कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.28फेब्रुवारी):- सध्याच्या गतिमान मानवी जीवन प्रवासात माणसाचं जगणं विस्थापित होत आहे. माणूस माणसापासून दुरावला जात आहे. नातेसंबंध विस्कटत आहेत. माणूस माणसापासून दुरावला जात आहे. अशा काळात माणूस पण जपणार साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. मराठी साहित्यात अस्सल वास्तववादी कथा निर्माण होणे गरजेचे आहे. ‘टर्निंग पॉईंट’ हा मानवी जगणं समृद्ध करणारा व वाचकांना प्रेरणादायी ठरणारा कथासंग्रह आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने अभिनेत्री स्मिता तांबे यांनी केले. त्या ज्येष्ठ कथाकार व साहित्यिक डॉ. रमेश विवेकी यांच्या ‘टर्निंग पॉईंट’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाने म्हणाले, डॉ. रमेश विवेकी लिखित ‘टर्निंग पॉईंट’ हा परिवर्तनवादी व प्रागतिक विचारांचा कथासंग्रह असून या कथासंग्रहामध्ये मानवी मूल्यांची जपणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी समूहाला प्रेरणा ठराव्या असा अनेक कथांचा यात समावेश आहे. मानवतावाद आणि सामाजिक जाणीव या संदर्भातील अनेक मूलभूत विषय या कथासंग्रहामध्ये लेखकाने हाताळले आहेत. ‘टर्निंग पॉईंट’ हा कथासंग्रह समाजाला पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
लेखक डॉ. रमेश विवेकी म्हणाले, ‘टर्निंग पॉईंट’ हा माझा वास्तववादी कथासंग्रह असून समाजभान जपत समाजात नवं काहीतरी करू पाहणाऱ्यांना तो प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा आहे. मराठी साहित्य विश्वात वाचक या कथासंग्रहाचे नक्की स्वागत करतील याची खात्री आहे.
यावेळी दिग्दर्शक विजय शिंदे, अभिनेते हर्षवर्धन विवेकी, सहदिग्दर्शक अशोक कांबळे, विश्वासराव तरटे, सिने अभिनेत्री अंतिमा कोल्हापूरकर, रहेमान पठाण, अजय वाघमारे, करण तांदळे, तुषार घोरपडे यांच्यासह साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




