Home लेख अपप्रवृत्तीमुळे पवित्र सणाला गालबोट लागते.

अपप्रवृत्तीमुळे पवित्र सणाला गालबोट लागते.

120

होळी हा आपल्या संस्कृतीतील एक मोठा आणि महत्वाचा सण आहे. भारतातील वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला हा सण विविध नावांनी साजरा केला जातो. हा सण होळी, होलिकादहन, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशा विविध नावांनी साजरा केला जातो. होळीच्या दिवशी आपण आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाने आगीत जाळून राख करावे अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. आपल्या मनातील वाईट विचारांना होळी प्रमाणे आगीत जाळून सत्प्रवृत्ती आणि सद्गुणांचा संकल्प करण्याचा हा दिवस. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणात तर हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोकणात हा सण पाच ते पंधरा दिवस असतो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील एक कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याची प्रथा आहे. या दिवशी एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करणे. सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकता जपणे हा याचा उद्देश. बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव भांडण विसरून एकत्र येतात मात्र गेल्या काही वर्षात या सणामध्ये शिरलेल्या अपप्रवृत्तीमुळे या सणाचे पावित्र्य लोप पावले आहे. होळीचा सण साजरा करताना धांगडधिंगा घातला जातो. धुलीवंदनाच्या दिवशी तर एकमेकांना गुलाल लावण्याऐवजी रसायन मिश्रित रंग लावले जातात. पाण्याचा अपव्यय केला जातो. काही समाज कंटक पाण्याने, रंगाने भरलेले फुगे, पिशव्या रेल्वे गाड्या, बसगाड्यावर तसेच रस्त्यावर फेकून मरतात. त्यात अनेकजण जखमी होतात. अशा घटनांत यापूर्वी काहींना आपले डोळे गमवावे लागले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. काही महाभाग तर जाणीवपूर्वक महिलांना टार्गेट करतात. काहीजण रंगाऐवजी नासकी अंडी फेकून मारतात. काहीजण तर या दिवशी लाऊस्पिकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून हिडीस नृत्य करतात. धुलीवंदनच्या दिवशी मद्यपान करण्याची नवीनच फॅशन निर्माण झाली आहे. मद्यपान करून नृत्य करताना बऱ्याचदा वाद होतो. हा वाद विकोपाला गेला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक होळी आणि धुलीवंदन हे अतिशय पवित्र सण आहेत. मात्र या अपप्रवृत्तीमुळे या सणाला गालबोट लागत आहे. ही अपप्रवृत्ती दूर करून सर्वांनी होळीचा सण साजरा करावा. जे समाज कंटक या पवित्र सणाला गालबोट लावतील त्यांना पोलिसांनी कडक शासन करावे.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here