Home लेख क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे क्रांतिकार्य

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे क्रांतिकार्य

104

 

 

सत्यशोधक समाजाचे व बालहत्या प्रतिबंधक गृहाचे संस्थापक, कृतीशील समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, जनतेकडून ‘महात्मा’ पदवी प्राप्त झालेले क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १९८ व्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

महात्मा फुले यांच्या ‘ब्राम्हणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक व ‘अखंडादि काव्यरचना’ या ग्रंथांनी बहुजन समाजात क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांनी केलेले सामाजिक परिवर्तन त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्यावरून स्पष्ट होते असे म्हणता येईल.
ज्या काळात स्त्री व शुद्रांना परंपरेने शिक्षणाचा अधिकार नाकारला होता त्या काळात म .फुलेंनी सन १८४८ ते १८५१ या चार वर्षात स्त्री शुद्रांसाठी १८ शाळा काढल्या व योग्य असा अभ्यासक्रमही तयार केला कारण शिक्षण नसल्यामुळे समाजाचे खूप नुकसान झाले आहे .महात्मा फुले यांना सामाजिक परिवर्तन हवे होते म्हणून त्यांनी शैक्षणिक क्रांती केली.
रुढी परंपरेतून समाजाला मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला . बालविधवा, केशवपन, बालविवाह, विजोड विवाह, बालहत्या, बहुपत्नीत्व या दुष्ट रुढी परंपरांचा त्यांनी कडाडून विरोध केला त्यातून समाजाला मुक्त केले .अशा प्रकारे देव, धर्मग्रंथ, धर्म, तीर्थस्थान व सर्व वंद्य परंपरेच्या विरुद्ध व सामाजिक, गुलामगिरी विरुद्ध बंड केले .
महात्मा फुले यांना स्त्री मुक्तीचे अग्रदूत म्हणतात .सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात सत्यधर्माची लक्षणे सांगताना म. फुले यांनी पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ, त्यागी, निष्ठावान, अहिंसक आहे असे पुरोगामी विचार मांडले. स्त्रियांना स्वतःचे मानवी हक्क समजू नये म्हणून विद्या बंदी होती. यासाठी त्यांनी १ जानेवारी १८४८ साली मुलींसाठी शाळा काढून स्त्रियांना विविध बंदीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला व पुढे स्त्री मुक्ती संदर्भात कृतीशील कार्य केले.
महात्मा फुले यांना लोकशाही क्रांतीचे अग्रदूत म्हणतात . सत्यधर्माची लक्षणे विशद करतांना, सर्व स्त्री पुरुषास निर्मिकाने धर्म- राजकीय स्वतंत्रता दिली आहे. मानवी हक्कांविषयी बोलण्याचे लिहिण्याचे व प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, हे म. फुले यांचे विचार लोकशाही प्रणालीची मूलभूत तत्वेच आहेत . विश्वकुटुंब निर्मितीसाठी आवश्यक मूलभूत मानवी हक्क व त्यासाठी हवा असलेला वर्तनक्रम व वैचारिक भूमिका म. फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात ३३ कलमी नियमात मांडलेली आहे. म. फुलेंचे विचार हे त्यांच्या वेळेपर्यंत कुणालाही मांडता न आलेले क्रांतिदर्शी विचार होते . ते व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते . सत्यधर्माची लक्षणे सांगताना म. फुले यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला . प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, मत प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते आज घटनेव्दारे सर्वांना बहाल केलेले आहे. गणपतराव थोरात यांना सत्यवर्तनाचे नियम (लक्षणे) सांगताना महात्मा फुले यांनी स्त्री-पुरुष समतेचे विचार मांडलेले आहेत. स्त्री व पुरुषाला समान स्वातंत्र्य सांगितले आहे. असे विचार मांडताना ‘स्त्री अथवा पुरुष’ असा शब्द प्रयोग म्हणजे प्रथम स्त्रीचा उल्लेख आणि नंतर पुरुषाचा उल्लेख केलेला आहे. पुरुषाप्रमाणे स्वी ही सर्व अधिकारांचा उपभोग घेवू शकते. कारण स्त्रीला निर्मिकाने पुरुषाप्रमाणे हक्क दिले आहेत. म्हणून स्त्री व पुरुषांना समान मानणारे व लेखणारे सत्यवर्तनी होत असे म. फुले म्हणतात. यावरून सामाजिक समता खऱ्या अर्थाने समाजात रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला असे म्हणता येईल .समाजात बंधुभाव रूजविण्यासाठी त्यांनी
‘अखंडादि काव्यरचने’ त ते म्हणतात ,
‘ख्रिस्त महंमद मांग ब्राम्हणासी ॥ धरावे पोटाशी बंधूपरी ॥
सत्यवर्तनी वैद्यांच्या आज्ञेवाचून अफू भांग मद्य इ अंमली पदार्थाचे सेवन करून दुसऱ्यांवर अन्याय करीत नाहीत. सत्यवर्तनी स्त्री पुरुष व्याभिचार करीत नाहीत. अनैतिक व्यक्तिचा सन्मान ठेवीत नाहीत. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे स्त्री पुरुष स्वातंत्र्य, प्राणीमात्रास जगण्याचे स्वातंत्र्य, स्वतःप्रमाणे इतरांनाही धार्मिक व राजकीय स्वातंत्र्य, सर्व स्त्री-पुरुषांना स्वविचार बोलणे लिहिणे – प्रसिद्ध करण्याचे स्वातंत्र्य आहे असे मानून व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे सत्यवर्तनी होत असे म. फुले म्हणतात. सत्यधर्मातून वैचारिक क्रांती जोतीराव फुले यांनी सांगितलेल्या सत्यवर्तनाच्या अर्थात सत्यधर्माच्या लक्षणावरून त्यांच्या मानवता धर्माची लक्षणे, त्यांची विचारधारा, त्यांनी केलेली वैचारिक क्रांती दिसून येते. म. फुले यांच्या मते जगात एकच धर्म आहे. सत्यधर्माच्या प्रचारासाठी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ ची स्थापना केला .
महात्मा फुले यांचा अंतीम ग्रंथ ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’ जोतीराव फुले यांनी अर्धांग वायूचा झटका आल्यानंतर उजवा हात लुळा झाल्यावर शरीरातील व्यथा सहन करीत डाव्या हाताने लिहून पूर्ण केले जीवनाच्या अंतीम क्षणी लिहिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या मृत्युनंतर १८९१ साली झाले. विश्वकुटुंब वादाचा जाहिरनामा मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावर विश्वकुटुंब कसे निर्माण होईल त्याकरिता लागणारा बर्तनक्रम व वैचारिक भूमिका म. फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात मांडलेली आहे. सर्व स्त्री – पुरुषास उपयोगी ग्रंथ एकंदर सर्व मानव स्वी पुरुषांच्या उपयोगी हा ग्रंथ पडावा म्हणून या ग्रंथास सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक असे नाव दिले आहे. असे या ग्रंथाच्या १ एप्रिल १८८९ सालीचा लिहिलेल्या प्रस्तावनेत जोतीराव फुले यांनी म्हटले आहे. या ग्रंथात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी भारतीय लोकशाहीची मूलभूत तत्वे विशद करून सांगितली आहेत. या दृष्टीने हा ग्रंथ लोकशाहीची गाथा ठरावा असा आहे. अशा या समाजक्रांतिकारक क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना १९८ व्या जयंतीनिमित विनम्र अभिवादन ॥

प्रा.अरुण बाबरावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर,अमरावती.
भ्र.ध्व. :८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here