भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका व शिक्षिका,पती महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत भारतातील महिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या,भारतीय स्त्रीवादाची जननी,भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या आज दि.3 जानेवारी 2025 ला असलेल्या 193 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
तत्कालिन काळात स्त्रियांनीच नव्हे तर बहुजन समाजातील पुरुषांनी शिक्षण घेणे पाप समजत.आज सर्व समाजात उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक स्त्रिया आढळतात;परंतु सावित्रीबाईंच्या काळात अस्पृश्य किंवा बहुजन समाजातीत इतकेच काय सर्वमान्य अशा ब्राह्मण कुटुंबातही शिक्षण घेतलेली मुलगी नव्हती.अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले आणि अस्पृश्यांच्या व स्त्रियांच्या उद्धारासाठी फार मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार केला.शिक्षण प्रसाराच्या या शैक्षाणिक कार्यामुळे व सामाजिक कार्यामुळे त्यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दि.३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळे पेट्यात शिरवळपासून ५ किलोमीटर वर असलेल्या नायगाव येथे झाला. सावित्रीबाईची आई लक्ष्मी व वडील खंडोजी नेवसे पाटील शेतकरी होते. सावित्रीबाईंच्या जन्माच्या वेळी पेशवाई मावळून तेरा वर्षे झाली होती आणि इंग्रजांचा अमंल सुरु झाला होता.सावित्री आईसारखी गोरीपान व सुंदर होती.प्रकृतीने वडिलांप्रमाणेच धडधाकट व निरोगी होती.बालपणापासून आई-वडिलांनी सावित्रीवर जे सुसंस्कार केले होते.त्यामुळे सावित्रीचे व्यक्तिमत्व घडत गेले. सावित्री
लहानपणापासूनच कधी खोटे बोलत नसे. कोणाची चेष्टा करीत नसे. कोणी खोटे बोलले किंवा कोणी तिची चेष्टा केली तर तिला आवडत नसे.ती तशी प्रेमळ होती;पण एखाद्या दुर्बल मुलाची एखाद्या सबल मुलाने खोड काढली तर तिला आवडत नसे,त्यामुळे खोडकर मुले सावित्री पासून दूरच राहत असत.सावित्री सहा वर्षाची असतानाच शेतात काम करणे.गुरे – ढोरे सांभाळणे, गाई – म्हशींच्या धारा काढणे अशी सर्वच कामे करू लागली.
सावित्रीला विहिरीत चांगल्या प्रकारे पोहता येत होते. मोटेच्या चाकावर उभी राहून ती विहिरीत झेप घेऊन तळातील गाळ मुठीत धरून वर आणत असे.गोफण मारण्यातही ती पटाईत होती. अचुक नेम धरून हवी ती चिंच किंवा हवा तो पिकलेला आंबा दगडाने झाडावरून खाली पाडत असे.एकदा ती संवगड्यांबरोबर रानात आंबे खायला गेली होती.एका आंब्याच्या झाडावर पक्षांचा अखंड किलबिलाट चालला होता.एक नाग पक्षांच्या घरटयातील अंडी खाण्यासाठी हळूहळू झाडावर चढत होता.
सर्व सवंगडी घाबरले;परंतु सावित्रीने न डगमगता आपल्या उजव्या हाताने एक अणकुचीदार दगड नेम धरून नागाच्या डोक्यावर मारला, तेव्हा नागाने चिडून मुलांच्या घोळक्यात उडी मारली आणि सर्व मुले किंचाळून गावाकडे धावत सुटली.त्यांनी संपूर्ण गावाला आंब्याच्या झाडाजवळ गोळा केले.सर्व भयचकीत झाले.सावित्री मोठ्या त्वेषाने नागाला दांडक्याने ठेचत होती व तोंडाने बडबडत होती. ” मेल्या गरीब पक्षांची अंडी खाण्यास सोकावला होतास काय? ” तेवढ्यात खंडोजी पाटलांनी जवळ जाऊन सावित्रीला उचलून कडेवर घेतले. कमालीची हिंमत व धैर्य बालपणीच सावित्रीच्या अंगी कसे होते,हे या उदाहरणावरून कळते.सावित्रीची बुद्धी तीक्ष्ण होती,तशीच ती चपळ होती, उद्योगी होती,जिज्ञासू होती, आळशी नव्हती,त्यामुळेच वाढत्या वयाबरोबर सावित्रीच्या व्यक्तिमत्वात चातुर्य व हुशारी येत गेली .
सावित्री एकदा शिरवळच्या आठवडी बाजाराला गेली तेव्हा तिथे तिने जिलेबी व भजी विकत घेतली. ती खाता खाता एका झाडाखाली काही मिशनरी बायका व पुरुष गाणे गात असलेले तिला दिसले.ती भजी खात खात त्यांचे गाणे ऐकू लागली.एका साहेबाचे तिच्याकडे लक्ष गेले.’बाळ असं रस्त्याने खात खात हिंडू नये,हे ऐकताच सावित्रीने आपल्या हातातली भजी फेकून दिली.साहेबाने म्हटले, ” किती शहाणी आहेस ग तू. हे घे तुला पुस्तक देतो.तुला वाचता नाही आले तरी त्यातली चित्र पाहून तुला आनंद होईल आणि हा खाऊ. घरी जाऊन खा “.सावित्रीने घरी येऊन खाऊ व पुस्तक कौतुकाने आपल्या वडिलांना दाखविले. त्याबरोबर त्यांनी रागारागाने त्या वस्तु उकीरड्यावर फेकल्या. सावित्रीबाईला पुस्तकाविषयीच्या कुतुहलाने स्वस्थ बसवेना. तिने कुणी जवळ नाहीसे पाहून पुस्तक उचलून घरात आणले आणि अडगळीजवळच्या कोनाड्यात ठेवून दिले.पुढे जोतीराव फुले यांच्याशी लग्न झाल्यावर आपल्या सामानातून हे पुस्तकही तिने सासरी नेऊन जपून ठेवले आणि शिक्षणाची संधी मिळताच वाचून काढले.
अशी सावित्रीबाईसारखी जिज्ञासू वृत्ती असणे आवश्यक आहे.
तत्कालीन काळात मुलगी ६ वर्षांपेक्षा मोठी होऊनही व मुलगा १० वर्षांहून मोठा होऊनही त्यांची लग्ने न झाल्यास त्यांना घोडनवरी व घोडनवरा म्हणत.मुलीवरील उत्कट प्रेमामुळे लग्न झाल्यावर ती दृष्टीआड होईल म्हणून सावित्रीच्या वडिलांनी तिचे लग्न त्याकाळाच्या मानाने उशीरा केले.लग्नाच्या वेळी सावित्री नऊ वर्षांची व जोतीराव बारा वर्षांचे होते.लग्न झाले पण घरात बाई माणूस कोणीच नव्हते. गोविंदराव आणि जोतीराव असे दोघेच घरात राहत होते. जोतीरावांचे वडील गोविंदराव यांना दुसऱ्याने केलेला स्वयंपाक चालत नसे ते स्वतः स्वयंपाक करीत. मग दोघं बापलेक जेवत
जोतीराव मिशनऱ्यांच्या शाळेत जात होते हे लोकांना धर्मबाह्य वाटत होते. लोक गोविंदरावांची निंदा करू लागले यामुळे गोविंदरावांनी त्यांना शाळेतून काढून शेतकामात घालले. जोतीराव दिवसभर शेतीत काम करायचे. गावात गेले तर ते त्यांची मावस बहीण सगुणाबाईच्या घरी जेवायचे.
जोतीरावांच्या आईचे ते नऊ महिन्यांचे असतानाच निधन झाले होते.त्यामुळे त्यांचे दोन अडीच वर्षे फार हाल होत होते. पुढे जोतीबांची मावसबहीण सगुणाबाईनी त्यांना सांभाळण्याचे काम हाती घेतल्यावर त्यांचे व्यवस्थित संगोपन होऊ लागले. लहानपणापासून ते सगुणाबाईस आऊ म्हणायचे.सगुणाबाईचीही त्यांच्यावर स्वतःच्या मुला सारखीच माया होती.या थोर बाईचे दर्शन घेतल्याशिवाय जोतीरावांना एक दिवसही करमत नसे.ती त्यांना शिकण्याचा नेहमी उपदेश करी. तिने एकदा जोतीरावांना म्हटले.
“जोती, सावित्रीला माहेरी किती दिवस ठेवायचे ? घेऊन ये एकदा. घरी बाई माणूस नसले तर ती मजजवळ राहील. तुला का मी परका मानते ? इथे आली तर ती तुला शेतकामास मदतही करील. तुलाही शिकण्यास वेळ मिळेल”.
सगुणाबाईचे आग्रहाचे हे बोलणे जोतीरावांना पटले त्यांनी ते वडिलांच्या कानावर घातले. वडिलांच्या परवानगीने जोतीरावांनी सावित्रीबाईस आणले.सावित्रीबाईंना शेतकामाची सवय होती. सगुणाबाईच्या येथील घरकाम आटोपून त्या शेतातील काम करावयाच्या. कष्टाळूपणा आणि सरळ स्वभाव यामुळे सावित्रीबाई सगुणबाईस फारच आवडू लागल्या. सगुणाबाईचे सान्निध्य उभयतांच्या कोवळ्या मनास शिक्षण घेण्याची व समाजसेवा करण्याची इर्षा उत्पन्न करण्यास कारणीभूत झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.इ. स. १८४२ साली जोतीरावांना लिजिटसाहेबाच्या सहानुभूतीने सरकारी शाळेत प्रवेश मिळाला. ते पुन्हा शाळेत जाऊ लागले व इंग्रजी शिकू लागले. विद्यार्थी असतानाच त्यांनी समाजसेवेचे प्रथम कोणते कार्य हाती घेतले असेल तर ते आपल्या बायकोस सावित्रीला शिकविण्याचे ! त्यांनी सावित्रीबाईस मराठी वर्णमालेपासून शिकविण्यास प्रारंभ केला. सावित्रीबाईंनीही अभ्यास करण्याची कधी टाळाटाळ केली नाही.आपण शिकावे व दुसऱ्यास शिकवावे ही आपल्या पतीची इच्छा आहे हे त्यांनी हेरले आणि तशी पात्रता अंगी आणण्याचा त्या मनापासून प्रयत्न करू लागल्या.
लवकरच मराठीप्रमाणे त्यांनी इंग्रजीचे ज्ञान संपादन केले.त्या मिशन स्कूलमधून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या.जोतीरावांसारख्या थोर पतीच्या सहवासाने व मिळालेल्या शिक्षणाने सावित्रीच्या अंगची मूळची तेजस्विता अधिक प्रकशमान झाली.स्त्रियांना व निरक्षरांना शिक्षण देण्याच्या विचारांनी त्यांनी आपल्या हातात समाजसेवेचे व्रत अंगिकारले. शैक्षाणिक कार्याला वाहून घेतले. सावित्रीबाई फुले यांचे चरित्र म्हणजे कार्यकर्ती स्त्रिचा एक आदर्श नमुना असून आजच्या समाजसेविकांना,कार्यकर्ती स्त्रियांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून कार्य केल्यास त्यांच्यापासून समाजाला फार मोठा फायदा होऊ शकतो.ज्या समाजसेविका,कार्यकर्ती स्त्रिया आज सावित्रीबाईच्या चरित्राप्रमाणे कार्य करीत असतील त्यांचे मनस्वी अभिनंदन.
इ.स.१८४७ साली जोतीराव फुले वयाच्या २० व्या वर्षी मॅट्रिक्युलेशन परीक्षेत उत्तीर्ण झाले.यानंतर त्यांनी निरक्षरतेमुळे बहुजन समाजाचे खूप हाल होत आहे त्यांना फसविल्या जात आहे हे समजल्यावर आपल्या मित्राच्या सहाय्याने दि.१ जानेवारी १८४८ साली पुणे येथे बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची एक शाळा स्थापन केली.मुलींसाठी
काढण्यात आलेलो ही शाळा संपूर्ण भारतात पहिलीच होती. या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईस नेमण्यात आले.सावित्रीबाई या भारतातीलआद्य मुख्याध्यापिका व आद्य शिक्षिका होत्या. ही शाळा स्थापन करताना संस्थापकांना जितके कष्ट पडले त्यापेक्षा अधिक त्रास शाळा चालविताना सावित्रीबाईंना झाला होता.त्यांच्यावर अनेक संकटे आली,आळ व कुभांड रचण्यात आले.अनेक संकटांना तोंड द्यावे लागले.
सामाजिक चळवळीतील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले त्यांचे नाव अजरामर झालेले आहे .भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी जीवनभर कार्य केले. सावित्रीबाईंनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडविला.
दि.३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये,पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त गूगल डूडल प्रसिद्ध करून गूगलने त्यांना अभिवादन केले. जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांचे महाराष्ट्रातील अनेक शहारात त्यांच्या स्मरणार्थ भव्य पुतळे उभारलेले आहेत.
शिक्षण क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही सावित्रीबाईंनी कार्य केले. क्रूर रूढीं व परंपरांनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत.गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार,जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतीरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. एकाही मुलाची आई नसणाऱ्या सावित्रीबाई शेकडो मुलांच्या आई झाल्या.याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. व त्याला डॉक्टर केले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कार्ये सावित्रीबाईंनी कल्पकतेने केली. सत्यशोधक समाजाचे कार्यही सावित्रीबाईंनी केले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर म्हणजे १८९० नंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचे कार्य रात्रंदिन केले.आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह प्रकाशित करून समाजात फार मोठ्या प्रमाणात जागृती केली.त्यानंतर त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.इ.स.१८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजात सत्कार्याचा एक आदर्श निर्माण केला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
महिलांच्या हक्कांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली.त्यांनी महिलांसाठी जातीय भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव मुक्त असलेल्या मेळाव्याचे आयोजन करून उपस्थित सर्व महिलांनी एकाच चटईवर बसविले. त्यांनी महिलासांठी निवारास्थान उघडले, जेथे ब्राह्मण व इतर समाजातील विधवा त्यांच्या मुलांची सुरक्षितपणे प्रसूती करू शकत होत्या आणि त्यांची इच्छा असल्यास त्यांना दत्तक घेण्यासाठी तेथे सोडू शकतात. त्यांनी बालविवाहाविरुद्धही मोहीम चालवली आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सतीप्रथेला कडाडून विरोध केला आणि त्यांनी विधवा आणि वंचित मुलांना निवारा दिला.
इ.स. १८९६-९७ च्या दरम्यान पुणे परिसरात प्लेगची साथ आली. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला.त्यामुळे दि.१० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. समाजाची सेवा करता करता असे त्यांना वीर मरण आले. अशा या महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
लेखक:-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(रुक्मिणी नगर,अमरावती)भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९




