कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड (दि.9ऑगस्ट):- येथील वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मध्ये नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त केंद्र शासनाच्या ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत सामूहिक ‘पंचप्रण शपथ’ ग्रहण कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. जे. एस. ओहोळ यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा इतिहास सर्व विद्यार्थ्यांसमोर उभा केला. ते म्हणाले की, महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलन सुरु केल्यानंतर देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात ‘करो या मरो’चे आवाहन केले. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती.
भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला ‘ऑगस्ट चळवळ’ किंवा ‘ऑगस्ट क्रांती’ असेही म्हणतात. ९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘९ ऑगस्ट’ हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.
यावेळी केंद्र शासनाच्या ‘ माझी माती, माझा देश’ या अभियाना अंतर्गत सकाळी ठीक दहा वाजता सामूहिक पंचप्रण शपथ घेण्यात आली. एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. पी. जाधव यांनी कार्यक्रमाचा हेतू कथन करून प्रास्ताविक सादर केले. तर प्रा. संतोष बोंगाळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.




