प्रा.डॉ.सौ.उज्ज्वलाताई सुरेशराव मेहरे यांना कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे ” कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार -2023 ” हा पुरस्कार दि.23 जुलै 2023 ला मान्यवरांच्या उपस्थितीत अमरावती येथे प्रदान करण्यात आहे.त्यानिमित्त डॉ.उज्ज्वलाताई सुरेशराव मेहरे ( माळोदे )यांच्या समाजसेवी व्यक्तिमत्त्वाविषयी,त्यांच्या विविध कार्याविषयी परिचय देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
प्रा. डॉ.सौ.उज्ज्वला सुरेशराव मेहरे यांचा जन्म दि . 23 जुलै 1959 ला अमरावती येथे झाला.
” गुलाबराव पिता ।
सुमनबाई माता ।
सुसंस्कार दाता ।
लाभले मातापिता ॥ “
आई-वडिलांच्या अशा सुसंस्कारातून त्या घडत गेल्या.आज त्या वयाच्या 65 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.त्यांनी M. Sc., B.Ed. झाल्यानंतर शिवाजी सायन्स कॉलेज,विद्याभारती कॉलेज,अमरावती येथे दोन वर्षे नोकरी करून 1986 ला त्या जगदंब महाविद्यालय,अचलपूर येथे वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू झाल्या. नोकरीमध्ये असतानाच 1989 साली M.Phil., 2000 मध्ये M.Sc. तर 2009 मध्ये Ph.D. असे उच्च शिक्षण घेतले.
जगदंब महाविद्यालयात उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा लौकिक होता.
सर्व विद्यार्थ्यांना ।
समान वर्तन ।
विद्यार्थ्यांचे मन ।
आनंदित ॥
म्हणूनच डॉ.उज्ज्वलाताई विद्यार्थीप्रिय होत्या. त्या कार्यसेवेत असताना प्रत्येक गोष्ट अतिशय मनापासून करीत. महाविद्यालयातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे.त्यांनी विद्यापीठाचे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली सर्व कार्ये अतिशय चोखपणे करीत असत.महाविद्यालयात विविध समित्यांची समन्वयक असल्याने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक कार्यशाळा,विज्ञान प्रदर्शनी, रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर,शैक्षणिक सहली, वृक्षारोपण,विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप इत्यादी शैक्षणिक कार्य त्यांनी यशस्वीपणे केले.
वनस्पतीशास्त्र विभागात Tissue Culture प्रयोगशाळा तयार केली.विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजूर केलेले मेजर रिसर्च प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला.
प्रमुख वनसंरक्षक महाराष्ट्र यांनी त्यांची दि.29 -10 – 2002 ला Medicinal Plant Honourary Adviser ( MPHA) या पदावर नियुक्ती केली.त्यानंतर पश्चिम मेळघाट वनउत्पादनाचे मूल्यांकन सुद्धा 23 ते 25 जानेवारी 20O6 ला केले. डॉ.उज्वलाताईंनी 63 परिषदांमध्ये सहभाग घेतला तर त्यांचे 31 शोधनिबंध प्रकाशित झाले.त्यांची बी.एससी.च्या विद्यार्थ्यांसाठी तीन पुस्तके प्रकाशित झाली तसेच विज्ञान प्रगती व Science Reporter यातून आर्टिकल प्रसिद्ध झाले.हे सर्व करीत असताना त्यांचे ” युवा मंच “या दैनिकातून विविध औषधी वनस्पतींवर लेख प्रकाशित झाले.विवेकी समृद्धी सुबोधिनी अमरावती तर्फे हितगुज तरुणीं शी या प्रकल्पातर्फे महिला सक्षमीकरण व लैंगिक अत्याचार यावर विविध कॉलेज आणि
वसतीगृहांमध्ये विद्यार्थिनींचे प्रबोधन केले.
सन्मान महिला प्रतिष्ठान अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केल्या जातात त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता.गेल्या वीस वर्षापासून ऋणानुबंध परिचय मेळाव्याच्या आयोजन व नियोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे .
“कोणतेही असो ।
क्षेत्र कर्तव्याचे ।
ठसे महिलांचे ।
उमटले ॥ “
डॉ.उज्वलाताईच्या कर्तव्याचे ठसे जुलै 2019 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या कर्तव्याचे ठसे समाजमनावर उमटत राहिले.त्यांचे आजही समाज प्रबोधन व समाज जागरणाचे कार्य सतत सुरू आहे.माळी महासंघ महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष असल्यामुळे विविध तालुकास्तरावर महिला आघाडी स्थापन करून संघटन करण्याचे व मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहेत.समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड आयोजित महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून त्यांनी सत्यशोधकीय व परिवर्तनवादी विचार रुजवण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केलेले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुले शाहू-आंबेडकर जयंती पर्वच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत त्यांनी विचार व्यक्त केलेले आहेत.
सन्मान महिला प्रतिष्ठान अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केल्या जातात त्यामध्ये ही त्यांचा सहभाग राहिलेला आहे.गेल्या वीस वर्षापासून ऋणानुबंध परिचय मेळावा आयोजन व नियोजन त्यांचा सक्रिय सहभाग आहे.सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड अध्यक्ष असलेल्या “उपेक्षित समाज महासंघ ” या संघटनेच्या मार्फत घरेलू महिला कामगारांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.महासंघाच्या विविध सामाजिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग त्यांनी घेतलेला आहे.त्यांच्या विविध कार्यक्रमात उत्कृष्ट – बहारदार सूत्रसंचालनही अनेक वेळा त्यांनी केलेले आहे.
डॉ.उज्वलाताई मेहरे यांनी दैनिक हिंदुस्थान,दैनिक मातृभूमी, जनमाध्यम, दैनिक अमरावती इव्हिनिंग इत्यादी अनेक वृत्तपत्रातून सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर माहितीपूर्ण प्रसिद्ध झालेल्या लेखातून शैक्षणिक प्रबोधन केलेले आहे.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले य यांचे सामाजिक कार्य,समाज क्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले,स्त्रीमुक्ती आंदोलन, सत्यशोधक समाज,शेतकऱ्यांचा आसूड,अनाथांची माय सिंधुताई सपकाळ,पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर अशा अनेक विषयावर त्यांनी वृत्तपत्रातून लेखन केले आहे .
डॉ.उज्वलाताईंनी केलेल्या कार्याची दखल अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आहेत. M .Sc.वनस्पतीशास्त्र अमरावती विभागातून प्रथम आल्याबद्दल डॉ.मिराशी पुरस्कार,नॅशनल सेमिनारमध्ये पोस्टर प्रेझेंटेशनला प्रथम पुरस्कार,ग्लोबल सोसायटी दिल्ली द्वारे भारत शिक्षा रतन पुरस्कार,उपेक्षित समाज महासंघाचा दि.23 जुलै 2021 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.
आणि डॉ.उज्वलाताई मेहरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे राज्यस्तरीय कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले समाजसेवा गौरव पुरस्काराने आज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित होत आहे. हा पुरस्कार प्राप्त होत असल्याबद्दल प्रा.डॉ. सौ.उज्वलाताई सुरेशराव मेहरे (माळोदे ) यांना हार्दिक शुभेच्छा आणि पुढील उदंड आयुष्यासाठी आणि सामाजिक, शैक्षणिक,साहित्यिक कार्यासाठी मनस्वी सदिच्छा ॥
गुरु रविदास राष्ट्रीय समाजसेवा
गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर,अमरावती,भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९




