Home लेख जननायक – युगनिर्माता डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

जननायक – युगनिर्माता डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

132

 

सामान्य माणसाचे जीवन स्वकष्टाने अमृतमय करणारे जनक्रांतीचे लोकमहर्षी,श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कल्पवृक्षाची स्थापना करून ज्ञानाग्नी प्रज्वलित करून, ज्ञानदीप चेतवून शेतीच्या दारात ज्ञानाची गंगा पोहोचविणारे थोर शिक्षण महर्षी,अस्पृश्यता निवारण बील मध्यप्रांत वऱ्हाडचे मंत्री असताना कायदे कौन्सिलमध्ये पास करून घेणारे तसेच प्रत्यक्ष जीवनात आचरणातून अस्पृश्यता निवारण करणारे अस्पृशोद्धारक,वैदिक वाड्.मयात धर्माचा उदगम व विकास’ या प्रबंधाचे लेखन करणारे थोर लेखक,मातीमधून शास्त्राच्या फुलबागा फुलविणारे, रंजल्या गांजल्या कृषकांचे दैवत झालेले कृषिक्रांतीचे अग्रदूत कृषिपंडित, शिक्षणाने केवळ उपजीविकेचे प्रश्न सुटत नाहीत तर जीवनातील जटिल प्रश्न सोडविण्याची शक्ती प्राप्त होते अशी शिक्षणविषयक विचारधारा असल्यामुळे संपूर्ण समाजाला विद्येची दालनं मुक्त करणारे शिक्षणमहर्षी, ‘प्रशंसनीय व बहुजनांकरिता कार्य करणारे मी विदर्भातील एकच व्यक्ती ओळखतो ती म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख’ असे गौरवोद्‌गार पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ज्यांच्याविषयी काढले ते कर्मयोगी,धन,दौलत,वैभव, समृद्धी,मान,सन्मान या सर्वांचा लोककल्याणासाठी त्याग करणारे व स्वप्रयत्नातून एका नव्या युगाची निर्मिती करणारे युगनिर्माता जननायक डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या
६० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र वंदन ॥
डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या ग्रामात १८९८ सालातील डिसेंबर महिन्याच्या २७ तारखेला एका कृषक कुटुंबात झाला.
आई राधाबाई आणि वडील शामराव यांच्या सुसंस्कारांचा पंजाबच्या
बालमनावर अतिशय चांगला परिणाम होत होता .
भाऊसाहेबांच्या घराण्यात असलेल्या वतनदारीमुळे त्यांना देशमुख हे आडनांव प्राप्त झाले. त्यांचे मुळ आडनांव कदम असे होते.लहानपणापासूनच पंजाबरावाची बुद्धी अत्यंत तल्लख स्वरूपाची होती.वर्गात बुद्धिमान असलेला विद्यार्थी म्हणजे पंजाबराव.अशी त्यांची प्राथमिक शिक्षणापासूनच ओळख होती.पंजाबरावाचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या पापळ या जन्मगावी झाले व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले. शालेय जीवनात असलेल्या अनेक आर्थिक अडचणींवर मात करून त्यांनी अमरावतीच्या हिंदू हायस्कुलमधून मॅट्रीकची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. पुढील शिक्षणासाठी भाऊसाहेब विद्येच्या पुण्यनगरीत त्यांचं शिक्षण झालं.त्यानंतर डच्च शिक्षणासाठी इंग्लंडला दि.२१ऑगस्ट १९२० ला जाऊन आपल्या अलौकिक बुद्धिच्या बळावर त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठाची एम.ए. व ऑक्सफर्ड विद्यापीठाची डी. लिट. ह्या उच्च पदव्या प्राप्त केल्या आणि भाऊसाहेबांनी दीर्घ परीश्रमातून ” वैदिक वाङमयातील धर्माचा उदृगम व विकास ” या विषयावर लिहिलेल्या प्रबंधाला डॉक्टरेट बहाल करण्यात आली. इंग्लंडमध्ये असताना दीर्घ परिश्रमातून त्यांनी बार-ॲट-लॉ ची पदवी प्राप्त केली. इंग्लंडमधील शिक्षणानंतर १९२६ ला ते मायदेशी परतले.
डॉ.पंजाबराव देशमुख यांनी मायदेशी परतल्यावर अमरावती येथे वकिली करण्यास सुरुवात केली. भाऊसाहेब आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे होते , हुंडा पद्धतीचा त्यांनी विरोध केला होता, ” वय झाले पोरीचे लगीन नाय झाले ॥ हुंडा देया पैसा नाय बा तेयचे बोंबले ॥ हे त्यांना माहित होते,म्हणूनच त्यांनी मुंबईतील सोनार जातीतील विमलाबाई वैद्य यांच्यासोबत आंतरजातीय विवाह केला.असे ते कृतीशील विचारवंत होते.भाऊसाहेबांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग कृषक बांधवांसाठी केला. भारतातील शेतकरी स्वयंपूर्ण व स्वावलंबी होण्यासाठी शासकीय पातळीवर नियोजन करण्यासाठी देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा केवळ शेतकरी आहे. हे त्यांनी सर्वांना निदर्शनास आणून दिले. १९३० मध्ये सर मॉटेंग्यू बटलर मंत्रिमंडळात शिक्षण,कृषी, सहकार व लोककर्म खात्याचे मंत्री झाले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य जीवनभर त्यांनी केले.भारतीय शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती बदलविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही,असे त्यांना नेहमी वाटत असे.हवालदील शेतकऱ्याला विकासाची नवी दिशा डॉ.पंजाबराव देशमुख यांनी दिली .कृषकांच्या सर्व समस्या त्यांनी प्रथम जाणून घेतल्या आणि त्यानंतर त्यावर उपाययोजना केल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होऊ लागले .ग्रामाग्रामातील विद्यार्थी जेव्हा अमरावतीला शिक्षणाकरिता येऊ लागले तेव्हा त्यांना राहण्याची सोय नव्हती म्हणून भाऊसाहेबांनी १९२६ मध्ये श्रद्धानंद छात्रालयाला सुरूवात केली.शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी १९२७ मध्ये शेतकरी संघाची स्थापना.१९२८ मध्ये अमरावतीचे अंबामातेचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला.त्यात ते यशस्वी झाले .मोर्शी,जि.अमरावती येथील हिंदू सभेत अस्पृश्य बंदीचा निषेध करून स्वआचरणातून अस्पृश्यता निर्मूलन करून दाखविले. १९३२ ला श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून अमरावती येथे करून विद्येची गंगा ग्रामाग्रामातील शेतकऱ्यांच्या झोपडी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.आज या त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे रूपांतर फार मोठ्या वटवृक्षात झालेले आहे. १९५२ मध्ये भारताचे कृषिमंत्री असताना भातशेतीच्या अभिनव जपानी पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली.१९५४ ला आंतरराष्ट्रीय धान्य मंडळाची स्थापना केली .१९५५ ला ‘भारत कृषक समाजाची स्थापना केली .
१९५६ साली तरुण कृषक संघाची स्थापना केली. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब झाले. १९५७-५८ मध्ये भारताचे सहकार मंत्री झाले .’भारतीय कृषि -यंत्र सामग्री’ या संघटनेची स्थापना त्यांनी केली.१९५८ मध्ये राष्ट्रीय कृषिविषयक सहकारी खरेदी-विक्री संघाची स्थापना केली व या संघाचे ते अध्यक्ष होते. १९५८-५९ ला भारतीय कृषक सहकारी अधिकोषाची स्थापना भाऊसाहेबांनी केली.भारतीय कृषिशास्त्र-संस्थेचे संस्थापक होते आणि अध्यक्ष होते.१९५९-६० ला जागतिक शेतकी प्रदर्शनीचे दिल्लीला अप्रतिम आयोजन करून सर्वांना शेतकऱ्यांच्या समस्या विषयीची जाण निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला.ही भव्य दिव्य प्रदर्शनी बघितल्यावर आयसेन हॉवर, ख्रुश्चेव,डॉ.राजेंद्रप्रसाद आणि पं.नेहरू यांनी मुक्तकंठाने भाऊसाहेबांचा गौरव केला.
१९६० ला भारतीय घटक राज्यांतील शेतकी मंत्र्यांच्या मंडळाचे नेते म्हणून रशियाला प्रयाण केले.१९६० या एका वर्षात सात महाविद्यालये स्थापण्याचा जागतिक विक्रम डॉ .पंजाबराव देशमुख यांनी केला.इ.स. १९३६ च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले.
‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’ हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.१९२७- ला शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र भाऊसाहेबांनी चालविले.१९३३ साली शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करून शेकडो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून वाचविले,म्हणूनच त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात. त्यांनी ग्रामोद्धार मंडळाची स्थापना केली.भाऊसाहेबांनी १९५० साली लोकविद्यापीठाची स्थापना केली त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले. १९५६ ला अखिल भारतीय दलित संघाची स्थापना केली .लोकसभेवर भाऊसाहेब १९५२,१९५७,१९६२ तीन वेळा निवडून आले.१९५२ ते ६२ या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात भारताचे पहिले कृषिमंत्री झाले.कृषीमंत्रीपदी असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या त्यांनी अनेक योजना कार्यान्वित करून
शेतकऱ्यांना त्यांच्या हवालदिल परिस्थितीतून बाहेर काढले . देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना केली.
डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्वकर्तृत्वातून बहुजन समाजाचे जीवन घडविले. समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा कालबाह्य प्रथा परंपरा यामुळे समाजाची झालेली अधोगती त्यांनी बघितली होती.शिक्षण नसल्यामुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे म्हणूनच त्यांनी महात्मा फुलेंचा शिक्षणमार्ग समाजाला दाखविला. त्यागमूर्ती तत्वनिष्ठ,विज्ञाननिष्ठ,
स्वप्रयत्नातून एका नव्या युगाची निर्मिती करणारे युगनिर्माते, लोकोत्तर व्यक्तिमत्त्व असलेल्या
डॉ .पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना त्यांच्या ६० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र वंदन ॥
भाऊसाहेबांना । आज स्मृतिदिनी ।
वंदन करांनी । कोटी कोटी ॥

प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर,अमरावती.
भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here