अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.19फेब्रुवारी):-श्रध्दा आणि अंधश्रध्दा यांच्यातील विवेक म्हणजे अध्यात्म आहे. आध्यात्मिक क्षेत्रात सुध्दा विज्ञानाच्या कसोट्या वापरल्या जातात. मात्र, अध्यात्माच्या नावावर केले जाणारे चमत्कार, कल्पना किंवा जादूटोणा खऱ्या आध्यात्मिक लोकांना आवडत नाही. कारण, त्यांनाही वैज्ञानिक दृष्टी महत्वाची वाटते. त्यामुळे अध्यात्म व विज्ञान एकमेकांना पूरक आहेत. म्हणून चिंतनशील व चिकित्सक वृत्तीने अध्यात्माकडे बघा, असा मौलिक सल्ला गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिला.
महाशिवरात्री निमित्त तालुक्यातील इसाद येथील श्री.विश्वेश्वर मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिध्द हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर, माजी जि.प.सदस्य किशनराव भोसले, माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते, देवस्थान समितीचे अध्यक्ष रखमाजी पाटील, अशोकराव भोसले होते.
अध्यात्मात सदगुणाची पेरणी असते. त्यामुळे समाजाला समतेची आणि एकतेची फळे येतात. आजपर्यत सर्व संतानी सामाजिक प्रबोधनाची चळवळ व्यापक केली होती. म्हणून समाजात बधुंता व प्रेम हि मूल्ये खोलवर रूजली आहेत. समाज प्रबोधन करताना संतानी नेहमी सकारात्मक विचार सांगितला आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पध्दतीने भक्ती चळवळ उभी राहिली. म्हणून वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जाणारा कोणताही वारकरी सामजिक एकतेचा संदेश देत असतो. कारण, त्याच्या जगण्याचा व वागण्याचा पाया अध्यात्म असतो, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले आहे.
परंपरेने साजरा होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाच्या अखंड हरिनाम सप्ताहची सांगता प्रसिध्द हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या अभ्यासू व दृष्टांतपूर्ण कीर्तनाने झाली. याप्रसंगी महाराष्ट्रातील संत परंपरा, आजची स्थिती, आध्यात्मिक आव्हाने व भविष्य अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करून हभप.दस्तापुरकर यांनी रसाळपूर्ण कीर्तन केले. यावेळी पंचक्रोशीतले भाविक-भक्तांसह विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती.




