🔹२ व ३ एप्रिल ला जळगाव येथे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन होणार – प्रा.भरत शिरसाठ
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.11मार्च):– येथील व्यवस्थेने सातत्याने बुद्धाला इन्स्टिट्यूशनॅलाईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन व तीन एप्रिल रोजी जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून भारतातील मानव मुक्तीचा उद्गाता असा सर्वव्यापी बुद्ध समाजासमोर आणून बहुजनांच्या क्रांतीला दिशा देण्याचा प्रयत्न या साहित्य संमेलनातून केला जाणार असल्याचे प्रतिपादन जी.एस.नगर, धरणगाव येथील मिटींग मध्ये या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी केले. प्रा.भरत शिरसाठ यांनी साहित्य संमेलनाचा इतिहास उलगडून सांगितला आणि जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित केलेल्या संमेलनात साहित्य प्रेमींनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
सभेचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक कैलास पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ संजिवकुमार सोनवणे होते. सभेच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. सत्यशोधक डी.एम.मोतीराळे सर यांनी बुद्धाच्या समता आणि विवेकवादावर आधारित विचार सरणी प्रमाणे समाज व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रा बी एन चौधरी ( कवी व व्यंगचित्रकार ) यांनी साहित्य संमेलनाचे महत्त्व सांगितले. डॉ. सोनवणे यांनी समाजाची दशा व दिशा यावर मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त संख्येने बौद्ध साहित्य संमेलनाला धरणगांवकरांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन केले.
कार्यक्रम आयोजनात दिपक वाघमारे, राजेंद्र बागुल,गोवर्धन सोनवणे, दिक्षाताई गायकवाड, महादू अहिरे, पी डी पाटील, लक्ष्मणराव पाटील,राजेंद्र गायकवाड, विजय गाढे, सुवालाल मोरे, शांताराम मोरे, शिरसाट गुरुजी, प्रा. सपकाळ सर, सविता गाढे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास पवार सर यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर मोरे सर यांनी मानले.
