Home महाराष्ट्र शब्दगंध संमेलन एक विचारपीठ-डॉ. संजय कळमकर

शब्दगंध संमेलन एक विचारपीठ-डॉ. संजय कळमकर

99

▪️शब्दगंध संमेलनाचा समारोप संपन्न 

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि.14फेब्रुवारी):-शब्दगंध चे संमेलन हा केवळ उत्सव नसून साहित्यिकांसाठी विचाराचे विचारपीठ आहे. विचारपीठ उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची भूमिका शब्दगंध परिवार घेत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील नवोदित साहित्यिकांसोबतच मान्यवरही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात,ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, मराठी भाषेच्या विकासासाठी चाललेली ही धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे* असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या समारोप व पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वागताध्यक्ष संपत दादा बारस्कर हे होते. विचारपिठावर संमेलनाध्यक्ष डॉ.संजीवनी तडेगावकर,पारनेर चे आमदार काशिनाथ दाते, न्यु आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, मसाप चे अध्यक्ष किशोर मरकड, सौ.किरण बारस्कर, पंडितराव तडेगावकर, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, माजी नगरसेवक श्रीनिवास बोजा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शाहीर भारत गाडेकर यांच्या गीताने सुरू झालेल्या समारोप समारंभात पुढे बोलताना डॉ. संजय कळमकर म्हणाले की, 

‘ साहित्याचा हा जागर सर्वांनी मिळून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, संपतदादा बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे संमेलन निश्चितच नवोदितांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम करेल, अत्यंत दिमाखदार झालेले हे संमेलन विचाराची दिशा देणारे ठरले आहे. यातील परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन व तीन तीन काव्यसंमेलन, गझल संमेलन हे खरोखरच अविस्मरणीय ठरलेले आहे.’ 

प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे बोलताना म्हणाले की, ‘ गेल्या वीस वर्षांमध्ये शब्दगंधने उंच भरारी घेतलेली असून महाराष्ट्रातील अनेक पुस्तकांना त्यांनी पुरस्कृत केले आहे, समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, ही प्रेरणादायी गोष्ट आहे.’ 

संमेलनाध्यक्ष डॉ.संजीवनी तडेगावकर आपल्या मनोगतात बोलताना म्हणाल्या की, ‘ गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेला हा साहित्याचा उत्सव खरोखरच अविस्मरणीय असा झाला आहे. आत्तापर्यंत मी अनेक साहित्य संमेलनामध्ये गेलेली असून या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत आखीव,रेखीव पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून साजरा केलेला हा साहित्यिक उत्सव आहे, यातील परिसंवाद आणि सर्वच सत्रे या संमेलनाला दिशा देणारी ठरलेली आहेत. मान्यवरांचा सन्मान करत नवोदितांना संधी हे असं मिळण्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. जीवनगौरव पुरस्कार देऊन आपल्यातीलच मान्यवरांचा गौरव करण्याची परंपरा उत्कृष्ट अशीच आहे. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल सर्व परिवाराची मी आभारी आहे.’

स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर बोलताना म्हणाले की,शब्दगंधने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी सार्थपणे पेलण्याचा प्रयत्न केला असून सर्वांनी साथ दिल्यामुळे हे संमेलन यशस्वी झाले आहे. सर्व पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम शब्दगंधच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. शहरातील अनेक मान्यवर या संमेलनात सहभागी होत आहेत. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला साहित्यिकांशी जोडून घेताना मनस्वी आनंद वाटला. साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात हे सत्य या ठिकाणी दिसून आले.’

यावेळी समारोप समारंभाचे प्रास्ताविक शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी व डॉ.रमेश वाघमारे यांनी केले. दिगंबर गोंधळी यांच्या संबळ वादनाने या संमेलनात रंगत आणली तर कु. स्नेहल डाडर यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग लक्षवेधी ठरला. विनय मिरासे, यवतमाळ यांनी सांगितलेली वैधर्भीय कथा सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. आ. काशिनाथ दाते यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शब्दगंधचा उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कार ऋषिकेश राऊत, शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार श्रीमती वर्षा भोईटे, प्राचार्य अशोक दौंड, डॉ.शितल धरम, डॉ.जी.पी.ढाकणे, डॉ.राजाराम सोनटक्के, श्रीमती उषा चौरे,श्री आदिनाथ पडोळे यांना तर युवा उद्योजक पुरस्कार प्रसाद भडके यांना प्रदान करण्यात आले. प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती पुरस्कार प्रा.डॉ.शंकर चव्हाण, शेवगाव यांना तर के.डी सातपुते स्मृती पुरस्कार किशोर डोंगरे यांना तर विविध प्रकारच्या पुस्तकांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या शेवटी कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी आभार मानले. 

यावेळी येरवडा येथील वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवन्नाथ कानडे, डॉ.अशोक डोळसे, देविदास अंग्रख, डॉ.गणि पटेल, प्रा. सिताराम काकडे, डॉ. महावीरसिंग चोहाण, डॉ. अनिल पानखडे, डॉ.विनय पिंपरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागर बोरुडे, प्राचार्य जी.पी. ढाकणे, डॉ.अशोक कानडे, डॉ. तुकाराम गोंदकर, डॉ.अनिल गर्जे, स्वाती ठुबे, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे,राजेंद्र पवार, प्रशांत सूर्यवंशी, राजेंद्र चौभे, भगवान राऊत, मारुती सावंत, जयश्री झरेकर, सुरेखा घोलप , शर्मिला रणधीर,डॉ. किशोर धनवटे, हरिभाऊ नजन, डॉ.संजय दवंगे,व शब्दगंध युवा टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here