उत्तम महिला हेचि करी
आपुले घर ब्रीदासह सावरी
मुलबाळ आदर्श करी
वरी प्रेमळपण सर्वांशी…
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या महिलोन्नती या अध्यायात स्त्रीच्या सर्वांग गुणांचा आदर केला आहे… स्त्रीच्या कर्तुत्वाबद्दल भावस्पर्शी उल्लेख केला आहे. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी…तीच जगाते उध्दारी’…ऐसी वर्णिली मातेची थोरी…शेकडो गुरुहूनही…ती घराची गृहलक्ष्मी तर आहेच…परंतु घराची आधारस्तंभ-आधारशीला आहे. मुलांच्या संस्कारासोबतच कुटुंबातील प्रत्येकाला एकत्रित आणण्याचे कामही ती मायेने-प्रेमाने करते. स्त्रीच्या तेजावर पुरुषांचे मोठेपण आहे…त्यांनी विद्याज्ञानार्जनाहूनही आदर्श मातेचे उपकार थोर आहेत…तिचे संस्कार हे मुलांवर गर्भापासूनच असतात…
आजची स्त्री बदलली आहे का…?
तर मी म्हणेन ‘होय’…!
ती खरोखरच खूप बदललेली
आहे…समूळ तिचा कायापालट झाला आहे…
पूर्वी स्त्रीचे महत्त्व म्हणजे चूल आणि मूल या पलिकडे नव्हते. तिचे आयुष्य तिच्या मर्जीने नाही तर पुरुषांच्या मर्जीने तसेच धर्माच्या नुसार चालायचे. तिचे जीवन कसे जगायचे हे ती स्वतः ठरवू शकत नव्हती.
समाजात सर्वात जास्त मानसिकरीत्या गुलामगिरीच्या दाहकतेला बळी पडली असेल तर ती स्त्री. स्वत्वाची जाणीव नसलेली-कल्पना नसलेली… स्वतःला अबला समजणारी ती एक कठपुतलीप्रमाणे जगत होती,वावरत होती. जनावरांपेक्षा अत्यंत वाईट वागणूक स्त्रियांना दिली जात होती.
संविधान लागू झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० तिचे संपूर्ण हक्क-अधिकार-स्वातंत्र्य तिला मिळालेत. स्त्रीमध्ये असलेली बौध्दिक क्षमता-बौध्दिक चातुर्य-कौशल्य-आत्मशक्ती हे गुण तिने जगाला दाखवून दिले आणि प्रत्येक क्षेत्रांत आपली जागा अव्वल आहे…नंबर वन आहे हे तिने सिध्द केले.
स्त्री ही श्रद्धा, त्याग, नम्रता याची जिती-जागती मूर्ती आहे. तिची योग्यता-लायकी ती जन्मजातच घेवून आली आहे. तिच्या मनाचा थारा हा प्रत्यक्ष ईश्वरसुध्दा ओळखू शकला नाही. ती प्रेम, ममता, वात्सल्याने ओतप्रोत आहे…परिपूर्ण आहे. घरातील आई, बहिण, मुलगी, पत्नी ह्या भूमिका पार पाडतच तिच्या संसाराची व्यवहारीक-सामाजिक-कौटुंबिक सर्व जबाबदा-या ती सहजपणे पेलू शकते…एवढे तिच्यात सामर्थ्य आहे. कर्तुत्व आहे.
कोणत्याही देशातील स्त्री ही त्या देशाचा एक महत्त्वाचा भाग असतो. मनुष्याचे जीवन हे पूर्णपणे स्त्रीवर अवलंबून आहे, हे कुणीच नाकारू शकणार नाही. कारण निसर्गाने तिला उपजतच असे गुण दिलेत कि ती स्त्रीच पूर्ण करु शकते. नविन पिढी तयार करण्याची-ती जीवंत ठेवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ती अन तीच यशस्वीरीत्या पार पाडते.
ती जे ठरवेल ती करून सोडतेच, समाजातील प्रत्येक क्षेत्र स्त्रीने व्यापून टाकले आहे. आज सुनिता विलियम्स्-कल्पना चावला सारख्या कर्तबगार स्त्रिया अंतराळात जावून त्यांनी आपले नांव सुवर्ण अक्षरांत नोंदवले आहे. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात सायना नेहवाल…धावपटू पी.टी.उषा सारख्या अनेक स्त्रियांची नावे घेता येतील. तसेच राजकीय क्षेत्रांत सुद्धा सरोजिनी नायडू पासून तर पंतप्रधान इंदिरा गांधी त्या आताच्या राष्ट्रपती होवून गेलेल्या विदर्भातील प्रतिभाताई पाटील अशा कितीतरी स्त्रियांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावशाली भरीव कामगीरी केलीय आणि आपले नाव आदराने भारताच्या इतिहासात उज्वल केले. आज या देशातील तसेच संपूर्ण विश्वातील शास्त्रज्ञ, वैज्ञानिक तसेच थोर विचारवंत आणि महान व्यक्ती तिच्याच उदरातून त्यांनी जन्म घेतला आहे…खूप अभिमानाने-सन्मानाने आपण त्यांचे नाव घेतो…
यत्रनार्येस्तु पूज्यते
रमन्ते तत्र देवता…||
म्हणजेच जिथे नारीची पूजा होते, तिथे म्हणजेच त्याठिकाणी देवतेचे सदैव स्थान असते, देवता तिथे वास करते.
राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना खरोखरच शतशः कोटी-कोटी प्रणाम…त्यांनी सर्वप्रथम स्त्रियांना शैक्षणिक मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्या शिक्षणाचा-बौध्दिक विकासाचा पाया त्यांनी घालून दिला आणि स्त्री ही सामर्थ्याने उंच भरारी घेवू शकली. देशातील स्त्रियांची परिस्थिती बदलल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही. अजूनही काही भागात अज्ञान आणि अशिक्षितपणामुळे अंधश्रध्दा वाढली आहे. त्यामुळे महिला मागासलेल्या आहेत. या अज्ञानाचे-अंधश्रध्देचे मुळापासून उच्चाटन झाले पाहिजे आणि स्त्री ही ख-या अर्थाने मानसिक-शारिरीक-बौध्दिक स्वतंत्र झाली पाहिजे.
कविवर जयशंकर प्रसाद लिहितात-
नारी तुम केवल श्रध्दा हो
विश्वास रजन नग, पग, तल मे |
पियुष स्त्रोतसी बहा करो
जीवन के सुंदर समतल मे ||
अशी ही नारी… सर्वेश्वर, सर्वाभूती, सर्वव्यापी, जगतजननी तुला कोटी-कोटी प्रणाम ||
आणि जागतिक महिला दिनानिमित्त आई, बहिण, मावशी, सासुबाई, मैत्रिणी- सखी, मुलगी सर्व स्त्री-शक्तीला माझ्या खूप खूप शुभेच्छा…||
सौ.शिवांगी आर.वेरुळकर(अमरावती)मो:-8805185536




