




🔹ऍड.बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांना १० मे वाढदिवसाच्या निमित्ताने खुले जाहीर पत्र
🔸आदरणीय ऍड.बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर,
सविनय जयभिम!
आज क्रांतीकारी आंबेडकरी विचारांच्या चळवळीचे खरे रक्ताचे वारसदार आहेत.आणि आपण खऱ्या अर्थाने वैचारिक चळवळीचे वारसदार सुद्धा आहात. राजकीय वारसदार होण्यासाठी प्रचंड अभ्यास आणि संघर्ष करून नवं नवीन राजकीय पर्याय देऊन यशस्वी वाटचाल करीत आहात. तुम्ही जिथून सुरुवात केली होती. ती परिस्थिती आज ही जशीच्या तशीच आहे. सम्यक समाज आंदोलन या सामाजिक जनआंदोलनातून आपण सुरवात केली होती.त्या जनआंदोलनाचे आपण नेते होता.पण त्यात मोठे योगदान देणारे अनेक नेते होते.यांच्यामुळेच मुंबईसह राज्यात गांव तिथे बौध्द महासभेची शाखा, गांवागांवात जाऊन जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता. त्यातून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार झाले.खूप मोठी जनजागृती झाली होती.असे लिहले तर चुकीचे होणार नाही. त्यामुळेच राजकीय समीकरण बदलली होती. तो बदल समाजवादी, डाव्यांनी उचलून धरल्यामुळे सतत प्रसिद्धी मिळत होती. तेच हवा निर्माण करीत होते.हे सर्वच मान्य करतात.तो बदल काही अर्थाने पूर्ण झाला असे म्हणता येत नाही.आणि अपूर्ण राहिला असे ही म्हणता येत नाही.मागासवर्गीय समाजातील लोक बहुजन म्हणूनच जवळ आले.विशेष बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील बौद्ध समाजावर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार करणारे कोण आहेत हे पाहिल्यावर,आपले एकूण संघटन,बौद्ध महासभा,भारिप बहुजन महासंघ आणि डाव्या चळवळीशी असलेला घरोबा कुठे तरी कमी पडला म्हणूनच वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली.त्याचे सत्यशोधक पद्धतीने आत्मपरीक्षण करून त्यातील काही प्रश्न आपल्या वाढदिवसा निमित्य आपल्या भक्त आणि शिष्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न करतो. कारण आंबेडकरी चळवळीत अनेक बुद्धिवादी विचारवंत लेखक, पत्रकार, साहित्यिक आहेत. पण त्याच्या मध्ये एका गोष्टीचा अभाव आहे. तो म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात नाही.सत्य मांडल्यावर समाज काय म्हणेल? कोण कोण नाराज होतील. कोण कोण हात पाय तोडन्याची भाषा करेल यांची त्यांना भिती वाटते. म्हणून ते सत्याला सत्य म्हण्यास लिहण्यास घाबरतात. हे आपणच (विचारवंतां कडून अपेक्षा -आंबेडकर चळवळ संपली आहे.पण नंबर ३६ ) म्हटले आहे.
त्यामुळे हा नियम मला लागू नाही.कारण मी प्राध्यापक, वकील, इंजिनियर, साहित्यिक,विचारवंत नाही. एक असंघटीत कामगार व कार्यकर्ता आहे. आणि अब्राम्हणी सत्यशोधक मासिकातून लिहता लिहता वृत्तपत्रात लिहायला लागलो.क्रांतिकारी विचारांच्या चळवळीची दिशा व दशा यावर सत्य शोधक नजरेतुन चिंतन आणि परीक्षण करून लिहायला लागलो.ती लिहन्याची प्रेरणा कॉम्रेड शरद पाटील व जिवलग मित्र विजय सातपुते यांच्यामुळेच मिळाली.
जो आपला व आपल्या समाजाचा, विचारधारा मानणारा आहे. त्यांची योग्य वेळी दखल घेऊन चळवळीच्या दृष्टिकोनातून मूल्यमापन झाले पाहिजे, चुकीच्या धोरणावर केवळ टीका न करता त्यात कशी सुधारणा झाली पाहिजे याबाबत योग्य वेळी वैचारिक चर्चा, संवाद घडवून आणला पाहिजे. मैत्री भावना वाढली पाहिजे. म्हणूनच वाढदिवस हा प्रत्येकाचा होत असतो. काही नेत्यांचा वाढदिवस समाजासाठी, पक्षासाठी, चळवळीसाठी वेगळा असतो. त्याला वेगवेगळे नांव दिल्या जाते.आणि अपेक्षा केल्या जातात. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर हे क्रांतिकारी आंबेडकरी विचारधारेच्या राजकीय चळवळीचे वारसदार आहेत.बहुजन समाजाला त्यांच्या कडून खूप अपेक्षा आहेत.म्हणूनच हे खुले जाहीर पत्र लिहतो.
आपली सुरवात ही भूमिहीन शेत मजुरांचे प्रश्न सोडविण्या करिता झाली.त्यांना आपण गायरान, पडीत,वनविभागाच्या जमीन ताब्यात घेऊन कसायला लावून शेतमजुरांचे अल्पभूधारक शेतकरी केले. त्याच्या त्या कसलेल्या जमिनी नांवावर करण्यासाठी “भूमिहीन हक्क संरक्षण समिती स्थापन” केली होती. त्यामुळे बाबासाहेबाच्या लढ्यातील एका सेनापतीच्या अर्धवट राहिलेल्या लढ्याला आपण एक वेगळी दिशा देण्याचे काम हाती घेतले होते. “कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय?.” या घोषणेने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश ढवळून निघाला होता. तोच धागा पकडून आपण राजकारण नको समाजकारण हवे त्याच्या समाज परिवर्तनातून राजकारण करू असाही आपला संकल्प होता.त्यामुळे राज्यातील नव्हे तर देशातील मागासवर्गीय, शोषित, पिडीत, आदिवासी समाज तुम्हाला अंधार नष्ट करणारा नवा सूर्य प्रकाश म्हणत होती.सूर्याची किरण वरून खाली येतात.इथे प्रकाश खालून वर गेला. आणि बरेच काही विसरला. असे भूमि कसणारे हक्कदार म्हणतात. काही लढता लढता मेले. त्या आंदोलनातील लोक काल पण आपल्या सोबत होते आणि आज ही त्यांची मुल,नातू तुमच्या सोबत असतील ते केवळ बाबासाहेबांचे नातु म्हणून.
पण कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहक्क समितीचे पुढे काय झाले?मराठवाडा, विदर्भातील पडीत, गायरान, वनविभाग शेत जमीनी नांवावर झाल्या काय?आपली राजकीय शक्ती वाढली असली तरी बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील बहुसंख्येने शेतजमिनी नांवावर आज ही झाल्या नाही त्यांचे दावे अपात्र ठरविण्यात आले.अनेक गांवात वन हक्क समितीचे गठन होत नाही. त्यामुळेच नाहरकत पत्र, ठरावाचे पत्र ग्रामसभा देत नाही. त्याबाबत आता आपली आपल्या पक्षाची कोणतीच ठोस भूमिका का नाही.एससी, एस टीच्या शे पाचशेच्या मतदानाच्या साठी पाच दहा हजार मतदान असलेल्या बहुजन समाजातील लोकांनां आपणास नाराज करायचे नाही हेच राजकारण त्यामागे आहे की नाही?.म्हणूनच प्रदिप भाई अंभोरे, जगदीश इंगळे, नरसिंग गायकवाड, कडूदास कांबळे यांना भूमी मुक्ती मोर्च्या, बहुजन मुक्ती मोर्च्या सारख्या अनेक संघटनानां हे भूमिहीन, शेतकऱ्यांचे जन आंदोलन करावे लागत आहे.त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपाच्या वरचणी खाली उभे राहावे लागते.
१९८२/८४ पासुन शेतजमीन कसणाऱ्या भूमिहीन शेतकाऱ्यांच्या जमिनीची नोंद सातबाऱ्यावर होत नाही.गांवातील बौद्धांचे सामाजिक,आर्थिक आणि राजकीय जागरूकता बहुजनास सहन होत नाही. म्हणून अन्याय,अत्याचार व लक्षवेधी हत्याकांड होत आहेत. म्हणजेच आपण जिथून सुरुवात केली होती.ते समस्या आज ही कायमस्वरूपी अस्तित्वात आहे. यांचा आपणास राजकीय सोयी साठी सोयीस्कर विसर करावा लागत असेल तर सामाजिक आंदोलन राजकिय दृष्ट्या यशस्वी कसे होईल असा माझा प्रश्न आहे.तो तुमच्या भक्तांना कार्यकर्त्यांना चुकीचा वाटत असे.तर त्यांनी आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील असंघटित कष्टकरी शेतमजूर,भूमिहीन लोकांचा सर्वे करावा.असंघटित कामगार मजूर म्हणून त्यांची अधिकृतपणे नांव नोंदणी होत नसल्यामुळे त्यांना राज्य व केंद्राच्या अनेक कल्याणकारी विकासाच्या योजना पासून वंचित राहावे लागते.हे वंचितच्या कार्यकर्त्याना नेत्यांना माहिती सुद्धा नाही. इतर पक्ष त्यांचा गैरवापर करून लाभ घेत आहेत.(कोरोनाच्या काळात नोंदणीकृत असंघटित कामगारांना मिळालेला आर्थिक लाभार्थी कोण आहे यांची जाहीर चौकशी झाली तर अनेक प्रकरणे बाहेर येतील) गोरगरीबांना सरकारने आर्थिकदृष्टय़ा मदत करावी ही आपलीच मागणी होती.तीच विरोधीपक्ष नेते फडणवीस व सुधीर भाऊ नी उचलून धरल्यामुळे नोंदणीकृत असंघटित कामगारांना पाच हजार रुपये आर्थिक लाभ मिळाला.
आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे राष्टीय अध्यक्ष झाल्यावर ” माझा पक्ष,माझी सत्ता” घोषणा दिली.आणि मी आंबेडकरी चळवळीतील राजकीय निळ्या आकाशातील चमकणारे तारे आहोत.हे दाखवून दिले.ज्या डॉ बाबासाहेबाच्या रक्ताचे आपण वारसदार आहेत.त्या बाबासाहेबानी आपले आयुष्य अस्पुष्य समाजाला धार्मिक,सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी खर्ची केले.त्यासाठी त्यांनी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्था,संघटना,पक्ष निर्माण केल्या. त्याची सुरवात त्यांनी “बहिष्कृत हितकारणी सभा” स्थापन करून केली.पुढे त्याचा विस्तार करत “समाज समता संघ” उभा केला.राजकीय क्षेत्रात आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला. भारतदेश हा कृषी प्रधान आहे सतर टक्के लोक शेतीवर मजुरी करून जगतात.त्यातील ८५ टक्के समाज हा बहुजन समाजातील आहे.म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त भटक्या जाती, इतर मागासवर्गीय,आदिवाशी समाजातील लोक आहेत.
हे सर्व भारिप बहुजन महासंघाचे अधिकृत सभासद असणारच. त्याच्या साठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून राजकीय हक्क्चे व्यासपीठ निर्माण केले होते. तो पक्ष ते विचार आज कोणाकडेच जिवंत नाही.देशातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन काढून त्या स्वतंत्र मजदूर युनियन Independent Labour Union (ILU). संलग्न कराव्यात आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियन निर्माण करून सरकारवर कायमस्वरूपी दबाव ठेवावा हेच मागासवर्गीय समाजाचे कामगारांचे मुख्य उद्धिष्ट असले पाहिजे होते. हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या संदेशाकडे कार्यकर्ते नेते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने न जाता नवीन मार्ग शोधतात त्यात आपली मोठी शक्ती खर्च होतेच पण मतभेदांमुळे आंबेडकरी चळवळीतील सर्व समाज विखुरलेल्या जात आहे.यात आपली निर्णायक भूमिका आणि जबाबदारी असली पाहिजे होती.ती आपण पार पाडतांना दिसत नाही.असे समाजाला वाटते.
बाळासाहेब मागासवर्गीय बहुजन समाज हा सर्वात मोठा असंघटीत कामगार आहे.आज त्याची संख्या सरकारी ९३ टक्के आहे.त्याचा विकास आणि कल्याण करण्यासाठी अनेक योजना आहेत.त्याची आपणास संपूर्णपणे माहिती असणारच.पण आपण काही वर्षांपूर्वी म्हणाला होता की सरकारी योजना मागासवर्गीय समाजाला अपंग बनवितात.मग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी विकासासाठी राज्य व केंद्रात ज्या योजना कायदेशीर रित्या बनवुन देशाला अर्पण केला.त्या चुकीच्या होत्या काय?.डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे स्वप्न होते की माझा समाज शासनकर्ती जमात व्हावा.महाराष्ट्रातील आजची राजकीय वर्तमान स्थिती पाहता रिपब्लिकन पक्षातील फुट एकजातीय आहे.केवळ सर्व बौद्ध समाज एकत्र आला तर राजकीय टक्केवारी पाहता सत्ताधारी बनू शकत नाही.पण सर्व बौद्ध समाजातील आंबेडकरी गट एकत्र आले तर एकच गट मजबूत होऊ शकतो.त्याची एकी पाहून इतर मागासवर्गीय आदिवाशी भटक्या समाजातील लोक या पक्षकडे आकर्षित होऊ शकतात. त्यासाठी एक विश्वास पात्र नेत्याची गरज आहे. आणि ते फक्त बाळासाहेब आंबेडकर असु शकतात.त्यासाठी त्यांना दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी पण दाखवावा लागेल. विद्यार्थी दसे पासून ज्यांनी आंबेडकरी चळवळीत अन्याय अत्याचार विरोधात संघर्ष केला.आणि सत्ते जवळ गेले त्यांना जर आपण बांडगुळ म्हणणार असाल तर?.असे लोक प्रत्येक जिल्ह्यात आहेत. मागासवर्गीय समाजात आंबेडकरी चळवळी त्यांना मान्यताप्राप्त नेता म्हणून मानले जाते त्यांना आपण चॅनल मीडिया प्रिंट मीडिया समोर ओळखत नाही असे सांगता. पण चळवळीतील जेष्टनेत्याच्या श्रद्धांजली सभेत त्यालाच उभे राहण्यासाठी हात देता.त्यांच्या मातोश्रीच्या अंत्यसंस्कार यात्रेत सहभागी होता.हे कौतुकास्पद आहेच यांचा समाजात प्रचंड परिवर्तन घडविणारा संकेत जातो. यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या कथेचे पारायण सर्व गटाच्या प्रमुखाना करावे लागेल. २१ जानेवारी १९४९ रोजी औरंगाबादला झालेल्या कार्यकमात बाबासाहेब आपल्या अनुयायांना उदेशून सांगतात.जो पर्यंत तुम्ही तुमची मजबूत संघटना जगाला इतर समाजाला दाखवत नाही तो पर्यंत तुमच्यावर असे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतच राहतील.म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. स्वताची ताकद निर्माण करा.मग पहा तुम्हाला कोण त्रास देतो. तुमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना शंभर वेळ विचार करावा लागेल.बाळासाहेब आज जो तो नेता संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.त्यांना त्याची मर्यादा आपण दाखवू शकता.प्रत्येक नेत्याला त्याचा मतदार संघ वाटून द्या इतर जिल्ह्यात मतदार संघात ढवळाढवळ करण्याचीही कोणालाही गरज नाही.
आपण लिहता की आंबेडकरी चळवळीचा व आंबेडकरी विचाराचा माणूस मोठ्या प्रमाणत मुंबई, नांदेड, विदर्भातील बुलढाणा,अकोला,भंडारा, गोंदिया,चद्रपूर,नागपुर,गडचिरोली,असे काही आंबेडकरी जिल्हे आहेत. तिथे आंबेडकरी विचारधारेची माणस घडविण्याची गरज आहे.( आंबेडकरी चळवळ संपली आहे,पान ४१/४२ )ऍड बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्यावर लिहणे म्हणजे खूप मोठी जोखीम असते. त्याच्या भक्तांना त्याच्या बाबत खरे लिहणे पसंत पडत नाही.प्रकाश यशवंत आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण तडपदार नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्याच बरोबर ते अत्यंत अभ्यासू, दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी नि परिवर्तनवादी म्हणून ही त्यांची ख्याती आहे असे म्हणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असल्यामुळे सर्व समाज त्यांचा खूप आदर करतात. पण त्या पलिकडे जाऊन एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून त्यानी स्वत:ची ओळख निर्माण करत राजकारणात व समाजकारणात मोठी मजल मारली. खरं तर बाबासाहेबांच्या घरात जन्माला आल्यावर नावाचा जो फायदा मिळतो तो मिळालाच पण त्याच बरोबर मोठ्या माणसाच्या घरात जन्मास येण्याचे तोटे ही असतात.प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे उगीच लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या अन त्यात काही वावगं ही नाही. मात्र त्यातून सावरत त्यानी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करत अकोल्यात वेगळा राजकीय आदर्श घालून दिला.एकमेव नेता असा आहे कि ज्याचा स्वताचा मतदार संघ आहे.
बाकी सर्व आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेते उंटावरचे शहाणे आहे.जे स्वताला संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात पण वीस वर्षात स्वताचा मतदार संघ बांधू शकले नाहीत. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार आहेत.करीता मित्रांना शत्रू न बनविता मित्रच राहु द्या मित्र शत्रु झाल्यास काय होते हे एका गोष्ठीतुन पाहता येईल.एकदा कुत्र्यात व गाढवात पैज लागते की जो लवकरात लवकर मुंबईत जाईल तो सिंहासनावर बसेल. ठरल्याप्रमाणे दोघेही तयार झाले.कुत्र्याला वाटले मीच जिंकेल कारण गाढवापेक्षा मी जास्त धावू शकतो.पण कुत्र्याला पुढे काय होणार यांची नक्की माहिती नव्हती.शर्यत सुरू झाली कुत्रा जोरात धाऊ लागला.पण थोडेसे पुढे गेला नसेल तर लगेच गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.असेच प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासना जवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते.त्यामुळे त्याने शर्यत जिंकून ते राजा झाले होते.निराश झालेला कुत्रा तेव्हा म्हणतो माझ्याच लोकांनी मला मागे ओढलं नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते.हीच परिस्थिती मागासवर्गीय बहुजन समाजातील नेत्यांची कार्यकर्त्यांची झाली आहे.म्हणूनच आपल्या माणसांना विश्वासात घ्या,पुढे जाण्यासाठी सहकार्य करा.त्यांना प्रोत्साहन द्या,नाहीतर बाहेरची गाढव आपल्यावर राज्य करीत राहतील.म्हणूनच बाळासाहेब आपल्या कडून सर्व समाजाची खूप अपेक्षा आहे.आपण समाजाचे ऐक्य घडवू शकतात. वंचित समाजाला राजकीय सत्ता देऊ शकता.आपण स्वाभिमान आहात, स्वाभिमानी असावे पण समाज हिता करिता अभिमान आणि स्वाभिमान. समान अंतरावर ठेवल्यास बाबासाहेबाचे खरे रक्ताचे नाही तर वैचारिक वारसदार आपणच ठरू शकता. फक्त आपल्याला वीस पावले मागे येऊन पन्नास पुढे जाता येईल.आपण पंधरा वीस आमदाराची अपेक्षा करता. ऐक्य झाल्यास पन्नास साठ आमदार आपण सहज निवडून अनु शकता.त्याकरिता आपल्या समोर आंबेडकरी जिल्ह्याची अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्या मतदारसंघात पक्ष बांधणी योग्य पध्दतीने झाली पाहिजे. केवळ निवडणुकीत त्यांना आपले मतदार समाज बांधव म्हणून पाहू नका.इतर वेळी त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले तर न बिकने वाला समाज व मतदार आपल्या पाठीमागे ठाम उभा राहील.म्हणूनच ९३ टक्के असंघटित कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाने प्राधान्य द्यावे.तेव्हाच तो स्वतंत्रपणे मतदार म्हणून तुमच्या पक्षाला मतदान करेल.अन्यता तो जाहीर सभेला इमानदारीने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहील.पण मतदान करणार नाही. हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी काम करावे हीच अपेक्षा आहे.आपणच क्रांतिकारी आंबेडकरी विचारधारा असणाऱ्या चळवळीचे राजकीय वारसदार आहात.म्हणूनच आपल्या वाढ दिवसा निमिती हार्दिक शुभेच्छा! जयभिम, जय भारत!
✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९




