भारतामध्ये भारतीय स्त्रियांना भारतीय व्यवस्थेने माणूस म्हणून सुद्धा मान्यता दिलेली नव्हती. स्त्रीला फक्त दुय्यमच लेखले गेले नाही तर तिला दासी म्हणून गुलाम बनवून ठेवण्यात आले. स्त्रीला शिक्षण, राज्यकारभार स्वातंत्र्य या गोष्टी तर सोडा परंतु घरामध्ये सुद्धा बोलण्याचा, माणसांसारखा वावरण्याचा, एवढेच काय हसण्याबागडण्याचा, सुद्धा अधिकार नव्हता. पशुतुल्य जीवनमान महिलांचे होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर महिलांचे अस्तित्व निर्माण होऊन महिलांना शिक्षण, आरक्षण, संरक्षण, हक्क अधिकार आणि स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. संविधान लागू होण्यापूर्वी महिलांचा इतिहास बघितला तर मानवतेला काळीमा फासणारा इतिहास होता. महिलेला मानव म्हणून जगण्याचा अधिकार येथील व्यवस्थेने नाकारलेला होता. ज्या व्यवस्थेने महिलेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला त्याच महिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यकर्ती महिला बनण्याचा अधिकार बहाल केला. सर्वात अगोदर बाबासाहेबांनी एकाच जातीसाठी किंवा धर्मासाठी काम केले असे म्हणणे म्हणजेच बाबासाहेबांना व त्यांच्या कार्यांना बेईमान होणे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अखिल मानव समाजाचा विकास होऊन सामाजिक समता, बंधुता, न्याय व स्वातंत्र्य यासाठी होते. अनेक धर्मग्रंथांनी महिलांवर अनेक बंधने तर घातलीच होती परंतु महिलांना कोणतेही अस्तित्व दिले तर नाहीच उलट त्यांच्या भावनेचा त्यांच्या मनाचा थोडाही विचार न करता महिलांची विक्री होत असे, एक पुरुष अनेक महिलांसोबत लग्न करू शकत असे, अशा पद्धतीने महिलांचे जीवन हे नरक झालेले होते. महिला ही कुशाग्र बुद्धीची व कर्तबगार असूनही महिलांना समाजातील घडामोडींबद्दल तर सोडा, परंतु घरातील बाबींवर सुद्धा बोलण्याचा अधिकार नव्हता. घरातील पुरुषांसमोर उभे राहण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. एवढेच काय तर महिलेला घरामध्ये पुरुषांसोबत जेवण्याचाही अधिकार नव्हता, महिलेने पुरुषांच्या अगोदर जेवणे हे तर पाप समजले जायचे. अशा वागणुकी महिलांना घरामध्ये मिळत होत्या, तर समाजामध्ये महिलांचे काय स्थान असेल? याची कल्पनाही न केलेली बरी महिलांना पाय असून चौकट ओलांडता येत नव्हती. महिलांकडे कौशल्य असून ते कौशल्य दाखवता येत नव्हते, महिलांकडे काम करण्याची कुवत असून माना सन्मानाचे काम करता येत नव्हते. शिक्षण, स्वातंत्र्य, हक्क, अधिकार ह्या गोष्टी तर खूप दूर होत्या. पुरुषांची दासी बनवून पुरुषांची सेवा करणे चुल आणि मुल सांभाळून घरातच राहणे हेच महिलांचे कार्य होते. वडीला कडील किंवा पतीकडील कोणत्याही संपत्तीमध्ये महिलांचा अधिकार नव्हता. पती गेल्यानंतर महिलेला पुनर्विवाह करता येत नव्हता. मूलबाळ झाले नाही तर मूलबाळ दत्तक घेता येतो नव्हते. अनेक समस्यांनी महिलाग्रस्त होत्या. पुरुषांच्या समोर बोलणे समाजामध्ये वावरणे ह्या गोष्टी तर महिलांना कल्पनाशक्तीच्या पलीकडे होत्या. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज महिलेला अस्तित्व तर निर्माण झालेच परंतु समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, शिक्षण, आरक्षण, संरक्षण या सर्व गोष्टी मिळून महिला सक्षम झालेली आहे. धर्मग्रंथांनी महिलांचे शिक्षण नाकारले. महिलांचे हक्क अधिकार नाकारले, महिलांना शिक्षण देणे महिलांना हक्क अधिकार देणे महिलांना पुरुषां प्रमाणे वागणूक देणे हे धर्मविरोधी होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला सुद्धा मानव आहे आणि तिला सुद्धा हक्क अधिकाराची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, म्हणून आपले आयुष्य खर्ची घातले व ते मिळवून दिले. हिंदू कोड बिल आम्हाला फक्त महिलांना सर्वांगीण विकासासाठी धर्माच्या संहितेमध्ये बदल व्हावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक सुधारणा सुचविल्या. परंतु महिलांना कोणतेही हक्क अधिकार देण्याच्या मनस्थितीत नसलेल्या लोकांनी हिंदू कोड दिलेला विरोध केला. महिलांच्या न्याय हक्क स्वातंत्र्याची बिल पास होत नाही, महिलांना माणुस म्हणून वागणूक मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कोणत्याही महिलांनी कोणतेही मागणी न करता महिलांना हक्क अधिकार स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी विरोध होतोय म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर जगातील एकमेव नेते होत. आज महिला नट्टापट्टा करून बाहेर फिरतात हे बाबासाहेबांमुळेच, आज अनेक प्रकारचे वेगवेगळे कपडे परिधान करून सार्वजनिक ठिकाणी महिलांचा वावर आहे हे फक्त बाबासाहेबांमुळेच, आज महिला शिक्षण घेते आणि हक्क अधिकाराच्या गोष्टी करते, मला ही स्वातंत्र्य आहे आणि ते मिळायलाच पाहिजेत, म्हणून महिला आवाज उठवते ही देन फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. ज्या महिलेला घरात बोलता येत नव्हतं ती महिला आज देशाच्या संसदेमध्ये बोलते, ज्या महिलेला घराबाहेर पडता येत नव्हते ती महिला आज विदेशात जाऊन शिक्षण घेते, नोकरी करते, एवढेच नव्हे तर पुरुषांप्रमाणे पगार सुद्धा घेते. पुरुषांप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये नोकरी सुद्धा करते, आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकाच जातीचे उद्धारक म्हणने म्हणजे आजही आपण गुलाम आहोत याची जाणीव करून देणे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेऊन आपला इतिहास तपासणे आवश्यक आहे जेव्हा आपण बाबासाहेबांना समजून घेऊ बाबासाहेबांना वाचू त्यावेळेस आम्हाला खरे बाबासाहेब कळतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय महिलांना मताचा अधिकार व समान वेतन जगामध्ये पहिल्यांदा दिलेले आहे, याची जाणीवच नाही. मताचा अधिकार व समान वेतन मिळण्यासाठी जगामध्ये अनेक महिलांना रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागली. परंतु बाबासाहेबांनी ती आपल्याला फुकट दिली महिलांना समान कामासाठी समान वेतन, कामाच्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था, कामाच्या ठिकाणाहून प्रसूतीसाठी सहा महिन्याचे पगारी रजा, ही देईल जगामध्ये न मागता कुणाला जर मिळाली असेल तर ते आहेत भारतीय महिला. एवढी मोठी देन बाबासाहेबांनी न मागता दिली. संपत्ती मध्ये अधिकार दिला, चालण्याचा ,बोलण्याचा नोकरी करण्याचा, घराबाहेर पडण्याचा शिक्षणाचा, अधिकारच दिला नाही तर त्याचे संरक्षण सुद्धा केले. एवढी मोठी देन बाबासाहेबांनी दिली म्हणून महिलांचे अस्तित्व निर्माण झाले. हे विसरून चालणार नाही. महिलांचा आवाज महिलांचा आधार, महिलांचे संरक्षण, महिलांचे आरक्षण, सर्व काही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मग्रंथानुसार महिलांकडे बघितले असते तर आजही महिला दासी म्हणूनच राहिल्या असत्या. आजही अनेक ठिकाणी महिलांना अनेक बंधने आहेत, परंतु ते बंधने तोडायचे असतील तर संविधानिक मार्गाने त्या महिलांना न्याय मिळू शकतो हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच.बाबासाहेब आंबेडकर वाचून समजून डोक्यात घेणे आवश्यक आहे. महिलांविषयी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बघितले तर महिलांचे एकमेव सर्वश्रेष्ठ उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत याची जाणीव होईल. महिला हि विश्वाची जननी आहे परंतु भारतीय महिलांना चे अस्तीत्व, स्वाभिमान, मानपान निर्माण करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेव. महीलेला घटस्फोट घेण्याचासुद्धा अधिकार नव्हता तो मिळाला केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या च मुळे. महिलांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एवढे उपकार आहेत की महिला कधीच ते उपकार फेडू शकत नाहीत. महिलांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकारक फेडण्याचा प्रयत्न मुळीच करू नये. परंतु ते उपकार विसरूही नव्हे हिच एक अपेक्षा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या समस्त भारतीयांना मंगलमय शुभेच्छा.
रोशनी भाऊराव देबाजे
roshanidebaje@gmail.com
औरंगाबाद




