Home महाराष्ट्र भ्रष्टाचार ; देशाला लागलेली किड ( आंतररष्ट्रीय भ्रष्टाचार...

भ्रष्टाचार ; देशाला लागलेली किड ( आंतररष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त विशेष लेख )

210

 

 

९ डिसेंबर, आजचा दिवस संपूर्ण जगात भ्रष्टाचार विरोधी दीन म्हणून साजरा केला जातो. भ्रष्टाचार ही आज जगातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. भारतातच नाही तर जगात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड होत आहेत. जगात असा एकही देश नाही जिथे भ्रष्टाचार होत नाही. भारतात तर आज भ्रष्टाचार शिष्टाचार बनला आहे. जगातील सर्वात भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा क्रमांक लागतो ही खेद जनक बाब आहे. भ्रष्टाचाराची ही किड भारतात खोलवर रुजली आहे. भ्रष्टाचाराची ही किड देश पोखरत चालली आहे. भारतातील भ्रष्टाचार कमी करणार असे सर्वच राजकीय पक्ष सांगतात. देशातील भ्रष्टाचार संपवणार अशी प्रतिज्ञाच काही राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी केली होती पण देशातील भ्रष्टाचार संपवणे तर दूरच पण दिवसेंदिवस देशातील भ्रष्टाचार वाढत चालला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील ग्लोबल फायनांशियल इंटिग्रेटी या भ्रष्टाचारावर सर्व्हे करणाऱ्या संस्थेने मागील वर्षी एक अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार गेल्या सत्तर वर्षात लाचखोरीमुळे देशाचे ४५०अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. ४५० अब्ज डॉलर ही काही छोटी रक्कम नाही. भ्रष्टाचारी लोकांनी देशाची ४५० अब्ज डॉलर पचवले. हे ४५० अब्ज डॉलर गोरगरिबांच्या मेहनतीचे होते मात्र भ्रष्टाचाऱ्यांनी खुर्ची आणि पदाचा गैरवापर करून गोरगरिबांना फसवले आणि त्यांच्या मेहनतीचे पैसे लाटले.
देशाला लागलेली ही भ्रष्टाचाराची किड आता लागलेली नाही. देशाच्या स्वातंत्र्यापासून हा भ्रष्टाचार सुरू आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू एकदा उद्विग्न होऊन म्हणाले होते की भ्रष्टाचाऱ्यांना सुळावर लटकवले पाहिजे. मात्र आजवर एकाही भ्रष्ट अधिकाऱ्याला सुळावर लटकवणे तर दूरच मात्र शिक्षा झाल्याचेही ऐकवात नाही. त्यामुळेच भ्रष्टाचार वाढत चालला आहे. दररोजचे वर्तमानपत्र वाचा त्यात तुम्हाला एक तरी भ्रष्टाचाराची किंवा लाचखोरीची बातमी वाचायला मिळेल. एका एका भ्रष्ट अधिकाऱ्याकडे कैक कोटींची अवैध मालमत्ता आढळत आहे. असा कोणताही विभाग नाही ज्यात भ्रष्टाचार होत नाही. महसूल आणि पोलीस विभाग भ्रष्टाचारात अव्वल असेल तरी सर्वच विभागात भ्रष्टाचार सर्रास चालू आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला देखील भ्रष्टाचाराने घेरले आहे. जो विभाग समाजाला नैतिकतेचे धडे देतो त्याच विभागात भ्रष्टाचारासारखे अनैतिक काम राजरोसपणे सुरू आहे.
देशातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, योग गुरू रामदेव बाबा यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते दिल्लीच्या जंतरमंतर वर उपोषणाला बसले होते. त्यांच्या आंदोलनाला जनतेतूनही मोठा पाठिंबा मिळाला होता. आता सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. देशभर भ्रष्टाचार विरुद्ध वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी देशातून भ्रष्टचार नष्ट होईल असे वाटले होते. त्या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. भाजप केंद्रात सत्तेवर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाऊंगा……. ना खाणे दुंगा….. असा इशारा भ्रष्टाचाऱ्यांना दिला. देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. देशातील लोकांना वाटले आता तरी भ्रष्टाचार कमी होईल मात्र तसे काही झाले नाही उलट भ्रष्टाचारात वाढच झाली. त्यातही गंमत म्हणजे ज्या भ्रष्टाचाऱ्यांना विरोध करून भाजप सत्तेत आली आज त्याच भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजप पावन करत आहे.
ट्रेस मेट्रिक्स २०२१ च्या अहवालात भारत लाचखोरीत इतर देशांच्या तुलनेत खूप पुढे आहे. याचाच अर्थ देशातील भ्रष्टाचार कमी झाला नाही.
आज कोणत्याही सरकारी कार्यालयात चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही. दररोजचे वर्तमान पत्र उघडले की एक तरी लाचखोरीची बातमी वाचायला मिळतेच. जनताही मजबूर आहे. याच मजबुरीचा फायदा घेऊन लाचखोर त्यांनाच जाळ्यात अडकवत आहे. लाच दिली नाही तर काम होत नाही असाच अनुभव देशातील बहुतांश जनतेला आला आहे. राजस्थानमधील ८० टक्के लोकांनी हे मान्य केले आहे की कोणतेही काम करण्यासाठी लाच द्यावीच लागते. महाराष्ट्रातील ५५ टक्के लोकांचे हेच म्हणणे आहे. याचाच अर्थ लाचखोरी सामान्य होत आहे. पूर्वी भ्रष्ट्राचाऱ्यांकडे द्वेष भावनेने पाहिले जाते होते. आता मात्र त्यांच्या संपत्तीवरून त्यांचा सन्मान होत आहे. आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनला आहे.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here