




✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)
कारंजा(दि.9मे):- तालुक्यातील पारडी येथील ब्रम्हानंद रामजी बालपांडे वय – ४४ वर्ष यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या केली. हि बाब आमदार दादाराव केचे यांना ज्ञात झाल्यावर बालपांडे यांच्या घरी सांत्वनासाठी पोहचत बालपांडे कुटुंबांना धिर देत सांत्वन करत शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. त्यांच्या पश्चात वडील रामजी किसनाजी बालपांडे वय – ७० वर्ष, पत्नी उषा ब्रम्हानंद बालपांडे वय-३८, अंकुश वय – १६ आणि भावेश वय – १३ हि दोन मुले आहेत.
आमदार दादाराव केचे यांनी या घटनेने बालपांडे कुटुंबवर संकट कोसळले असल्याने खचून न जाता उद्भवलेल्या परीस्थितीला तोंड द्यावे आणि मुलांचे भवितव्य सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे असा विचार व्यक्त केला. एकंदरीतच पाहता शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सर्वत्र बिघडलेली आढळून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे. याकडे सरकारने विशेष लक्ष केंद्रित करनेही अत्यावश्यक झाले आहे. तरीही सरकार शेतकऱ्यांना शाश्वत मदत देण्यास निष्क्रिय ठरले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत व्हावी म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना सरकार मार्फत प्रकरण तयार करून शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.
या प्रसंगी दिपा कवारे सरपंच, मंगेश बबुलकर उपसरपंच, प्रदीप श्रीराम, प्रमोद विरूळकर, रंजना टिपले (माजी उपसभापती), गुणवंत मस्के, अरविंद चाफले पोलीस पाटील, विजय हिरूळकर, अनिल चाफले, निकेश नासणे यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.




