अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.13फेब्रुवारी):- काशीच्या राजाद्वारे सन्मानित झालेले,भेदभाव विरहित समतेवर व ममतेवर आधारित देशाची संकल्पना मांडणारे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज दि.१५ फेब्रुवारी १३९८ (माघ पौर्णिमेला) जन्मास आले आणि दि.१० ऑक्टोबर १५१८ ला १२० वर्षाचे उदंड आयुष्य जगून अनंतात विलिन झाले. जीवन जगताना त्यांनी जगाला जे जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान दिले ते अनमोल आहे. कर्माला ईश्वर समजून मनुष्याने कर्म केल्यास तो उच्च कर्म करेल नीच कर्म करणार नाही.त्यामुळे मानव समाज सुखी व समाधानी होऊन जगात शांतता निर्माण होईल. गुरु रविदास थोर समाजक्रांतिकारक होते.त्यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे.” असे प्रतिपादन समाजप्रबोधनकर्ते प्रा. अरुण बुंदेले यांनी केले.
ते श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था अमरावतीच्या वतीने श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 627 व्या जयंतीनिमित्त सर्वोदय कॉलनी येथील संस्थेच्या कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात विचार व्यक्त करीत होते .
जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिल भागवतकर (अध्यक्ष, श्री संत रविदास बहुउद्देशीय संस्था, अमरावती ), प्रमुख अतिथी प्रा.अरुण बुंदेले (अध्यक्ष, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान), कृष्णा मोहोकर, पुरुषोत्तम वनस्कर, संजय खंडारे, रमेश भटकर होते, तर मधुकर विरूळकर, डॉ.विजयराव तायडे, शगणेश भागवतकर, विशाल इंगळे, प्रभाकर बुंदिले, दिनेश भागवतकर, शिवम भागवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन केले.
अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी सर्वप्रथम स्वरचित ” निखारा” या काव्यसंग्रहातील ” संत रविदास ” या वंदन गीताचे गायन केले.
अध्यक्षीय भाषणातून श्री अनिल भागवतकर यांनी संत रविदास महाराज यांच्या विचाराची आज गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री कृष्णा मोहोकर तर आभार श्री संजय खंडारे यांनी मानले. कार्यक्रमाला समाजबांधव उपस्थित होते .




