(मोर्शी तालुका प्रतिनिधी) : मोर्शी तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेला जोडणारे महाराष्ट्रातील शेवटचे घोडदेव गाव पाचशेहून अधिक लोकवस्तीच्या गावाला मागील ७ वर्षापासून आजपर्यंत महत्वाचा रस्ता मिळालेला नाही. त्यामुळे घोडदेव येथील नागरिकांच जगणं मुश्कील झालेल्या आदिवासींवर रस्ता देता का रस्ता असं म्हणण्याची वेळ आलीय. “गाव तिथं रस्ता’ ही सरकारची जाहिरात किती फसवी आहे, असे घसा कोरडा करुन आदिवासी बांधव सांगताहेत पण त्यांची दखल जिल्हा परिषद बांधकाम विभाग घेतांना दिसत नसून कंत्राटदाराला पाठीशी घालतांना दिसत आहे.
डोंगरयावली घोडदेव हा रस्ता ग्रामिण मार्ग क्र. १५ असुन हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे संपूर्ण रस्त्याचा पृष्ठभाग खराब झाला आहे, सदर रस्त्यावर ३०५४ म्हाडा मिनीमाडा ३०४४/०३०६ व ३०५४/०४०७ या लेखाशिर्षका अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सा. क्र. ०/०० ते १/२०० मध्ये रस्ता सुधारण्याचे रुपये ३० लक्षाचे काम मंजुर आहे. तसेच ३०५४ गट ब अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सा.क्र. १/०० ते २/५०० रुपये २० लक्षांचे काम मंजुर असुन दोन्ही कामे मंजूर झाली असून सदर कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत असून संपूर्ण कामाची गुण नियंत्रक पथकातर्फे तपासणी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदराला ब्लॅक लिस्ट टाकून सदर रस्त्याचे काम अंदाज पत्रकानुसार करण्याची उपसरपंच कांचन कुकडे यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केली आहे.
या आधी सुद्धा डोंगरयावली घोडदेव रस्त्याचा आवाज शासकीय यंत्रणेपर्यंत पोहचऊन डोंगर यावली घोडदेव रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठऊन तत्काळ काम चालू करण्यासाठी डोंगर यावली येथील उपसरपंच कांचन कुकडे, यांच्या नेतृत्वात खड्डेमय झालेला अपघातग्रस्त डोंगर यावली रस्त्यावर बेशरमचे झाड लावून शासनाचा निषेध करण्यात आला असता त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन या रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठऊन सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून सदर रस्त्याचे काम तत्काळ पूर्णत्वास न गेल्यास तीव्र आंदोलनाचा उपसरपंच कांचन कुकडे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिला आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग आदिवासी बांधवांच्या व्यथा समजून घेणार का ?
मोर्शी तालुक्यातील डोंगर यावली ते घोडदेव रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत असून हा रस्ता मृत्यूला निमंत्रण देणारा ठरत आहे. या रस्त्यावरील खड्डे पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झाली आहे. दोन किमीच्या या संपूर्ण रस्त्याची अवघी चाळणी झाली असून दररोज लहान -मोठे अपघात होत आहेत. परंतू जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते, परंतू शासनाला त्यांच्याशी काहीएक देणेघेणेच नसल्याचे शासनाच्या कार्यप्रणालीवरुन दिसून येते.




