Home लेख आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिराव फुले!!

आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिराव फुले!!

117

 

महात्मा जोतिराव फुले म्हणजे एक विलक्षण बेधडक बाणेदार व्यक्तिमत्व!! अन्यायाची प्रचंड चीड.. बहुजनांच्या हक्क व अधिकारासाठी हयात भर प्रखर लढा देणारे.. स्त्री शिक्षणासाठी आणि समाज उद्धारासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. महात्मा फुलेंचे जीवन चरित्र वाचल्यावर त्यांच्या जीवन चरित्राविषयी कुतूहल आणि आदर निर्माण होणे स्वाभाविक आहे. मग ते परशुरामाला पाठवलेली नोटीस असेल.. सर्व साक्षी असाल तर सहा महिन्याच्या आत हजर राहा असं परशुरामाला ते नोटीस बजावतात. बळीराजाचा व वामनाचा इतिहास वाचल्यावर वामनाला उद्देशून म्हणतात. वामनाने एक पाय पृथ्वीवर ठेवला आणि दुसरा पाय आकाशात हे कसे काय शक्य झाले ?महात्मा फुलेंच्या तर्कबुद्धीला तोड नाही म्हणून महात्मा फुले मला महान वाटतात..
ज्या काळात बहुजन पुरुषाला शिक्षण नव्हते. त्या काळात प्रथम मुलींसाठी शाळा काढतात. ज्या काळात स्त्रिया गुलामगिरीत जीवन जगत होत्या. चूल व मूल एवढेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. घराचा उंबरा ओलांडणे ही त्यांना शक्य नव्हते त्या काळात महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना शिकण्याची प्रेरणा देऊन मुलींना शिकवण्यासाठी तयार करतात. म्हणून महात्मा फुले मला महान वाटतात..
सावित्रीला मूल होत नाही म्हणून
महात्मा फुलेंना जेव्हा दुसऱ्या लग्नाचा सल्ला देण्यात येऊ लागला. तेव्हा महात्मा फुले म्हणाले सवत चालत असेल सावित्रीला तर सवता चालेल मला.. पती प्रेमापोटी एखादी स्त्री जर सती जात असेल तर पत्नी प्रेमापोटी एखादा पुरुष सता का जात नाही. सता व सवता शब्द साहित्यात रुजणारे ज्योतिराव फुले मला महान वाटतात.

मध्यरात्री एका गर्भवती विधवा बाईला घरी घेऊन येतात. समाजाच्या भीतीपोटी ती बाई जीव द्यायला निघालेली असते. तेव्हा त्या बाईला महात्मा फुले आश्रय देतात. ती बाळाला जन्म देते. विधवा स्त्रियांचे प्रश्न सोडण्यासाठी दुसऱ्याच दिवशी घराबाहेर अशी पाटी लावतात. अडल्या-नडल्या बाईंनी येथे यावे व बाळंत व्हावे. किती उदार मनाची गरज आहे हे कार्य करण्यासाठी. विधवा ब्राह्मण काशीबाईला अनैतिक संबंधातून जे बाळ होतं. त्या बाळाची नाळ सावित्रीबाई कापतात. त्या बाळाला छातीशी धरतात. चुटकीसरशी महात्मा फुले सामाजिक न्याय करतात. त्या बाळाला दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवतात. यशवंतला डॉक्टर बनवतात. त्याला स्वतःचे नाव देतात. समाजात प्रतिष्ठा मिळवून देतात.म्हणून महात्मा फुले मला महान वाटतात.

ज्या काळात धर्माविषयी कोणी ब्र ही काढत नव्हते. शोषक ब्राह्मण ब्राह्मण वर्गाच्या शोषणाविरुद्ध कोणीही काही बोलत नव्हते. त्या काळात महात्मा फुले धर्म चिकित्सा करतात. विधवा पुनर्विवाह घडवून आणतात. सत्यशोधक पद्धतीने विवाह लावतात. सत्यशोधक पद्धतीने विवाह लावल्यामुळे अनेक खटले महात्मा फुलेंवर भरतात. परंतु महात्मा फुले कसलाही विचार न करता बेधडकपणे प्रत्येक खटल्याला सामोरे जातात व अगदी खटल्याचा खर्च आपली शेती विकून करतात. परंतु माघार घेत नाही म्हणून महात्मा फुले मला महान वाटतात.

राजपुत्र ड्युक ऑफ कॅनॉट जेव्हा भारताच्या दौऱ्यावर येतात. तेव्हा त्यांच्या स्वागताला उच्चवर्णीय लोक सुंदर सुंदर वस्त्र परिधान करून येतात. भारतीय शेतकऱ्याची दयनीय अवस्था दाखवण्यासाठी महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशभूषेत त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात व म्हणतात की we are happy Nation but without education हा बेधडकपणा बाणेदारपणा महात्मा फुले करू शकले म्हणून ते मला महान वाटतात.

एक पुरुष असूनही स्त्रियांच्या बाजूने बेधडकपणे उभा राहतात. एक निर्मिक म्हणून स्त्रीला श्रेष्ठ दर्जा देतात. पंडिता रमाबाई जेव्हा धर्मांतर करतात तेव्हा त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते तेव्हा महात्मा फुले त्याची पाठ राखण करतात. रखमाबाई राऊत असेल, मुक्ता साळवे असेल, ताराबाई शिंदे असतील, यांच्यावर जेव्हा टीका होते तेव्हा समाज काय म्हणेल याचा विचार न करता ते या स्त्रियांची पाठराखण करतात. आज एकविसाव्या शतकातही पुरुषांना स्त्रीवादी विचार रुजत नाहीत म्हणून महात्मा फुले मला महान वाटतात.
या जगातील दुःख मुळी स्त्री पुरुष विषमतेतून निर्माण झाले असा दावा करतात. यावर ज्योतिराव फुले उपाय सुचवतात. या जगातील प्रत्येक पुरुषाने स्त्रीला बहीण मानावं आणि प्रत्येक स्त्रीने पुरुषाला भाऊ मानावं ही बहीण भावंडपणाची भावना निर्माण करतात. कोणत्याही पुरुषाने स्त्रियांच्या मानवी हक्का आड येऊ नये असा विश्वबंधुत्वाचा विचार मांडतात म्हणून महात्मा फुले मला महान वाटतात.

पेशवेकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यासही बंदी असताना महात्मा फुले रायगडावर जातात. तीन दिवस शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतात. शेवटी समाधी शोधतात. समाधी धुतात पुसतात, समाधीची पूजा करतात.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. महाराजांचा इतिहास सर्वप्रथम जर कोणी मांडला असेल तर तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडला आणि 1000 ओळीच्या पोवाड्यातून निडरपणे ते आपल्या राजाचा इतिहास मांडतात म्हणून महात्मा फुले मला महान वाटतात.

हंटर कमिशन पुढे वंचिताच्या शिक्षणासाठी लढणारे हिंदू धर्मातील विषमता अन्यायकारक व्यवस्था उलथून लावण्यासाठी एका मागोमाग एक क्रांतिकारी ग्रंथलेखन तसेच प्रत्यक्ष कृती विधवापुनर्विवाह असेल बालविवाह विरोध असेल सतीप्रथेला विरोध असेल किंवा अस्पृश्यांसाठी पाण्याची विहीर खुली करणे असेल या कोणत्याच बाबीसाठी न डगमगता महात्मा फुले यशस्वीपणे कार्य करत राहिले म्हणून महात्मा फुले मला महान वाटतात.

बहुजनांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य खर्च करतात. आजची स्त्री स्वाभिमानाने जगत आहे ती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे, म्हणून आपण प्रत्येकाने या महापुरुषाला जातीच्या चष्म्यातून न पाहता अभिवादन करून त्यांचे विचार अंगीकारावे.

श्रीमती मनीषा जाधव अंतरकर
अंबड जि. जालना
मो. 7822828708

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here