महादेव जानकरांचा विश्वास : आ.डॉ.गुट्टेंनी केले उत्साही स्वागत
अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.5ऑगस्ट):-राजकारणात समज गैरसमज वाढलेत. त्यामुळे अफवा कानावर येत असतात. मात्र, कितीही अफवा आल्या तरी मी हलक्या कानाचा नाही. मला राष्ट्रीय राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे गंगाखेड विधानसभेचा केवळ उमेदवार नव्हे तर आगामी आमदार सुध्दा डॉ.रत्नाकर गुट्टे हेचं असतील, अशी विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आ.महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज यात्रेचे गंगाखेड येथे आगमन झाले. त्या निमित्ताने आ.डॉ.गुट्टे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
मधल्या काळात मी राज्याच्या बाहेर होतो. त्यामुळे आमच्या भेटीगाठी कमी झाल्या हि वस्तुस्थिती आहे. मात्र, आमच्यात कोणताही दुरावा नव्हता. फोनवरून आम्ही संपर्कात होतो. तरीही लोकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते. ते या निमित्ताने दूर झाले याचा आनंद आहे. कुणी काहाही म्हटलं तरी डॉ.रत्नाकर गुट्टे नावाचा हा माणूस मला सोडून कधीच जावू शकत नाही, हा विश्वास नव्हे तर खात्री सुध्दा मला आहे. त्यांच्या सारखा माणूस आपल्या सोबत आहे. त्यांच्यामुळे आपल्या पक्षाचे अस्तित्व राहिले आहे. त्यामुळे कितीही वावटळे आली तरी त्याला सामोरे जावू पण एक दिवस त्यांना मंत्री केल्याशिवाय राहणार नाही, असाही निर्धार महादेव जानकर यांनी पुढे बोलताना केला आहे.
याप्रसंगी बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, मला कोणताही राजकीय वारसा नाही. तरीही अतिशय अडचणीच्या काळात महादेव जानकर माझ्या पाठीशी उभे राहिले. मंत्री पदाची प्रतिष्ठा विसरून रात्री-अपरात्री माझ्यासाठी प्रचार करीत होते. त्यामुळे त्यांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही. मी आजपर्यंतच्या सर्व निवडणुका रासपच्या कपबशी या चिन्हावरच लढविल्या आहेत आणि आगामी काळात सुध्दा रासप म्हणूनचं निवडणुका लढविणार आहे. रासप आणि मित्र मंडळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते काही वेगळे नाही. पुढे आपल्याला लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रासपचा झेंडा फडकावयाचा आहे. हेचं ध्येय ठरवून मी पुढे जात आहे.
तत्पूर्वी, जनस्वराज यात्रेचे गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रात आ.डॉ.गुट्टे यांनी जल्लोषात स्वागत केले. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष आ.महादेव जानकर यांच्या गाडीत बसून पुढील प्रवास केला. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर मनमोकळा संवाद झाला. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दोघे एकाच गाडीने जनसंपर्क कार्यालयात पोहोचले.
दरम्यान, दोन्ही नेत्यांची झालेली दिलखुलास भेट, सत्कार कार्यक्रम आणि एकमेकांची स्तुती यामुळे गुट्टे-जानकर यांच्यात सारं काही आलबेल असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात रासप आणि मित्रमंडळ यांची एकी जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित करते का? हे पाहाणे उत्सुकतेचे ठरेल.
यावेळी रासपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अक्की सागर, प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, सचिव सुशिलकुमार, महासचिव माऊली सलगर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू बोरे, आश्रुबा कोळेकर, बीड जिल्हा संपर्क प्रमुख महेश चौरे, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब मतकर, अहमदनगरच्या जिल्हा अध्यक्ष जराड मॅडम, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील, दत्ता मामा सुरनर, डॉ.शिवाजी शेंडगे, अजित पाटील, राजेभाऊ फड, युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे, मित्र मंडळाचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, प्रभारी माधवराव गायकवाड, हनुमंत मुंढे, तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते, गणेश कदम, जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर, कृउबा सभापती गजानन रोकडे, गंगाखेड उपसभापती संभाजीराव पोले यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, कृउबा संचालक, सरपंच, पत्रकार बांधव यांच्यासह रासप व मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘ *आमचे’ म्हणजे युतीचे
‘रत्नाकर गुट्टे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, ते आमचे पुढील उमेदवार असतील’ असं परवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावर पत्रकारांनी ‘भाजपचे का?’ असे विचारले, तेव्हा ते आमचे म्हणालेत. पण, पत्रकारांनी तिखट मसाला लावून बातम्या केल्या. त्यानंतर माझे जानकर साहेबांशी सविस्तर बोलणे झाले होते. ‘आमचे’ म्हणजे युतीचे अर्थात मित्र पक्षाचे असे बावनकुळे साहेबांना म्हणायचे होते, अशीही स्पष्टोक्ती आ.डॉ.गुट्टे यांनी दिली.
त्यात माझाही ‘स्वार्थ’ होता…
गुट्टे साहेब मी तुमचा प्रचार केला. निवडणुकीत मेहनत घेतली. पण, त्यात माझाही स्वार्थ होता. कारण, मला माझ्या पक्षाचे विधिमंडळात अस्तित्व राखायचे होते. त्यामुळे वरच्या सभागृहात मी आणि खालच्या सभागृहात तुम्ही असं आपलं छान चालंलं आहे. आपल्याला मंत्रालयाच्या नवव्या मजल्यावर अलिशान कार्यालय मिळालं आहे, यापेक्षा दुसरा आनंद काय. पण, भविष्यात आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे. पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.
…तर ‘त्यांचा’ राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश करा
याप्रसंगी बोलताना आ.महादेव जानकर यांनी युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे आणि सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ फड यांच्यावर बरीच स्तुतीसुमने उधळली. तसेच पुढे जाण्यासाठी आपल्याला युवाशक्ती महत्त्वाची आहे, असे सांगत ‘त्या’ दोघांचाही राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश करा, असे आवर्जून सांगितले.




