना अनेक आजार होत आहेत. या कडाक्याच्या उन्हात लोकांना चक्कर येणे, हृदय विकाराचा झटका येणे, रक्तदाब वाढणे, शरीरातील पाणी कमी होणे, डोळ्यांचे विकार जडणे, लहान मुलांचा घोळणा फुटणे, उष्माघात होणे असे प्रकार घडतात. उष्माघाताने काहींचा जीवही गेला आहे. दोन वर्षापूर्वी खारघर मध्ये घडलेली घटना अजूनही ताजीच आहे. उष्माघातामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १५ श्री सेवेकरांना जीव गमवावा लागला होता. कडाक्याच्या उन्हात जास्तीतजास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. तसेच फळांचा ज्यूस सेवन करण्यास सांगितले जाते. डॉक्टरांकडून दुपारी ११ ते ४ घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो मात्र पोटापाण्यासाठी लोकांना घराबाहेर पडावेच लागते. एकीकडे कडाक्याचे ऊन असताना राज्यातील काही भागात मात्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस देशातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. फळबागा जमीनदोस्त होतात. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. क्षणात होत्याचे नव्हते होते. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी पडते. अवकाळी पाऊस झाला की बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकतो. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडणे ही गेल्या काही वर्षातील नित्याची बाब झाली आहे. जम्मू काश्मीर सारख्या निसर्गाच्या नंदनवनात काल निसर्गाने काल जो प्रकोप दाखवला तो पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी झाली. या ढगफुटीने जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार उडाला. क्षणात संपूर्ण प्रदेश जलमय झाला. प्रचंड पाऊस आणि भूस्खलन झाल्याने तीन जनांना आपला जीव गमवावा लागला. या ढगफुटीने जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळित झाले. शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागले. तिथे अजूनही बचावकार्य चालू आहे. ऐन उन्हाळ्यात निसर्गाने दाखवलेल्या या उग्र रूपाने सर्वजण आवाक झाले. जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रकारचा पाऊस यापूर्वी पाहिला नव्हता असे तेथील जुने जाणते लोक सांगत आहेत. केवळ जम्मू काश्मीरच नाही तर देशातील अनेक राज्यात अशाप्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ईशान्य आणि दक्षिणेकडील काही राज्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात २२ ते २४ तारखे दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आणि छत्तीसगड मध्ये २० ते २४ दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप, आंध्रप्रदेश, तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच देशातील एका भागात कडाक्याचे उन तर दुसऱ्या भागात मुसळधार पाऊस अशी विषम परिस्थिती आहे. कडाक्याचे ऊन, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ या घटना आताच घडतात असे नाही तर वर्षभर घडत असतात. महाराष्ट्र हे सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. पूर्वी सर्व ऋतूंचे आगमन वेळेवर होत होते. मागील काही वर्षात ऋतुमानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. ऋतुमानच बदलले आहे. पूर्वी पाऊस फक्त पावसाळ्यातच पडत असे आता वर्षभर कोठेना कोठे पाऊस पडताना दिसतो. पावसाळ्यात दोन दोन महिने पाऊस पडत नाही. कधीकधी दोन दिवस इतका पाऊस पडतो की दोन दिवसात दोन महिन्याची सरासरी भरून काढतो. त्यामुळे कोणत्या ऋतूत कोणते पीक घ्यावे याबाबत शेतकरी संभ्रमात असतो. बदलत्या हवामानामुळे काहींनी शेती करणेच बंद केले आहे. राज्यात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात जंगलतोड वाढली आहे. काँक्रीटीकरण वाढले आहे. शहरे सिमेंटचे जंगले बनली आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे वातावरणात बदल होत आहे. वातावरणातील बदलामुळे या घटना घडत आहेत. निसर्गाच्या या बदलत्या चक्राचा मानवजातीवरच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीवरच परिणाम होत आहे. लोकांनी यातून धडा घेऊन आतापासूनच निसर्ग नियमाने जगणे सुरू करायला हवे. वृक्षतोड थांबवली पाहिजे, जंगलतोड थांबवली पाहिजे. वृक्षलागवड करून ती जगवली पाहिजेत. माणसाने निसर्गावर केलेले आक्रमण थांबवले पाहिजे. जर माणसे निसर्ग नियमाच्या विरुद्ध गेले तर त्याची मोठी किंमत येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५




