अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.24मार्च):-राज्यातील सुमारे 54 हजार रास्त भाव धान्य दुकानदारांचे विविध प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. या प्रश्नाची सोडवणूक येत्या दीड महिन्यात करण्यात यावी अन्यथा मे महिन्यापासून ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शापकीपर फेडरेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये संप पुकारण्यात येईल, असा इशारा फेडरेशनचे राज्य खजिनदार विजय गुप्ता यांनी दिला असल्याचे, फेडरेशनचे जिल्हा सचिव प्रविण रायभोळे यांनी सांगितले.राज्यातील रेशन दुकानदारांकडे सध्या कोणाचे लक्ष नाही.रेशन कार्ड लाभार्थ्यांची केवायसी करण्याची अनेक वेळा शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
सध्या रेशन कार्ड लाभार्थ्यांची इ केवायसी करण्याची 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ई केवायसी करण्याबाबत दुकानदारांना कमिशन नाही.तरीसुद्धा रास्त भाव दुकानदार शासनाच्या व प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व लाभार्थ्यांची केवायसी कसलीही तक्रार न करता करीत आहेत. गावोगावी व शहरांमध्ये कॅम्प लावून केवायसी पूर्ण करून घेत आहेत.परंतु ई पॉस मशीन सर्वर प्रॉब्लेम व नेटवर्क प्रॉब्लेम अशा काही ना काही कारणाने व्यवस्थित चालत नाही. मशीन व्यवस्थित चालत नसल्यास लाभार्थी व दुकानदारांमध्ये वाद होत आहेत.दुकानदारांना धान्य वेळेवर पोहोचत नाही.धान्य पुरवठ्याची साखळी विस्कळीत झालेली आहे.दुकानदारांना धान्य दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत दिले गेल्यास त्याचे वाटप रेशन कार्डधारकांना करणे सोयीचे होईल.
अन्नसुरक्षा कायद्यानुसार दर महिन्याची 7 तारीख अन्नदिन व 8 ते 15 तारीख हा अन्न सप्ताह दुकानदारांना धान्य वाटप करून साजरा करता येईल.तसेच लाभार्थ्यांना सुद्धा धान्य 15 तारखेपर्यंत मिळेल आणि कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही.
दुकानदारांना प्रति किलो धान्य वाटपामागे दीड रुपया असे तुटपुंजे कमिशन मिळते आणि आज जवळपास 4 महिन्या पासून मोफत धान्य वाटपाचे दुकानदारांना कमिशनची रक्कम मिळालेली नाही.ज्यांचा उदरनिर्वाह दुकानावर अवलंबून आहे त्यांना दुकान भाडे, वीज बिल भरणे, कामगारांचा पगार तसेच घर खर्च चालवणे मुश्किल होत आहे.ऑल महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने दुकानदारांच्या विविध समस्या शासन दरबारी वेळोवेळी कळविण्यात आल्या आहेत. त्या सर्व समस्यांची सोडवणूक न झाल्यास, फेडरेशनच्या वतीने दिशा ठरवून, मे महिन्यात संप करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय फेडरेशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असे फेडरेशनचे राज्य खजिनदार विजय गुप्ता यांनी सांगितल्याचे, परभणी रास्त भाव दुकानदार संघटना जिल्हा सचिव प्रविण रायभोळे यांनी सांगितले.
राज्यभरातील रास्त भाव दुकानदारांना नोव्हेंबर महिन्यापासून धान्य वाटपाचे कमिशनची रक्कम मिळालेली नाही. तसेच दुकानदारांना दर महिन्याला वेळेवर धान्य पोहोच होत नाही. ई केवायसी करताना अडचण येत आहेत. काही वेळा मशीन बंद असते.अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही ई पॉस मशीन व्यवस्थित चालत नाही. या सर्व अडचणी सोबतच दुकानदारांच्या कमिशनमध्ये महागाई निर्देशानुसार वाढ करून दुकानदारांना प्रति किलो 3 रुपये कमिशन आणि मानधन पंधरा हजार रुपये हि मुख्य मागणी रास्त भाव दुकानदारांची असणार आहे. तसेच ई केवायसी बाबत आणि शासनाने वेळोवेळी ज्या नवीन योजना दुकानामार्फत राबवल्या जातात त्यात साडी वाटप व दहा किलो वजन पेलणारी पिशवी वाटपा पोटी कमिशन बाबत शासनाने तरतूद करावी. दुकानदारांच्या मागण्यांबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे




