आज महाशिवरात्र..! मी महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडले. नेहमीप्रमाणे मंदिराच्या ओट्यावर ती आजही मला बसलेली दिसली. शांत, स्तब्ध नेहमीच असते तशी. परंतु आज ती बरीच अस्वस्थ होती. डोळे लाल झालेले जणू नुकतीच रडून ती शांत झालेली होती..!
मी तिच्याजवळ जाऊन तिला प्रसाद दिला अन् तिची आस्थेने विचारपूस केली. परंतु ती काहीच बोलत नाही हे पाहून मी तिच्याजवळ जाऊन बसले. तिच्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा विचारले, “काय झालं आजी, बरं वाटत नाही का..?” एवढे विचारायचा अवकाश, ती एकदम ढसाढसा रडायला लागली. मला समजेना नेमके काय झाले ते… तिने भरपूर रडून घेतले आणि शेवटी व्यक्त होऊ लागली, “काय सांगू बाई माह्या कर्माची कथा…” अशी सुरुवात करून ती रडत रडत मला सांगायला लागली…
तिच्या मुलाने तिला आज खूप मारले होते आणि एवढ्यावरच नाही तर घरातून बाहेर हाकलूनही दिले होते. पहिल्यांदा ती काही सांगायलाच तयार नव्हती. परंतु मी मायेने तिची विचारपूस केल्यामुळे तिला बरे वाटले आणि ती सर्व सांगू लागली..!
तिचा मुलगा रोज दारू पिऊन घरी येतो. घरात काही हवं नको तर सोडाच, परंतु बायको, छोट्या दोन लेकरांचेही त्याला भान नाही. रोज दोन पैशाची मजुरी करून दारू ढोसून घरी येतो. त्यामुळे त्याची बायको, मुलाची परवड आजीला बघवत नाही. ती जमेल तशी मजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह करते, त्यांची काळजी घेते. हे रोजचंच झालं. मुलाचा, सुनेचा सांभाळ करता करता जे पैसे उरतील ते ती घर भाड्यासाठी जपून ठेवत असे. महिना संपला की डोक्यावर खोलीचे भाडे आ वासून उभेच असते. ते देणंही भागच असते, नाहीतर खोलीचा मालक केव्हाही बाहेर काढायची धमकी देतो. त्यामुळे ती त्या पैशाला हात लावत नव्हती. नाहीतर मुलाच्या बायको, मुलासहित संसार रस्त्यावर यायची तिला नेहमीच भीती वाटत असे. या विचाराने ती नेहमीच काळजीत असते..!
आज त्याच्याजवळ दारू पिण्याकरता पैसे नव्हते. तो तिला सारखे पैसे मागत होता आणि ती त्याला असहायपणे समजावत होती. परंतु तो ऐकायच्या मन:स्थितीतच नव्हता. हे काय रोजचेच होते. पण आज नात्याला लाज वाटेल अशी लाजिरवाणी घटना घडली. त्याने स्वतःच्या आईला पैशासाठी काठी-काठीने खूप मारले, ती बिचारी त्याला गयावया करून सांगत होती. परंतु तो निर्दयी एकसारखा तिला जिकडे पडेल तिकडे शरीराच्या भागावर मारत सुटला… घाणेरड्या शिव्या देणेही सुरूच होत्या. जेव्हा तो थकून गेला तेव्हा तिला हाताने ओढत त्याने बाहेर काढून घराचे दार बंद करून घेतले. तिच्या वयाचा तर नाहीच, परंतु नात्याचासुद्धा त्याने विचार करू नये ही किती शरमेची गोष्ट आहे. किती शोकांतिका म्हणावी ही..!
ती जेव्हा हे सर्व रडत रडत मला सांगत होती तेव्हा माझ्या अंगावर काटे उभे राहिले. तिचं हे सर्व ऐकतांना जीवाचा तिळपापड झाला. मी खरंच खूप अस्वस्थ झाले होते. तिच्या मुलाचा मला इतका संताप आला होता की, मी लगेच तिचा हात धरून म्हणाली, “चल आजी माझ्यासोबत पोलीस स्टेशनला, त्याचा रिपोर्ट द्यायला. एकदाचे पोलिसाचे दंडे बसले की, मग त्याला समजेल कसा तुला त्रास द्यायचा ते..! चार दिवस लॉकअप मध्ये राहिला की पोलीस त्याला चांगलेच सरळ करतील, तू चल माझ्याबरोबर..!” माझे हे पोलीस स्टेशनचे बोलणे ऐकून ती एकदम भानावर आल्यासारखी झाली. तिने लगेच स्वतःचे डोळे पदराने पुसले आणि मला हात जोडून म्हणाली, ” नाइ नाइ बाई पोलीसाले नका सांगू… मागल्या वेळनं पोलिसानं त्याले लइ बदडलं, अजून त्याले ठोकतील बाई. आज उद्या तो मले घरात घिलच. पण त्याले पोलिसात नका देऊ…” असं म्हणत ती मला गयावया करू लागली..!
खरंच ही ममता किती अगतिक-असहाय असते. हे सर्व आईच्या नात्यालाच समजावे काय..? देवाने तिच्याच पदरात भरभरून मुक्तहस्ताने ही माया, प्रेम, वात्सल्य दिले आणि बाकीच्या नात्याला तो द्यायचे विसरला की काय..? ती तिच्या वेदना विसरून पोटच्या अपत्याच्या दुःखाचे हिशेब फक्त तिनेच करावे काय..? मुलाने तिला एवढं मारल्यानंतरही ती स्वतःचे दुःख, वेदना विसरली अन् पोलिस त्याला मारतील या विचारानेच ती विचलित झाली. पोलीस त्याला मारण्याच्या भीतीने आपला त्रास बाजूला ठेवून तो पोलिसाच्या तावडीत जाऊ नये या विचारानेच किती अस्वस्थ झाली, विचलित झाली… किती ही तिची असहायता..!
मला ह्या घटनेने खूप अस्वस्थ केले, मी रडूही शकत नव्हते. नंतर मी तिच्याशी कोणत्या भाषेत बोलून तिच्या दुःखाची समजूत काढावी नि सांत्वना करावी हेही मला समजत नव्हते. मी तिचा विचार करत करतच आणि तिच्या झालेल्या परिस्थितीची कीव करतच घराकडे परतले. परंतु मला हे गणित कधीच सुटणार नाही. ही वात्सल्याची, ममतेची अगतिकता मला आयुष्यभर अस्वस्थ करून गेली, या विचाराने आयुष्यभराचे जगणे मात्र शिकवून गेली..!
सौ.शिवांगी आर. वेरुळकर(अमरावती)मो:-८८०५१८५५३६




