Home महाराष्ट्र कवीने समाजाच्या वास्तवाला स्पर्श करावा – प्राचार्य डॉ. देवेश कांबळे

कवीने समाजाच्या वास्तवाला स्पर्श करावा – प्राचार्य डॉ. देवेश कांबळे

122

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28फेब्रुवारी):-कवीने आपल्या कवितेमधून प्रेमभावना प्रकट करणे यात काही गैर नाही मात्र प्रेयसीच्या डोळ्यात चंद्र, सूर्य आणि तारे शोधतांना त्याला सभोवतालच्या वास्तवाचे विस्मरण होऊ नये. कवितेत मानवी जीवनाच्या सर्व पैलूंचे आणि भावनांचे प्रतिबिंब असावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे आयोजित आजी- माजी विद्यार्थ्यांच्या काव्य मैफिलीच्या कार्यक्रमात केले. 

       संत गाडगे महाराज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयातील मराठी भाषा विभाग तथा माजी विद्यार्थी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर कार्यक्रम तथा आजी – माजी विद्यार्थ्यांची काव्यमैफिल आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी भूषविले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अमरदिप लोखंडे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्निग्धा कांबळे, माजी विद्यार्थी गझलकार मंगेश जनबंधू, कवयित्री सोनाली सहारे काव्यमंचावर उपस्थित होते. 

          कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि कवी अमरदीप लोखंडे यांनी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेवर आणि संत गाडगे महाराज यांच्या सामाजिक कार्यावर विचार मांडले आणि आपल्या सौंदर्यवादी कवितांमधून शृंगाररसाची उधळण केली. आदित्य बोरकर आणि लक्ष्मी उरकुडे या विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराज यांचे समाजकार्य आणि माय मराठी भाषेचे महात्म्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

          या काव्य मैफिलीत गझलकार मंगेश जनबंधू, सोनाली सहारे, अक्षय खोब्रागडे या माजी विद्यार्थी कवींनी तर महाविद्यालयातील डॉ. स्निग्धा कांबळे, डॉ. धर्मपाल फुलझेले तसेच भोजराज बावणे, पूर्वी खोब्रागडे, श्रद्धा बनकर, पायल ढोरे, प्रज्ञा ठवरे, पलक रामटेके, सिद्धेश्वर भोयर, मनीषा तलमले, पृथ्वीराज बोरकर, निलेश लाकडे या विद्यार्थ्यांनी काव्य वाचन केले.

         या सर्व आजी आणि माजी विद्यार्थी कवींनी प्रेमापासून परिवर्तनापर्यंत आणि विरहापासून विद्रोहापर्यंत अनेकविध आशयघन कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव तथा सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले. 

             या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, आजी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here