अहिल्यानगर (प्रतिनिधी):- मराठी भाषा ही लयबद्ध भाषा असून सुंदर सुंदर शब्द मराठी भाषेमध्ये आहेत, आपल्या मातृभाषेचा आपणा सर्वांना अभिमान असायला हवा, मराठी भाषा जपणे ही फक्त साहित्यिकांची जबाबदारी नसून सर्वसामान्य जनतेचीही जबाबदारी आहे* असे मत ज्येष्ठ साहित्यिक, शाहिर अरुण आहेर यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल, कॉटेज कॉर्नर मागे,मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी शब्दगंध चे संस्थापक, सचिव सुनील गोसावी,राज्य कार्यकारणी सदस्य, कवी सुभाष सोनवणे, बबनराव गिरी, शिरीष जाधव,स्वाती ठुबे व शर्मिला गोसावी इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.आहेर म्हणाले की, भाषेचं अस्तित्व वर्षानुवर्षे असून ही भाषा बोलीभाषा असल्याने मराठी भाषेचा गौरव करताना आनंद होत आहे, संत ज्ञानेश्वरा पासून भाषेचा लळा लागलेला आहे. साधु संतांनी मराठी भाषा आपल्या रचनांच्या माध्यमातून स्वतः साता समुद्रपार नेलेली आहे. म्हणून दरवर्षी मराठी भाषेचा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा व्हावा, शब्दगंधने नेहमीच यासाठी पुढाकार घेतलेला आहे, हे पाहून आनंद वाटतो.
सुभाष सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले की, महानुभवानी मराठी भाषेतून लिहिलेले ग्रंथ हजारो वर्षापासून जसेच्या तसेच आपल्यापर्यंत आलेले आहेत,लडिवाळ असलेली ही भाषा ज्ञान भाषा होणे आवश्यक आहे. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
यावेळी वर्षा भोईटे, विजयकुमार मगर, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, शिरीष जाधव,स्वाती ठुबे, सुनील गोसावी ,शर्मिला गोसावी, सुरेखा घोलप यांनी आपल्या रचना सादर केल्या.
कार्यक्रमास शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,अर्थवेध चे संचालक प्रसाद भडके, वैशाली भडके, हर्षली गिरी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव गिरी यांनी केले, सूत्रसंचालन कवयित्री सुरेखा घोलप यांनी केले तर शेवटी कवयित्री शर्मिला गोसावी यांनी आभार मानले.
उपस्थित सर्व मान्यवरांना आठवणींचा डोह, कविता तुझ्या नी माझ्या, ओवीतील शब्दफुले ही पुस्तके भेट देण्यात आली.




