Home अमरावती त्यागपूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे काव्यातून घडणारे अनोखे दर्शन

त्यागपूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे काव्यातून घडणारे अनोखे दर्शन

149

मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच जन्म १८९८ सालातील फेब्रुवारीच्या सात तारखेला झाला. मातोश्री रमाईचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) आणि आई रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर) यांनी केलेल्या सुसंस्कारातून रमाईचे बालपण घडले.

     रमाबाईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिकूजी आणि आई रुक्मिणी यांच्यासह त्या दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत होते. त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता.

रमाबाईंचे लग्न वयाच्या नवव्या वर्षी डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाले. त्या वेळी बाबासाहेबांचे शिक्षण सुरू होते. रमाबाईंनी बाबासाहेबांच्या जीवन संघर्षात नेहमीच साथ दिली. सामाजिक कार्यातही बाबासाहेबांना प्रोत्साहन देत होत्या. रमाबाईंनी स्वतःच्या संघर्षमय जीवनात किती अडचणींचा सामना केला असेल आणि कसा केला असेल हे सांगता येणार नाही.अर्थात अनेक अडचणींवर मात करीत त्या त्यागमय व संघर्षमय जीवन जगत राहिल्या.मागे वळून त्यांनी कधीच पाहिले नाही.त्या एक आदर्श पत्नी, आदर्श माता आणि आदर्श समाजसेविका होत्या.

    मातोश्री रमाबाईंचा मृत्यू १९३५ सालातील मे महिन्याच्या २७ तारखेला झाला. तेव्हा त्यांच्या निधनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठा धक्का बसला. त्यागमूर्ती रमाबाईंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला फक्त साथ दिली नाही तर त्यांचे कार्य पुढे नेण्याचाही प्रयत्न केला.बाबासाहेबांच्या खडतर काळात त्यांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला. त्यांच्या शिक्षणामध्ये आणि कार्यामध्ये स्वतः रात्रंदिवस कष्ट करून जी अनमोल मदत केली ती अवर्णनीय आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवेत व्यस्त असताना कोणतीही तक्रार न करता रमाबाईंनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळून एक आदर्श पत्नी आणि एक आदर्श माता कशी असते हे जगाला दाखवले.त्यांनी मुलांना चांगले संस्कार दिले आणि कुटुंबाला कष्ठमय जीवनातून आर्थिक स्थैर्य दिले.रमाबाई आंबेडकर यांनी दलित महिलांच्या उन्नतीसाठीच कार्य केले नाही तर महिलांना शिक्षण आणि स्वावलंबनाचे महत्त्व सांगून त्यांचे संसार सुखी करण्याचा प्रयत्न केला. रमाबाईंनी आपल्या कुटुंबासाठी खूप त्याग केले;म्हणूनच त्यांना त्यागमूर्ती रमाबाई म्हणतात. रमाबाईंनी डॉ.बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करून एक आदर्श निर्माण केला.प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या रमाबाईंच्या त्यागामुळे आणि समर्पणामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी आणि देशासाठी महत्त्वपूर्ण कार्य करू शकले.

     आज दि.७ फेब्रुवारी २०२५ ला असलेल्या त्यांच्या एक १२७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावरील महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील अनेक कवींनी आपल्या काव्यातून जे त्यांचे जीवन दर्शन घडविले आहे त्यातूनच “त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे काव्यातून घडणारे अनोखे दर्शन” या लेख लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे.

          भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मातोश्री रमाबाई विषयी म्हणतात की ” रमा खरी धनवान आहे. तिची खूप उधारी आहे माझ्यावर.मी कधीही फेडू शकणार नाही.तिने माझ्यासाठी अपार कष्ट सहन केले,उपास काढले.एका वस्त्रानिशी घरात राहिली.मला आमच्या मुलांना वाचविण्यासाठी काही करता आले नाही.हे समाजक्रांतीचे व्रत मी स्वीकारले आहे.मी माझ्या बौद्धिक व मानसिक शक्ती वाढविण्यासाठी एखाद्या योग्याच्या निष्ठेने समाजाच्या उन्नतीला आवश्यक असणाऱ्या सर्वांगीण अभ्यासाची समाधी लावली.दररोज २०-२२ तास अभ्यास केला.पदव्या मिळविल्या.मी प्रकांड पंडित झालो;पण कुटुंबासाठी मी काहीच करू शकलो नाही.”

       ” मी प्रकांड पंडित झालो पण कुटुंबासाठी मी काहीच करू शकलो नाही .” या दोन

वाक्यातच रमाबाईने संसारासाठी केलेलं कार्य किती अनमोल आहे याची प्रचिती येते.

     कवी प्रा.रविचंद्र हडसनकर (नांदेड) ” रमाई” या कवितेत कोणत्या महाग्रंथाचे रमाबाई अखंड वाचन करीत होत्या,हे सांगताना म्हणतात की,

“रमाई! तुला लिहिता येत नव्हतं, पण, तू अखंड वाचत राहिलीस ‘बाबासाहेब’ नावाचा महाग्रंथ ॥”

           प्रा.डॉ.यशवंत मनोहर ” करुणेची कविता तू ” या 

कवितेत रमाईने सूर्यासोबत कसा संसार केला हे उपमा या अर्थालंकारात सांगताना म्हणतात की,

 ” सूर्यासोबत संसार तुझा

   चांदणे झालीस आगीतही ॥   

   सुगंधाचे तारांगण तुझ्या

   मारून गेले मरणासही ॥ “

           कवी इ.मो.नारनवरे (नागपूर) “कारुण्य चांदणे”या उपमा अलंकारयुक्त कवितेत म्हणतात की,

संसार भीमाचा विराट सावरताना,

कारुण्य चांदणे फुलून आले होते ॥

 काळीज जनांचे काळजात जपताना,

ते अपुले जगणे भुलून गेले होते !

           पुण्याचे कवी विकास साळवे” माय रमाई ” या कवितेत रमाईला वंदन करताना म्हणतात की ,

 “अपार कष्ट साहून झिजली

  होऊन सुगंधी चंदन ॥

  नवकोटीची माय रमाई 

  तुला कोटी कोटी वंदन ॥ “

                नांदेडचे कवी प्रा.डॉ.अशोककुमार दवणे “रमाई ” या कवितेत रमाईने जीवनभर दुःख सहन करून सर्वांना सुख कसं दिलं हे सांगताना म्हणतात की ,

 ” सांगा रमाईसारखं 

   दुःख कुणाला लाभलं ?॥

   सर्वा सुख देण्यासाठी 

   दुःख उरात दाबलं ॥ “

       चंद्रपूर येथील कवयित्री गायत्री प्रकाश शेंडे ” रमाई ” या कवितेत म्हणतात की,

    ” हाताले टाचून

     जीव कष्टाले टांगला ॥

      माझ्या रमाईचा घाम 

      कसा पेटून उठला ॥ “

मी अमरावतीचा कवी अभंगकार 

माझ्या ” रमाई माता ” या अभंगामध्ये रमाई त्यागमूर्ती कशी हे सांगताना अभंग या छंदात म्हणतो की, 

 “कष्ट करणारी। त्यागी एक मूर्ती॥

बाबांची ती स्फूर्ती। रमा माता ॥ 

जल निर्मळता । अथांग सागर ।

तेजस्वी भास्कर । रमामाता ॥ “

       उपमा या अर्थालंकारयुक्त भाषेत रमाईचे गुण येथे मी वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

        कवयित्री पुष्पा बोरकर (अमरावती) “रमाई,आधार तू !” या कवितेत म्हणतात की,

” रमाई,फाटक्या संसाराचं 

   तू काटेरी लेणं 

   सूर्य सखा तुझा

   तू उजेडाचं देणं !”

अमरावतीचे कवी व गायक प्रकाशदीप वानखडे “रमाई”या कवितेत सुखदुःखात साथ देणाऱ्या रमाईचे चित्र रेखाटताना म्हणतात की,

” सुखात साथ देई, 

   दुःखात साथ देई

  अशी वलंगकराची, 

   रमाई लेक होती.”

          कवी डॉ.अशोक नामदेव पळवेकर ” रमाई ” या कवितेत रमाईच्या कष्ठमय जीवनाचे वर्णन करताना म्हणतात की ,

 ” तू तुझ्या पणतीत 

तेलाशिवाय वात होऊन 

नुसतीच जळत राहिलीस स्वतःलाच कळत गेलीस

अन् स्वतःलाच छळत गेलीस “

       सुख -दु:खात साथ देणाऱ्या रमाईचे वर्णन करताना ” रमाई माऊली ” या कवितेत कवयित्री प्रतिभा प्रधान म्हणतात की ,

 ” भीम क्रांतिकारी बाई

    रमा त्यांची साथ ॥

    दोघांच्या संगतीने होती

    सुख – दुःखात गा साथ ॥ “

        मुंबईच्या कवयित्री उर्मिला पवार ” रमाई ” कवितेत निखार्‍यावरून चालणाऱ्या रमाईचे चित्र रेखाटताना म्हणतात की, 

” हातात घेऊन निखारा    

 चाललीस ही निखार्‍यावरून ॥

 गरिबीचा वनवा होता चहुकडे

 तरी ब्र नाही काढलास ओठातून” 

              गरिबीच्या वणव्यातून चालताना सुद्धा कोणत्याही प्रकारची तक्रार न करता जीवन जगणारी जर कोणी असेल तर ती रमाईच.

        नंदादीप होऊन तेवत राहणाऱ्या रमाईचे वर्णन गोव्याच्या कवयित्री मंदा धनराज सुगीरे यमक अलंकारयुक्त कवितेत म्हणतात की ,

 ” संयमी होती माता रमाई

  संसारी सर्वांची जणू मायबाप ॥  

  होऊनी दिव्याची तेज वात

 तेवत राहिली होऊनी नंदादीप ॥”

        कवायित्री सुरेखा भगत “रमाई” या कवितेत रमाईला सरिताची उपमा देताना म्हणतात की,

“हृदयात तू बाबासाहेबांची प्रवाहिका ॥

जणू सागराला समर्पित झालेली सरिता ॥”

            कवयित्री उषा भालेराव “रमाई माऊली”या कवितेत म्हणतात की,

“रमाई माऊली गं रमाई माऊली ॥

ऊन झेलुनी अंगावर,

 तू झालीस भीमाची सावली ॥

       प्रा.संजय घरडे (अमरावती) “रमाई”या कवितेत सूर्य कवेत घेणाऱ्या रमाईचे वर्णन करताना म्हणतात की,

” त्या सुखाच्या शिवेवरती।

 वेदनेचे गाव होते ॥

 सूर्य जी कवेत घेई।

 रमा तिचे नाव होते ॥”

                कवी दिगंबर झाडे “रमाई” या अभंगात जनांसाठी जगणाऱ्या रमाईचे चित्र रेखाटताना म्हणतात की,

   “आम्हासाठी केली। 

  आयुष्याची माती।

   उजळल्या वाती। 

   कोटी कोटी ॥”

          कवी प्रा.अरविंदकुमार मनोहर (अमरावती) “माता रमाई” या कवितेत त्यागमूर्ती रमाईचे चित्र रेखाटताना म्हणतात की,

“त्यागमूर्ती ठरली तू माता रमाई । कोटी जनांची तू माता रमाई ॥”

      कवयित्री सुनंदा बोदिले ” रमाई “या कवितेत रमाईच्या कष्टमय जीवनाचे वर्णन करताना म्हणतात की,

“तुझ्या कष्टाची किंमत,

 मोजता कुठे येत नाही॥   

 काळजातील जागा तुझी,

 रीती कधीच होत नाही.॥

         ” भारताचं विद्यापीठ रमाई ” लेखक,कवी,समीक्षक,संपादक प्रा.डॉ.अशोककुमार दवणे यांनी संपादित केलेला महाकाव्यग्रंथ वाचण्यात आला.या महाकाव्यग्रंथातील व प्रस्तुत लेखातील मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरील महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील अनेक कवींनी रेखाटलेल्या कविता रसयुक्त व काव्यगुणयुक्त असून शब्दालंकार -अर्थालंकार व छंद युक्त आहेत.अर्थपूर्ण कविता वाचनीय आहेत. रमाबाईंचं संपूर्ण जीवन वाचकांसमोर उभं करणाऱ्या आहेत.

          अशाप्रकारे रमाईच्या विविध पैलूंवर अनेक कवितेमध्ये करुण रसामध्ये कवी व कवयित्रींनी वर्णन केलेले आहे.या काव्यांमध्ये रमाईचा खडतर जीवन संघर्ष जो कवींनी रेखाटलेला आहे तो वाचताना वाचकांच्या डोळ्यामधून अश्रू आले नाही तरच नवल. खरोखरच या प्रत्येक कवी व कवयित्रींनी मातोश्री रमाबाईचे अनोखे काव्यमय जीवन दर्शन वाचकांना घडविले आहे. 

       आज दि.७ फेब्रुवारी २०२५ ला असलेल्या १२७ व्या जयंतीनिमित्त मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥

रमाईला माझे । आज जन्मदिनी

वंदन करांनी । कोटी कोटी ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(रुक्मिणी नगर,अमरावती) भ्र.ध्व. : 8087748609

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here