Home Breaking News महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

75

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील गजबजलेल्या आणि सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात एका सराईत गुन्हेगार असलेल्या नराधमाने बस स्थानकातच उभ्या राहिलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. स्वारगेट सारख्या वर्दळीच्या बस स्थानकात घडलेल्या या घृणास्पद घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पुण्यासारख्या देशाच्या सांस्कृतीक राजधानीत आणि विद्येच्या माहेरघरात एका तरुणीची अब्रू लुटली गेल्याने पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराची मान शरमेने खाली झुकली आहे. एकेकाळी पुणे हे मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहर समजले जात होते मात्र मागील काही वर्षापासून पुण्याची ही ओळख पुसली जात आहे. या घृणास्पद घटनेने केवळ पुण्याचीच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. पुण्यात घडलेली ही महिला अत्याचाराची घृणास्पद घटना ही काय राज्यातील पहिली घटना नाही. दररोजच्या वर्तमानपत्रात महिला अत्याचाराची एक तरी बातमी हमखास वाचायला मिळते.

दोन वर्षापूर्वी पहाटे कामावरून घरी परतणाऱ्या एका संगणक अभियंता तरुणीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातीलच वानवडी परिसरात घडली होती. त्याआधी मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील विद्यार्थिनीचा विनयभंग करून सुरक्षा रक्षकाने तिची हत्या केली होती. पुण्यातच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनीची हत्या झाली होती. मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसहुन वाशिकडे हार्बर रेल्वेने परीक्षेसाठी येणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर एका नराधमाने मज्जीद बंदर जवळ धावत्या डब्यातच लैंगिक बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील निर्भयावर झालेल्या अत्याचाराने तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता.बदलापुरात चार वर्षीय चिमुरडीवर शाळेतच झालेल्या अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. बदलापुरची घटना तर मानवतेला काळीमा फासणारी होती. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा घटनांची मालिकाच सुरू आहे. राज्यात महिला अत्याचाराची घटना घडली सर्वत्र संतापाची लाट उसळते. मोर्चे निघतात. निषेध व्यक्त होतो. इलेक्ट्रॉनिक मिडियात चर्चा होते.

प्रिंट मीडियात अग्रलेख लिहिले जातात. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतात. शासनाकडून घटनेच्या चौकशीचे आणि पोलिसांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले जाते अर्थात घटना घडून गेल्यानंतर आरोपींना पकडुन शिक्षा देण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना घडूच नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. दिवसाढवळ्या महिलांची अब्रू लुटून त्यांची हत्या करण्याची नाराधमी प्रवृत्ती अलीकडे जोर धरू लागली आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारचे गुन्हे करण्याची हिंमत नराधमांमध्ये निर्माण होते याचाच अर्थ या नराधमांना कायद्याचा आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणांचा धाक राहिला नाही. आपण कितीही मोठा गुन्हा केला तरी कायदा आपले काहीही करू शकत नाही. पैशाच्या जोरावर आपण कायदा आणि सुरक्षा यंत्रणांना आपण वाकवू शकतो अशीच धारणा या नराधमांची झाली आहे म्हणूनच ते असे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करत आहेत. शिव, शाहू फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना शोभणीय नाहीत.

पुरोगामी महाराष्ट्रालाशरमेने खाली मान घालायला लावणाऱ्या या घटना आहेत. महिलांकडे उपभोगी वस्तू म्हणून पाहण्याची पुरुषी मानसिकता वाढू लागली आहे हीच मानसिकता यामागे कारणीभूत आहे. आज राज्यातील कोणत्याच महिला सुरक्षित नाही मग ती तीन वर्षाची चिमुरडी असो की सत्तर वर्षाची आजी. शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, सार्वजनिक वाहन, स्वतःचे घर इतकेच काय तर पोलीस स्टेशन देखील महिलांसाठी सुरक्षित नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. पूर्वी अशा घटनांसाठी बिहार आणि उत्तरप्रदेश ही राज्ये प्रसिद्ध होती आता त्यात महाराष्ट्राची भर पडते की काय अशी शंका येऊ लागली आहे. महाराष्ट्राचा बिहार, उत्तरप्रदेश होऊ नये यासाठी सरकारने आणि पोलीस दलाने महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात तसेच संबंधित गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी तसे झाले तरच राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल आणि पुरोगामी महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख कायम राहील.       

 ✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here