रोशन मदनकर (उपसंपादक, मो. 88886 28986)
ब्रह्मपुरी:- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन तथा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या आर्थिक धोरणातील दूरदृष्टी आणि संशोधनातील आर्थिक विचारांचे महत्त्व विशद केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय मगर यांनी जागतिक टेरिफ युद्धामुळे उद्भवणारी आर्थिक मंदी आणि भारतीय चलनाच्या अवमूल्यनाचा परिणाम यावर भाष्य करून या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. आंबेडकरांनी आपल्या लेखनात आहेत ती बुद्धिजीवी वर्गाने स्वतः समजून घेऊन इतरांचे प्रबोधन करावे असे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले की अर्थव्यवस्था दिशाहीन असताना बुद्धिजीवी वर्ग गाफील राहिला, तर तो आत्मघात आणि समाजघाताला कारणीभूत ठरेल. उद्रेकाचा विद्रोह शमविण्यासाठी प्रतिगाम्यांचे षडयंत्र क्षीण करण्याची जबाबदारी बुद्धिजीवी वर्गाची आहे त्यापासून त्यांनी पळ काढू नये असे भाष्य केले.
कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले, तर आभार प्रा. श्यामसुंदर बावनकुळे यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापकवृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




