दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006
परवा पलूस येथे आमदार विश्वजीत कदम यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना आपल्याला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे म्हंटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात त्यांनी हा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांना निवडणूकीत विजय मिळाला पण तो सन्मानजनक नाही. विजयासाठी त्यांना खुप झगडावे लागले. अनेक फे-यात त्यांची दमछाक होत होती. संग्राम देशमुखांनी त्यांना चांगलेच रांगायला लावले. अखेर त्यांचा विजय झाला पण तो साजरा करण्यासारखा नव्हता. ते तीस हजाराच्या मताधिक्याने निवडूण आलेत. मतदारसंघात साहेबांनी उभा केलेला विकासाचा डोंगर पाहता हा विजय छोटा वाटतो आहे. निवडूण येताना त्यांची खुपच दमछाक झाली. ते पतंगराव कदम साहेबांच्या पुण्याईने निवडूण आले. यात त्यांचे स्वत:चे योगदान होते असे नाही म्हणता येणार. पतंगरावांची पुण्याई नसती तर विश्वजीत कदमांना निवडणूक जिंकणे शक्य नव्हते. त्यांनी परवाच्या निकालाबाबत जरूर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
आमदार विश्वजीत कदम यांनी काही काही प्रश्न स्वत:ला विचारावेत. ते विरोधी उमेदवाराला तोडीचा उमेदवार समजत नाहीत हे ठिक आहे पण त्यांच्या आयुष्यातली पतंगराव कदमांची पुण्याई, संस्था आणि भारती उद्योग समुहाचे नेटवर्क वजा केले तर ते तरी त्या उमेदवाराच्या तोडीसतोड होवू शकतात काय ? याचाही विचार करावा. विश्वजीत कदमांना आता स्वत:ची पुण्याई निर्माण करावी लागेल. त्यांच्या मतदारसंघात भारती उद्योग समुहातले हजारो कर्मचारी आहेत. विकासाची प्रंचड कामे आहेत. विकासासाठी भरघोस निधी आणला गेला आहे. पतंगराव कदमांनी कडेगाव मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यांनी जे विकासाचे चित्र उभे केले आहे ते प्रचंड आश्वासक आहे. जिथं केवळ कुसळं उगवत होती तिथं आज हिरवेगार नंदनवन उभारले आहे. असे असतानाही विश्वजीत कदमांना विजयासाठी झगडावे लागते. मतदारसंघात तळ ठोकावा लागतो. प्रचंड पैसा ओतावा लागतो. ही वेळ त्यांच्यावर का येते ? या बाबत विश्वजीत कदमांनी आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. पतंगराव साहेबांची पुण्याई होती म्हणूनच विश्वजीत कदम आमदार, मंत्री होवू शकले. आताही त्यांच्यासाठी पतंगराव कदमांची पुण्याई कामी आली. पण भविष्यात पुन्हा पुन्हा ही पुण्याई कामाला येईल असे वाटत नाही. विश्वजीत कदमांना स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर पुण्याई निर्माण करावी लागेल.
त्यासाठी स्वत:वर अजून खुप काम करावे लागेल. त्यांच्यात एक चांगला व ताकदीचा नेता दडला आहे. त्यांनी स्वत:वर काम केले तर भविष्यात त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. जी संधी पतंगराव कदमांना मिळाली नाही ती विश्वजीत यांना मिळू शकते. मतदारसंघात खुप कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. विश्वजीत कदमांची आणि सामान्य कार्यकर्त्यांची भेटच होत नाही. त्यांच्या आणि सामान्य जनतेच्या मध्ये विश्वजीत कदमांच्या जवळचे काही टगे भिंतीसारखे उभे असतात. ते त्यांना विश्वजीत कदमांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यांच्या पी ए मंडळीवरही लोक नाराज आहेत. चहापेक्षा किटली गरम असा प्रकार असल्याचे लोक बोलत आहेत. एखाद्या गावात कार्यक्रम घेतला तर अख्या स्टेजवर कदम कुटूंबातल्याच लोकांची गर्दी असते. सगळे भाऊबंद स्टेजवर असतात. त्या गावच्या सरपचांनाही स्टेजवर बसायला जागा मिळत नाही, इतके नेत्यांचे अफाट पीक कदम कुटूंबात उगवून आले नाही. या सगळ्यांना संधी द्यायची म्हटली तर पाच-पन्नास मतदारसंघ विश्वजीत कदमांना बांधावे लागतील. तिथल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते कम पगारी नोकर म्हणूनच कामावर घ्यावे लागेल.
तालुक्यातल्या ग्रामपंचायतीतले सरपंच, सोसायटीतले चेअरमनसुध्दा कार्यकर्ते होवू शकतील की नाही ? इतके नेत्यांचे पिक आणि गर्दी विश्वजीत कदमांच्या घरातच आहे. त्यामुळे महत्वकांक्षा असणारा सामान्य कार्यकर्ता गुदमरतो आहे. कदम घरातील ही नेत्यांची वाढती गर्दी कार्यकर्त्यांच्या नैसर्गिक हक्कावर गदा आणणारी आहे. विश्वजीत कदमांनी कधीतर तटस्थपणे मतदारसंघाचा कानोसा घ्यावा. मतदारसंघातील जनता नेमकी काय म्हणते ? लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रीया आहेत ? याचा अंदाज घ्यावा. विश्वजीत कदमांनी पतंगराव साहेबांच्यानंतर कदम गटाचे सुकानू सांभाळले आहे पण पंतगराव ज्या ताकदीने, तळमळीने, जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने सांभाळत होते, जपत होते. ते विश्वजीत कदमांच्याकडून होत नाही. कुठेतर अंतर पडते आहे. कुठेतर ‘अहं’ भाव डोकावताना दिसतो आहे. ‘मी’, मी’ ‘आम्ही’ असं या कर्तेपणाचं ओझ लोकांच्या मानगुटीवर ते टाकताना दिसत आहेत.
पतंगराव कदम तळागाळातून आणि जमिनीतून उगवलेले नेतृत्व होते. विश्वजीत कदम पतंगरावांच्या कर्तृत्वाच्या कुंडीत उगवलेले नेतृत्व आहेत. विश्वजीत कदमांना पतंगरावांच्या कर्तृत्वाची कुंडी फोडून जमिनीत रूजावे लागेल. स्वत:ची पाळमुळं खोलवर रूजवावी लागतील. कर्तृत्वाची मुळं जेवढी खोल जातील तेवढी नेतृत्वाची उंची वाढेल. त्यांना जन-माणसांच्या काळजात बसावं लागेल. पतंगरावांच्या ह्रदयातला जनतेप्रती असणारा जिव्हाळा, ओलावा, बांधिलकी आणि आत्मियता त्यांना स्वत:च्या आत निर्माण करावी लागेल. विश्वजीत तसा प्रयत्न करतायत पण हे प्रयत्न कोरडे आहेत. ‘आई’ चं ह्रदय आणि ‘दायी’ चं ह्रदय यात जे अंतर आहे ते अंतर विश्वजीत यांच्या सध्याच्या प्रयत्नात आहे. पतंगराव आपल्या कार्यकर्त्यांच्याकडे, मतदारसंघाकडे आणि एकूणच जिल्ह्याकडे आईच्या नजरेतून पहात होते. विश्वजीत कदमांनाही त्याच नजरेने पहावे लागेल. कार्पोरेट जगतासारखा असलेला दृष्टीकोन बदलावा लागेल. अवतीभोवती जमलेली चेले-चपाट्यांची झुंड बाजूला सारून जनतेत मिसळावं लागेल. गावोगावच्या काही मुठभर टग्यांनी त्यांच्या आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या मध्ये उभारेली भिंत पाडावी लागेल. कुठलाही सामान्य कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत सहज पोहोचायला हवा. त्यांना जे लाभलय ते त्यांच्या बापपिढीची पुण्याई आहे. ते पतंगराव कदम आणि त्यांच्यावर प्रेम करणा-या असंख्य कार्यकर्त्यांच्या त्यागातून, समर्पणातून व बलिदानातून उभारले गेले आहे याचे भान ठेवावे लागेल. काहीही झाले तरी पाय जमिनीवर ठेवावे लागतील.
विश्वजीत कदम यांच्यात नेतृत्वाची क्षमता चांगली आहे. ते म्हणतात तसं पतंगराव यांच्या पुढचे ते व्हर्जन आहेत. तसं असेल तर पतंगरावांच्या दुप्पट कार्यक्षमता, जिव्हाळा, बांधिलकी, आत्मियता त्यांच्यात असायलाच हवी. लोकांना त्यांच्याकडून खुप अपेक्षा आहेत. लोक त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत. या अपेक्षांच आणि जबाबदारीच ओझ त्यांच्या मानेवर आहे. त्यांनी खरच या सगळ्याबाबत आत्मपिरक्षण करावं. नाहीतर भविष्य कठिण आहे. साहेबांच्या ‘पुण्याई’ ची पुंजी खर्च झालीय याचेही भान ठेवायला हवे. त्यांनी याचे भान ठेवले, स्वत:त सकारात्मक बदल केला तर त्यांच्या पक्षीय आणि मतदारसंघाच्या ‘विश्वा’ त त्यांचीच शानदार ‘जीत’ असेल हे नक्की.




